परोपजीवींपासून सांभाळा!
हाँडुरासमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
सकाळी उठल्या-उठल्या मळमळायला लागतं. फार लवकर थकवा येतो. पोट थोडंसं वर आल्यासारखं वाटतं. गरोदरपणाची लक्षणं तर नाहीत? कदाचित असतीलही. पण, तुम्ही उष्णकटिबंधीय किंवा उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांत राहणारे असाल तर ही लक्षणे हमखास एक प्रकारच्या आंत्र परोपजीवीची असू शकतात. आंत्र परोपजीवी आहे तरी काय? आणि या नकोशा पाहुण्यांनी तुमच्या शरीरात प्रवेश केला आहे हे कशावरून ताडता येईल?
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, परोपजीवी हा आपल्या आश्रयदात्याकडून पोषण करवून घेणारा एक सजीव प्राणी असतो; आणि आश्रयदाता म्हणजे, ज्याच्या शरीरावर किंवा ज्याच्या शरीरात परोपजीवी राहतो असा दुसरा एक सजीव प्राणी. आंत्र परोपजीवींचे दोन प्रकार आदीजीवसंघातले असून त्यात अमीबा आणि हेलमीन्थ किंवा कृमींचा समावेश होतो. परोपजीवींपासून कितपत हानी होऊ शकते हे त्यांच्या प्रकारावर आणि संख्येवर तसेच आश्रयदात्याच्या वयोमानावर आणि प्रकृतीवर अवलंबून असते.
उदाहरणार्थ, मादी गोलकृमी एका दिवसात २,००,००० च्या आसपास अंडी घालू शकते. पण, वाढ होण्यासाठी मात्र ही अंडी जमिनीत उबवावी लागतात. एका व्यक्तीच्या शरीरात किती गोलकृमी असतात हे पोटात गेलेल्या वर्धनक्षम अंड्यांच्या किंवा डिंभांच्या संख्येवर अवलंबून असते. शरीरात मोजक्याच गोलकृमी असल्यास आश्रयदात्याला कळतसुद्धा नाही. पण, या गोलकृमींचे प्रमाण वाढल्यास गंभीर आंत्ररोध निर्माण होऊ शकतो.
आंत्र परोपजीवींची काही सर्वसामान्य लक्षणे म्हणजे पोटदुखी, मळमळ, भूक मरून जाणे, पोट फुगणे, शिणवटा आणि दीर्घकालीन, गंभीर स्वरूपी अपचन, अतिसार किंवा बद्धकोष्ठता. यांशिवाय वजन घटणे, बरोबर झोप न लागणे, खाज सुटणे, श्वास घेताना घरघरणे आणि ताप ही देखील परोपजीवींची लक्षणे आहेत. अर्थात, ही इतर अनेक रोगांचीही लक्षणे असू शकतात. पण, अनेकदा मल परीक्षा करून परोपजीवींचे निदान लावले जाऊ शकते.
अचूक निदान करणे अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ, शरीरामध्ये गोलकृमींसारखेच इतर प्रकारचे परोपजीवी देखील असल्यास प्रथम गोलकृमींवर उपचार करणे जरूरीचे असते. का? कारण, काही औषधे कृमींना नष्ट न करता त्यांना कदाचित फक्त चीडवतील. त्यामुळे हे कृमी शरीराच्या दुसऱ्या भागात स्थानांतर करून जबर हानी पोहंचवू शकतात.
उपचारापेक्षा प्रतिबंध बरा
परोपजीवींना नष्ट करण्यासाठी परिणामकारक औषधोपचार उपलब्ध असला तरीसुद्धा त्यांचा संसर्ग होऊ न देणेच सगळ्यात चांगले. तर मग, तुम्ही परोपजीवींपासून आपल्या शरीराचे संरक्षण कसे करू शकता?
एक सर्वोत्तम संरक्षक उपाय म्हणजे स्वच्छता. मलोत्सर्जन उघड्यावर टाकले जाऊ नये. विहीर, नळ इत्यादींपासून शौचालये सुरक्षित अंतरावर असावीत. मानवी विष्ठेचा खत म्हणून उपयोग केला जाऊ नये. योग्य शारीरिक स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. या शिवाय मुलांना चिखल, माती खाऊ देऊ नये. कुटुंबातील एका मुलाच्या पोटांत परोपजीवी असल्याचे समजताच, सर्व कुटुंबियांनी तपासणी करून घेणे चांगले राहील.
तसेच, अन्नपदार्थ विकत घेताना किंवा तयार करताना देखील काळजी घेणे जरूरीचे आहे. स्वच्छ परिसरांत उत्पन्न होणारे पदार्थच विकत घ्या. मांस पूर्णपणे शिजवा. कच्चे मांस कधीच खाऊ नये. कच्ची फळे आणि भाज्या आधी चांगल्या धुऊन स्वच्छ करा. पण, हे वापरलेले पाणी दूषित झाल्याची शक्यता असल्यामुळे ते पुन्हा वापरू नये.
पाणी चांगले उकळून घ्या. थंड झाल्यावर त्यात पुन्हा ऑक्सिजन आणण्यासाठी पाणी वायुमिश्रित केले जाऊ शकते. आजकाल घराघरांतून वापरले जाणारे पाण्याचे अधिकतर फिल्टर्स सर्व परोपजीवी नष्ट करत नाहीत. बाजारात विकले जाणारे बाटलीबंद पाणी कितपत शुद्ध असते हे ज्या कारखान्यांत या बाटल्या तयार केल्या जातात तेथील स्वच्छतेवर अवलंबून असते.
प्रवास करताना किंवा बाहेरचे काही खाताना तर आणखीनच दक्षता बाळगण्याची गरज आहे. बाटलीबंद किंवा डबाबंद पेयांत बर्फ घातलेला नसल्यास ती सहसा सुरक्षित असतात. काही परोपजीवी गोठण तापमानांतही जिवंत राहात असल्यामुळे ज्या पाण्यापासून बर्फ बनवला जातो ते शुद्ध नसल्यास तो बर्फही सुरक्षित नसतो. रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या बाबतीतही काळजी बाळगली जावी. कलिंगडच्या किंवा अननसाच्या फोडी पाहून तोंडाला पाणी सुटेल खरं; पण, ताजे रसरशीत दिसण्यासाठी त्यांवर वारंवार पाणी—कधीकधी दूषित पाणीही शिंपडले जाते. तेव्हा सांभाळा! पण इतकी देखील धास्ती लावून घेऊ नका की प्रवासाची मजाच पार गमावून बसाल. वाजवी दक्षता घेतल्यास, परोपजीवींपासून बऱ्याच प्रमाणात तुम्ही सुरक्षित राहू शकाल.
[२४ पानांवरील चित्र]
एक सर्वोत्तम संरक्षक उपाय म्हणजे स्वच्छता
[२५ पानांवरील चित्र]
ज्या पाण्यापासून बर्फ बनवला जातो ते पाणी शुद्ध नसल्यास तो बर्फही सुरक्षित नसतो
[२५ पानांवरील चित्रं]
अमीबा आणि कृमी हे दोन प्रकारचे परोपजीवी आहेत
[चित्राचे श्रेय]
DPDx, the CDC Parasitology Website