मानवाचे नव्हे तर देवाचे भय का धरावे?
“मनुष्याची भीती पाशरुप होते; पण जो यहोवावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.” (नीतीसूत्रे २९:२५) हे पुरातन नीतीसूत्र आम्हाला मानसिक विष ठरणाऱ्या भयाविषयी जागरुक करते. ते आहे मानवाचे भय. त्याचा संबंध पाशासोबत दाखविला आहे. ते का? कारण सशासारखा लहान प्राणी जर कोणा पाशात अडकला तर त्याला काहीच सुचत नाही. त्याला पळून जाण्याची इच्छा असते पण तो पाश त्याला अधिकच आवळून धरतो. यामुळे सावज दुबळे बनते.
आम्हाला कोणा मानवाच्या भीतीने पछाडले तर आम्ही त्या सशासारखे नसतो. काय करावे ते आपल्याला ठाऊक असते, व ते करण्याची आपली इच्छाही होते. पण ते भय आम्हाला ग्रासून टाकते आणि आम्ही बलहीन, असमर्थ बनतो.
मानवाच्या भयाचा पाश
पवित्र शास्त्र काळी मानवाच्या भयाने जे ग्रस्त झाले होते त्या काहींची उदाहरणे लक्षात घ्या. यहोशवाच्या काळी कनान देशावर इस्राएलांनी चढाई करण्याआधी १२ पुरुषांना तो देश हेरून येण्याच्या कामगिरीवर पाठवण्यात आले. ते हेर परत आले व त्यांनी म्हटले की, देवाने सांगितल्याप्रमाणेच तो देश सुपीक व समृद्ध आहे. पण यापैकीचे १० हेर तेथील रहिवाशांची शक्ती पाहून गर्भगळीत झाले. अशाप्रकारे भयाने ग्रस्त झाल्यामुळे त्यांनी इस्राएलांना त्या लोकांविषयीचा अहवाल फारच अतिशयोक्तीने सांगितला. यामुळे सर्व राष्ट्रच गांगरुन गेले. त्यांनी कनानमध्ये घुसून देशाचा ताबा घेण्याचे नाकारले. याचा परिणाम, यानंतरच्या ४० वर्षांत काही अपवाद वगळता सर्वच्या सर्व माणसे अरण्यवासात मरण पावली. ती पिढीच जवळजवळ नष्ट झाली.—गणना १३:२१–१४:३८.
मानवाच्या भीतीने ग्रस्त झालेला आणखी एक जण योना होता. निनवे शहरास प्रचार करण्याची नेमणूक दिल्यावर तो “यहोवापुढून तार्शीशला पळून जाऊ लागला.” (योना १:३) पण का? कारण निनवेकर हे हिंसक व क्रूर म्हणून ख्यातनाम होते व हे योनास निश्चितपणे ठाऊक होते. मानवाच्या भयामुळे त्याला निनवेपासून उलट दिशेला पळून जाण्यास लावले. हे खरे की त्याने सरतेशेवटी नेमणूक स्विकारली, पण तेही यहोवाकडून असामान्य स्वरुपात शिस्त मिळाल्यावर.—योना १:४, १७.
राजांना देखील माणसांची भीती पछाडते. एके प्रसंगी शौल राजाने देवाने दिलेली आज्ञा अवमानली. त्याची सबब काय होती? “मी यहोवाच्या आज्ञेचे व आपल्या शब्दांचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांस भिऊन त्यांचे म्हणणे ऐकले.” (१ शमुवेल १५:२४) काही शतकानंतर यरुशलेमावर बाबेलने हल्ला केला तेव्हा विश्वासू संदेष्टा यिर्मयाने सिद्किया राजास शरणागति पत्करुन पुष्कळ रक्तपात घडण्यापासून स्वतःला वाचवावे ही सूचना केली. पण असे करण्याचे सिद्कियाने नाकारले. का बरे? त्याने यिर्मयास हे कबूल केलेः “जे यहुदी फितून खास्द्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते की ते मला त्यांच्या स्वाधीन करून माझा उपहास करतील.”—यिर्मया ३८:१९.
सरतेशेवटी प्रेषित देखील भयग्रस्त झाले होते. येशूला ज्या दिवशी मरावयाचे होते त्याच दिवशी आधी त्याने आपल्या अनुयायांना हा इशारा दिला की, ते सर्व त्याला सोडून जातील. तथापि, पेत्राने मोठ्या धैर्याने म्हटलेः “प्रभुजी, मी आपणाबरोबर बंदिशाळेत व मरावयालाही जाण्यास तयार आहे.” (लूक २२:३३; मत्तय २६:३१, ३३) पण ते वक्तव्य किती खोटे ठरले! केवळ थोड्याच तासानंतर पेत्राने येशूसोबत असण्याचे व त्याची ओळख देण्याचे भयामुळे नाकारले. मानवाची भीती त्याला पछाडली! होय, मानवाचे भय हे खरेच मानसिक विष आहे.
आम्ही कोणास भ्यावे?
आम्ही माणसाच्या भयावर कशी मात करू शकतो? त्याच्या जागी अधिक हितकारक भयाची बदली करुन. अशाच प्रकारच्या भयाविषयीचे प्रोत्साहन त्याच प्रेषिताने म्हणजे पेत्राने दिले. तो म्हणालाः “देवाचे भय बाळगा.” (१ पेत्र २:१७) प्रकटीकरणाच्या दृष्टांतात योहानाने पाहिलेल्या दिव्यदूतानेही अशीच घोषणा केलीः “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा.” (प्रकटीकरण १४:७) सूज्ञ राजा शलमोनानेही याच प्रकारच्या भयाविषयीचे प्रोत्साहन दिले. त्याने म्हटलेः “सर्वांचे सार हेच की, देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्य कर्तव्य कायते एवढेच आहे.” (उपदेशक १२:१३) होय, देवाचे भय हे एक कर्तव्य आहे.
देवाचे भय लाभ देते. पुरातन स्तोत्रकर्त्याने असे म्हटलेः “[यहोवाचे] भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण खरोखर समीप असते.” (स्तोत्रसंहिता ८५:९) एक पवित्र शास्त्रीय नीतीसूत्र देखील हे जोर देऊन सांगतेः “यहोवाचे भय आयुष्य वाढविते.” (नीतीसूत्रे १०:२७) होय, यहोवाचे भय सुदृढ व लाभदायक आहे. ‘पण,’ तुम्ही म्हणाल, ‘यहोवा हा तर प्रेमळ देव आहे ना? मग आम्ही प्रेमळ देवास का भ्यावे बरे?’
प्रेमळ देवास भ्यावे?
देवाचे भय हे कोणा नीच माणसाने घातलेले क्रुर व गांगरविणारे भय नसते; ते माणसाला कोणा परिस्थितीत जखडवून ठेवीत नाही. हे असे भय आहे जे एका मुलास आपल्या बापाविषयी वाटत असते. तो आपल्या बापावर प्रेम करतो आणि बापही त्याच्यावर प्रेम करतो हे जाणून असताही ते हितकारक भय त्याजमध्ये असते.
देवाविषयीचे भय हे निर्माणकर्त्याबद्दल वाटणारी निष्ठा आहे, जी तो नीतीमान, न्यायी, सूज्ञ व प्रीतीस्वरुपी आहे हे जाणण्यापासून निर्मित होत असते. देव हा सर्वोच्च न्यायधीश असून एखाद्यास बक्षिस देणे वा शिक्षा करण्याचा अधिकार त्याला आहे, त्यामुळे त्याला असंतुष्ट न करणे ही सुदृढ भीती बाळगणे योग्य आहे. “सदाजीवी देवाच्या हाती पडणे हे महाभयंकर आहे,” असे प्रेषित पौल लिहितो. (इब्रीयांस १०:३१) देवाच्या प्रेमास कसेही गृहीत धरता येणार नाही आणि त्याच्या न्यायालाही कमी प्रतीचे समजता येणार नाही. या कारणास्तव पवित्र शास्त्र आम्हाला हे स्मरण देतेः “यहोवाचे भय हा ज्ञानाचा उगम होय.”—नीतीसूत्रे ९:१०.
तथापि, आम्हाला हे ध्यानात ठेवलेच पाहिजे की, अवज्ञाकारी लोकांना शिक्षा करण्याचे सामर्थ्य यहोवाठायी आहे व ते त्याने बहुधा करून दाखविले आहे तरी तो रक्तपिपासू किंवा क्रुर देव नाही. तो खराच प्रेमस्वरुप देव आहे. जरी तो प्रेमळ पालकांप्रमाणे कधीकधी धार्मिकतेला अनुसरुन रागावतो तरी तो प्रेममय देव आहे. (१ योहान ४:८) यासाठीच त्याची भीती बाळगणे हे हितकारक आहे. ते आम्हास त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास लावते, ज्या आमच्या हितासाठी दिलेल्या आहेत. देवाच्या आज्ञापालनामुळे आनंद मिळतो पण तेच त्याच्या आज्ञांचे उल्लंघन नेहमीच कटू परिणाम आणते. (गलतीकर ६:७, ८) स्तोत्रकर्त्याला असे घोषित करण्यास प्रेरित केले गेलेः “यहोवाचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांस काही उणे पडत नाही.”—स्तोत्रसंहिता ३४:९.
तुम्ही कोणाचे भय धरता?
देवाचे भय माणसाच्या भयावर मात करण्यास आम्हाला कशी मदत देते? आम्ही जे चांगले करतो त्याविषयी लोक आमची थट्टा करतील, एवढेच काय पण आमचा छळही करतील; यामुळे आम्हावर दबाव पडत जातो. परंतु देवाविषयीची आदरयुक्त भीती चांगल्या कामात मग्न राहण्यात आम्हाला भाग पाडेल; कारण आम्ही त्यास असंतुष्ट करु इच्छित नाही. याखेरीज, देवाविषयीचे प्रेम आम्हाला, त्याच्या अंतःकरणाला जे संतुष्ट वाटत असते तेच करण्यास प्रवृत्त करील. याशिवाय, चांगले करीत राहिल्यामुळे तो आम्हाला आशीर्वाद देतो हे स्मरणात असल्यामुळे आम्हाला त्याच्याविषयीची प्रीती अधिकाधिक वाढू लागते व मग त्याच्याच इच्छेप्रमाणे करीत राहावे अशी ओढ आम्हाला लागते. अशाप्रकारे देवाविषयीचा समतोल दृष्टीकोण मनुष्याच्या कोणत्याही प्रकारच्या भयावर मात करण्यासाठी आम्हास मदत करतो.
उदाहरणार्थ, पुष्कळ जण आपले मित्र काय म्हणतील याची भीती वाटून जे वाईट ते करण्याच्या आहारी जातात. तरुण लोक शाळेत कदाचित धुम्रपान करतील, अभद्र भाषा बोलत असतील आणि लैंगिक अनुभवावर (खरा किंवा काल्पनिक) बढाया मारत असतील तसेच मद्य किंवा मादक द्रव्यांचा आस्वाद घेत असतील. पण का? त्यांना हे हवे असते म्हणून नव्हे, तर आपले सोबती, आपण वेगळा मार्ग धरल्यास काय म्हणतील याचे भय वाटत राहिल्यामुळे ते हे करतात. कोणा नवयौवनास कुचेष्टा व टिंगल या गोष्टी एखाद्या शारीरिक छळाप्रमाणे सहन करण्यास मोठ्या कठीण वाटत असतील.
प्रौढांवर देखील चुकीचे ते करण्याचा दबाव येत राहतो. कदाचित, नोकरीवरील मालक कामगारास गिऱ्हाईकाच्या बिलात वाढ करावयाला सांगेल. तसेच कर वाचविण्यासाठी कंपनीच्या टॅक्स फॉर्ममध्ये अप्रामाणिक तपशील भरण्यास सांगेल. अशावेळी येथे काम करणाऱ्या ख्रिश्चनाला वाटेल की, त्याने असे केले नाही तर त्याला आपली नोकरी गमवावी लागेल. अशाप्रकारे मानवाचे भय त्याला जे चुकीचे ते करण्याचा दबाव आणील.
तथापि, दोन्ही प्रकारात, देवाविषयीचे सुदृढ भय व त्याच्या आज्ञांविषयींचा आदर ख्रिश्चनाला माणसाच्या भीतीमुळे गर्भगळीत होऊ देणार नाही. देवाविषयी बाळगलेले प्रेम हे त्याला देव ज्या गोष्टींना मनाई करतो त्या करण्यापासून दूर राखील. (नीतीसूत्रे ८:१३) तसेच त्याचा देवावरील विश्वास, त्याला याची खात्री देईल की, तो त्याच्या पवित्र शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षित झालेल्या विवेकाप्रमाणे वागला तर कसलाही परिणाम घडला तरीही देव आपले पाठबळ निश्चित देईल. प्रेषित पौलाने आपला विश्वास या शब्दात जाहीर केलाः “मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठायी सर्व काही करण्यास मी शक्तीमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.
ज्यांनी अति तीव्र कसोटीत देखील यहोवास आपला विश्वासूपणा प्रदर्शित केला अशा पुष्कळ स्त्री-पुरुषांची उदाहरणे पवित्र शास्त्र प्रस्तुत करते. त्यांना “टवाळी, मारहाण, . . . बंधने व कैद [यांचा अनुभव आला.] त्यांस दगडमार केला, त्यांना करवतीने चिरिले, मोहपाशात टाकले व ते तरवारीच्या धारेने मेले.” (इब्रीयांस ११:३६, ३७) तथापि, त्यांना मानवाच्या भयाला स्वतःवर प्रभुत्व करण्याचा वाव दिला नाही. उलटपक्षी, त्यांनी तोच मार्ग चोखाळला, जो येशूने आपल्या शिष्यांना अनुसरण्यास सांगितले होतेः “जे शरीराला वधितात, पण आत्म्याला वधावायास समर्थ नाहीत त्यांस भिऊ नका तर आत्मा व शरीर या दोहोंचा गेहेन्नात नाश करावयास जो [देव] समर्थ आहे त्यास भ्या.”—मत्तय १०:२८.
मनुष्यापेक्षा देवाचे भय बाळगण्याची येशूची ही सूचना अनुसरण्यात सुरवातीच्या ख्रिश्चनांना सर्व प्रकारची कठीण परिस्थिती, परिक्षा व छळ “सुवार्तेसाठी” सहन करण्यास लावले. (फिलेमोन १३) प्रेषित पौल याविषयीचे उल्लेखनीय उदाहरण आहे. करिंथकरांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात तो दाखवितो की, देवाचे भय बाळगल्यामुळे त्याला कैद, मारहाण, दगडमार, तारु फुटणे, रस्त्यावरील विविध संकटे, रात्रीची जागरणे, भूक, तहान, थंडी व नग्नता सहन करण्यास कसे समर्थ केले गेले.—२ करिंथकर ११:२३-२७.
देवाच्या भयाने त्या आरंभाच्या ख्रिश्चनांना रोमी अधिपत्याखालील त्या जबर छळास, ज्यात कित्येकांना हिंस्र पशुपुढेही टाकणे होते, त्यास सहन करण्यास समर्थ केले गेले. मध्ययुगात धैर्यशील विश्वासधारकांना, त्यांनी आपल्या विश्वासाची हातमिळवणी केली नाही म्हणून जाहीरपणे जाळून मारले. गेल्या जागतिक महायुद्धात देवास असंतुष्ट वाटणाऱ्या गोष्टी करण्यापेक्षा राजकीय बंद्यांच्या छावण्यात त्रास सहन करून मृत्यु पत्करणे योग्य मानले. खरेच, ईश्वरी भय हे किती प्रबळ आहे! त्याने त्या ख्रिश्चनांना इतक्या क्रुर परिस्थितीत देखील माणसाच्या भयावर मात करण्याची शक्ती दिली तर तेच आम्हाला सुद्धा कोणत्याही परिस्थितीत शक्तीशाली करू शकते!
आज दियाबल सैतान, देव असंतुष्ट होईल असे काही आमच्या हातून घडावे यासाठी होईल तितके करीत आहे. यास्तव, प्रेषित पौलाने जे लिहिले होते तेच खऱ्या ख्रिश्चनांचे ब्रीद असावेः “नाश होईल अशी माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जिवाच्या तारणासाठी विश्वास धरणाऱ्यांपैकी आहो.” (इब्रीयांस १०:३९) यहोवाचे भय हा बळाचा खरा स्रोत आहे. त्याच्याच मदतीने आपण “धैर्य धरा[वे] व म्हणा[वे]: ‘यहोवा माझा साहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?’”—इब्रीयांस १३:६.
[७ पानांवरील चित्रं]
देवाच्या भयाने पौलाला मारहाण, कैद व तारु फुटणे यासारख्या सर्व गोष्टी सहन करण्यास शक्तीमान केले.—२ करिंथकर ११:२३-२७.