भय नेहमीच वाईट असते का?
ते आनंदास नष्ट करते व आशेचा विध्वंस करू शकते. त्याचे वर्णन मानसिक विष, विचाराला नष्ट करणारे असे केले असून असे म्हटले जाते की, ते इतर शारीरिक व्याधिंपेक्षा अधिक विनाशकारी आहे. होय, भय ही प्रबळ भावना आहे. पण ते नेहमीच वाईट असते का?
कल्पना करा की तुम्ही एखाद्या अपरिचित मार्गाने आपले वाहन चालवीत आहात. हा रस्ता आत घाटात जातो व वेडीवाकडी वळणे घेतो. रात्र सुरु झाली आहे व याचवेळेला बर्फाच्या हलक्या सरी पडू लागल्या आहेत. तुमची मोटार आता अडखळते. तुम्हाला आता कळते की, तुम्ही बर्फाच्छादित माथ्यावर येऊन पोहंचला आहात.
आता तुम्हाला फारच जागरुक राहिले पाहिजे. प्रत्येक बर्फाच्छादित वळण ओलांडताना तुमच्या मनात विचार डोकावून जातो की, जर का मोटार घसरली तर मग ती रस्त्याच्या कडेला जाऊ लागेल व मग, मग काय? खाली दरीत कोसळेल! तसेच आता अंधारात आणखी कोणते धोके समोर आहेत याची तुम्हाला कल्पना नाही. असे हे विचार येत असता तुमच्या तोंडचे पाणी पळते आणि तुमचे हृदय जोरात धडधडू लागते. तुम्ही सावरुन बसता. तुमच्या मनात जे विचार आता चाटून गेले त्याकडे लक्ष न देता हाताशी असणाऱ्या कामाकडे म्हणजेच मोटार रस्त्यावर राहील व अपघात होण्याचे टळेल ही काळजी घेणे याकडे तुमचे लक्ष लागते.
सरतेशेवटी, तुम्ही उताराला लागता. आता रस्त्यावर दिवे आहेत व बर्फ नाही. तुम्हावर असणारा ताण हळूवार लोपला जातो. तुम्ही सुटकेचा श्वास टाकता. तुम्हास हायसे वाटते. शेवटी, तुम्ही मनाशीच बोलून जाताः मला उगीचच भीती वाटली!
पण ते उगीचच होते का? नाही. अशा परिस्थितीत जाणवणारा ताण हा सर्वसामान्य आहे. तो आम्हास जागरुक व सिद्ध करतो. सुदृढ भय असल्यास आम्ही कोणतेही वेडेपणाचे काम करु नये व स्वतःला इजा करुन घेऊ नये यासाठी ते आम्हास मदत देते. होय, भय हे नेहमीच विचारसरणीस नष्ट करणारे किंवा मानसिक विष नसते. काही परिस्थितीत ते लाभदायक ठरू शकते.
पवित्र शास्त्र भयाबाबत भाष्य करते व ते आमच्या लक्षात त्याचे दोन प्रकार आणून देते. एका प्रकारचे भय खरेपणाने मनाचे विष आहे. आणि दुसरे भय हे सर्वसाधारण व सुदृढ असते इतकेच नाही तर ते आमच्या तारणासाठीही उपयुक्त ठरते. हे भयाचे दोन प्रकार का? एकाची जोपासना करण्याचे तर दुसऱ्याला टाळण्याचे आम्हाला कसे शिकून घेता येईल? याचा विचारविनिमय पुढील लेखात केला जाईल.