तुम्ही सूचना पाळता का?
आपल्या मुलांना जीवनात यश मिळावे व मोठे झाल्यावर ती आनंदान राहावी म्हणून एखादा प्रेमळ पिता त्याच्या मुलांना शिकवण देईल. ती आपल्याच भल्यासाठी असल्याचे माहीत असल्याने आईवडीलांवर प्रेम करणारी व त्यांचा आदर करणारी मुले अशा शिकवणीचा स्वीकार करतील. त्याचप्रमाणे आपला प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा, त्याच्या सेवकांना त्यांच्या जीवनात यश व आनंद आणील असे मार्गदर्शन देतो. या कारणामुळे, पवित्र शास्त्र या त्याच्या वचनातून आणि भूतलावरील त्याच्या संघटनेमार्फेत देव आपल्याला देत असलेल्या सूचना आपण पाळणे महत्त्वाचे आहे.
कुटुंबामध्ये
जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रासाठी आपल्याला सूचना देण्यात येतात. त्यातील एक आहे कौटुंबिक वर्तुळ. विवाह व कुटुंब यांचा उगम ईश्वरी आहे. पवित्र शास्त्र म्हणते की, देवाने पहिल्या मानवी जोडप्याचा विवाह केला आणि मुले जन्माला घालण्यास त्यांना सांगितले. (उत्पत्ती १:२७, २८; २:२२-२४) सृष्टीकर्त्याने कुटुंबातील सर्व सभासदांना ज्याच्या त्याच्या कर्तव्यानुसार सूचना दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ, पति व पिता हा घराचा प्रमुख आहे. याचाच अर्थ, शिकवण, अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण व शासन पुरविण्याची जबाबदारी त्याची आहे. तो कुटुंबाचे महत्त्वाचे निर्णयही घेतो. पती या नात्याने त्याने आपल्या पत्नीची कदर केली पाहिजे आणि अधिक नाजूक व्यक्ती म्हणून तिला मान दिला पाहिजे. (इफिसकरांस ५:२२, २३; १ तीमथ्य ५:८; १ पेत्र ३:७) पत्नीने तिच्या पतीच्या अधीन राहिले पाहिजे, त्याला गाढ आदर दाखवला पाहिजे आणि त्याची मदतनीस व पूरक झाले पाहिजे. शास्त्रवचने दाखवतात की, मुलांनी आपल्या आईवडीलांसोबत आज्ञाधारक राहिले पाहिजे.—उत्पत्ती २:१८; इफिसकरांस ६:१-३; १ पेत्र ३:१, २.
या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास काय होते? पती पत्नीची कदर करीत नाही व बायका आपल्या पतीच्या मस्तकपदाचा आदर करीत नाहीत तेव्हा मतभेद व वाद होतात. इतकेच काय, अशा गोष्टींमुळे अनेक विवाह मोडले आहेत. मुलांच्या अवज्ञा आणि बंडखोर वृत्तीमुळे अनेक माता-पित्यांवर मोठे दुःख गुदरले आहे. अनेकदा, योग्य शिस्तीनुसार मुलांचे संगोपन न करून त्यांना चिडीला आणण्यात माता-पिता स्वतःच दोषी असतात.—इफिसकर ६:४.
सामाजिक कार्यकर्ते, मनोवैज्ञानिक व इतरांनी कौटुंबिक समस्या हाताळण्यासाठी अनेक प्रकारच्या सूचना दिलेल्या असल्या तरी कोणताही सल्ला कुटुंबाच्या निर्मात्याने पवित्र शास्त्रात दिलेल्या सूचनांहून जास्त परिणामकारक नाही. त्या पाळण्याने खरा आनंद व समाधान मिळते.—स्तोत्रसंहिता १९:७-९.
मंडळीमध्ये
पृथ्वीवरील देवाच्या संघटनेचा नियुक्त मार्ग, विश्वासू व बुद्धिमान दास, याच्यामार्फत ख्रिस्ती मंडळीचा प्रमुख, येशू ख्रिस्त, देत असलेल्या सूचना आपण पाळल्या पाहिजेत. (मत्तय २४:४५-४७; इफिसकरांस ५:२३) मंडळीमध्ये शांती व एकता असावी म्हणून त्यातील सर्व सभासदांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार कृती केली पाहिजे. उदाहरणार्थ, मंडळीमध्ये शिकवण्यात पुढाकार घेणाऱ्यांनी व इतरांना मदत करणाऱ्यांनी यहोवाच्या संघटनेकडून त्यांना मिळणाऱ्या मार्गदर्शनाला चिकटून राहण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचे काम परिणामकारक होईल. प्रचाराच्या कामात सहभाग कसा घ्यावा, मंडळीतील समस्या कशा हाताळाव्या, सल्ला व प्रोत्साहन कसे द्यावे, छळ सहन करणाऱ्यांचे कसे सांत्वन करावे इत्यादिविषयी त्या सूचना असतील. ख्रिस्ती मंडळीच्या सान्निध्यात राहणाऱ्या सर्वांसाठी उद्बोधक व उभारणाऱ्या सभांसाठी कशी तयारी करावी याबद्दल अधिकृत सूचनाही असतात.—प्रे. कृत्ये २०:२०; रोमकर १२:६-८; गलतीकर ६:१; १ थेस्सलनीकाकर ३:१-३.
या बाबतीत, विशेषतः मंडळीतील वडीलांनी वा देखरेख्यांनी चांगले उदाहरण घालून दिले पाहिजे. नियमन मंडळ सूचना पाठवते. त्या वडीलवर्गाने काळजीपूर्वक व विश्वासूपणे पाळल्या पाहिजेत. स्थानिक परिस्थितीनुसार त्यांनी त्या जुळवून लागू केल्या पाहिजेत. ख्रिस्ती मंडळीला मार्गदर्शन करणारा येशू ख्रिस्त आहे हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. जगभरातील मंडळ्यांच्या गरजा त्याला उत्तमरित्या समजतात आणि जरुर ते प्रोत्साहन व मदत तो देतो. त्यामुळे ईश्वरशासित संघटनेकडून त्यांना मिळणाऱ्या सूचना लागू करण्यात वडीलांनी बिचकू नये. मंडळीतील सर्वांसमोर हे उत्तम उदाहरण असेल व त्यामुळे आपसात व जगभरातील ख्रिस्ती बांधवांसोबत एकतेने राहण्यात त्यांना मदत होईल.—प्रे. कृत्ये १५:१-३१; इब्रीयांस १३:७; प्रकटीकरण ५:६.
आनंददायी परिणाम
एखादी मोठी वास्तु बांधताना ती टिकावी म्हणून ती बांधणारा, शिल्पशास्त्रज्ञाने दिलेल्या नकाशानुसार काळजीपूर्वक काम करतो. जलप्रलयापूर्वीच्या काळात नोहाला तारू बांधण्यास सांगण्यात आले. ते कसे बांधावे आणि येणाऱ्या प्रलयातून वाचण्यासाठी कोणते लोक आणि प्राणी त्यात आणावे या गोष्टी त्याला सांगण्यात आल्या. त्यावर नोहाने कशी प्रतिक्रिया दाखवली? पवित्र शास्त्र म्हणतेः “नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” केवळ नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले लोक प्रलयातून वाचले. (उत्पत्ती ६:५, १३-२२; ७:२३) आज, नोहाच्या काळात असलेल्या सारख्या परिस्थितीत आपण जगत आहोत. आणि त्याच कारणाने देव सर्व दुष्ट लोकांचा नाश करील. वाचणाऱ्यांमध्ये आपला समावेश व्हावा अशी आपली इच्छा असल्यास आपण कोणती पावले टाकली पाहिजेत ते पवित्र शास्त्र आपल्याला सांगते.—मत्तय २४:३७-३९; २ पेत्र ३:५-७, ११.
तेव्हा, त्याच्या लेखबद्ध वचनातून व पृथ्वीवरील संघटनेमार्फत देव देत असलेल्या सूचनांचा आदरपूर्वक स्वीकार करून आपण त्या आचरणात आणल्या पाहिजेत. तसे केल्यामुळे आपल्याला यश व आनंद मिळेल आणि आपला जीवही वाचेल.