नवतरुणांना काय होत आहे?
सुवार्ता की दुःखवार्ता—आधी कोणती ऐकायची तुम्हाला? असा प्रश्न केल्यावर, अनेकांनी दुःखवार्ता आधी ऐकणे पसंत केले जेणेकरून सुवार्तेची गोड चव काही वेळापर्यंत तशीच त्यांच्या मनात घोळत राहू शकेल.
नवतरुणांना काय होत आहे हे आपण पाहतो तेव्हा आधी, सध्याच्या अवस्थेचा विचार करा. आजची तरुण पिढी पूर्वीच्या तरुणांसारखी नाही, असे वृद्धांचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या बाजूला, आजच्या तरुण पिढीला, ते गतकाळाच्या दर्जांना धरून चालत नाहीत असे त्यांना म्हटलेले मुळीच आवडत नाही. काहीही असो, मनुष्यगुणांचे कटाक्षाने निरीक्षण करणारे मात्र कबूल करतात की आजची तरुण पिढी खरीच वेगळी आहे.
किती वेगळी?
सर्वसामान्य लोकांना वाटत असले, की तरुणांना योग्य वळण, जबाबदारीची जाणीव आणि दुसऱ्यांबद्दल आदर असावयास हवा, पण अशा आदर्शांमध्ये आपल्याला भलतेच दिसून येते. लंडनच्या द इन्डिपेंडन्ट नामक वृत्तपत्रात छापलेल्या एका सर्वेक्षणानुसार, तरुण पिढी, “त्यांचा हिरमोड करणाऱ्या जगाविरुद्ध ‘बंडाळीचा नवा आत्मा’ विकसित करीत आहेत.” हा “बंडाळीचा नवा आत्मा,” एका तपासातून तेव्हा निष्पन्न झाला जेव्हा, फार कमी आधुनिक दिवसांतील तरुण, स्वतःला “सुज्ञ आणि जबाबदार” असे म्हणवून घेण्याची इच्छा दर्शवतात. उलट ते स्वतःला “जंगली आणि चंचल” असे म्हणवून घेऊ इच्छितात.
उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये, ज्यांची फिर्याद करण्यात आली अशा गुन्ह्यांत—बहुतेक गुन्हे तरुणांनी केले होते—१९५० व १९९३ दरम्यान दहापटीने वाढ झाली. मादक औषधे आणि मद्यार्क यांच्या दुरुपयोगाचे प्रमाणही गुन्ह्यांच्या प्रमाणाएवढेच आहे. याबरोबरच, जवळजवळ सर्वच विकसित राष्ट्रांनी, “दुसऱ्या महायुद्धानंतर तरुणांमधील मानसिक बिघाडात बरीच वाढ” अनुभवली आहे, अशी नोंद लंडनच्या द टाईम्सने केली. गुन्हेगारीशास्त्राचे प्राध्यापक डेवीड जे. स्मिथ यांच्या म्हणण्यानुसार, हे बिघाड “नागवणूक किंवा वाढत्या समृद्धीशी संबंधित नाहीत.” संशोधनावरून हे सूचित होते, की तरुण पिढीत आणि वृद्धजनांत मोठी तफावत आता स्पष्ट होत आहे.
आजची मुले आणि किशोरवयीन तरुण वाढत्या दबावाखाली आहेत. आज, आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. १२ वर्षांखालील मुलांनी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांचे प्रमाण, दहापेक्षा कमी वर्षांत दुप्पट झाले आहे, असा अहवाल स्कॉटलंडच्या ग्लासगोतील हेरल्डने दिला. मोठी मुलं, हताश होऊन आत्महत्या करतात. “तरुणांतील मानसिक समस्यांमुळे ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जरी साहाय्य दिले तरी त्याचा काही एक उपयोग नाही,” असे त्या वृत्तपत्राने म्हटले.
कोण जबाबदार आहे?
प्रौढांना तरुणांच्या या “भ्रष्ट” दृष्टिकोनाबद्दल त्यांना दोष लावण्यास सोपे वाटते. पण खरे पाहता, नवतरुणांबाबत आज जे काही घडत आहे त्यासाठी पुष्कळ प्रमाणात प्रौढच जबाबदार नाहीत का? तरुणांच्या या भ्रष्ट वागणुकीला धाकदपटशा, पालकीय दुर्लक्ष, तरुण ज्यांच्यानुसार स्वतःला घडवू पाहतात त्या रोल मॉडेल्सची उणीव, याच गोष्टी कारणीभूत असल्याचे बहुतेक वेळा सांगितले जाते. “जनसामान्यांमधील अवसाद ३० वर्षांपूर्वी जितके होते तितकेच आजही आहे,” असा ब्रिटनच्या मेडिकल रिसर्च कौन्सिल चाईल्ड सायकॅट्री युनिटचे प्रमुख प्राध्यापक सर मायकल रट्टर यांचा दावा आहे. ते पुढे म्हणतात: “पण किशोरवयीन आणि प्रौढ यांमध्ये ते वाढत चालले आहे. . . . केवळ घटस्फोटाच्या रूपातच नव्हे तर प्रौढांमधील भांडणे आणि संघर्ष यांच्यातील सामान्य पातळीच्या रूपातील कौटुंबिक विघटन हे कारणीभूत घटक आहेत.”
एका संशोधकाचा दावा आहे, की नवतरुण “रूढी नाकारत” आहेत. का? “कारण रूढीपद्धती जीवनक्षम राहिलेल्या नाहीत.” लिंग भूमिकांविषयीच्या बदलत चाललेल्या दृष्टिकोनाचेच उदाहरण घ्या. पुष्कळ तरुण स्त्रिया, पुरुषांचे आक्रमक, हिंसात्मक गुण धारण करीत आहेत, तर तरुण पुरुष नामर्द होत आहेत. गत काळातील आदर्शांपेक्षा कितीतरी भिन्न!
पण, आपण इतके आमूलाग्र बदल का पाहत आहोत? आजच्या तरुणांसाठी कोणती सुवार्ता आहे? त्यांना सुरक्षित भवितव्य कसे लाभू शकते? आमचा पुढील लेख या प्रश्नांना उत्तर देतो.