यहोवाला आपला भावविषय बनवा
“यहोवावर भाव ठेव व सदाचाराने वाग; . . . यहोवाच्या ठायी तुला पूर्णानंद होवो.”—स्तोत्रसंहिता ३७:३, ४.
१, २. (अ) पहिल्या शतकात ज्यांनी यहोवावर भाव ठेवला नाही व ज्यांनी ठेवला त्यांचे काय झाले? (ब) आमच्या काळातील धर्माबद्दल कोणता प्रश्न विचारता येईल?
आमच्या समान शकाच्या पहिल्या शतकात यहुदी धर्मनेते देवाची भक्ती करीत असल्याचा दावा करीत होते. पण त्यांचा त्याच्यावर भाव नव्हता. त्यांनी त्याच्या आज्ञा अवमानिल्या व त्याच्या प्रतिनिधींचा छळ केला. (मत्तय १५:३; योहान १५:२०) याचा परिणाम, यहोवाने ‘त्यांचे घर धिक्कारण्यात’ झाला. (मत्तय २३:३८) इ. स. ७० मध्ये रोमी सैन्यांने यरुशलेम व त्याच्या मंदिराचा नाश करुन धर्मनेते व त्यांच्या अनुयायांच्या जीवनाची मोठी हानी घडवून आणली. तथापि, यहोवावर भाव ठेवणाऱ्यांना संरक्षण प्राप्त झाले, कारण त्यांनी त्याच्या प्रवक्त्याकडील इशारा लक्षात ठेवला होता व सुरक्षित जागी पलायन केले होते.—मत्तय २४:१५-२२; लूक २१:२०-२४.
२ आज या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसात या जगाचे धर्म खरा देव यहोवा याजवर भाव ठेवत आहेत का? ते त्याच्या आज्ञांचे पालन करुन त्याच्या इच्छेप्रमाणे वागत आहेत का, किंवा ते, देवाने पहिल्या शतकात ज्यांना धिक्कारले होते त्या धर्मनेत्यांचे अनुकरण करीत आहेत? “यहोवावर भाव ठेव[तात] व सदाचाराने वाग[तात]” म्हणून आज कोणत्या धर्मास यहोवाकरवी संरक्षण प्राप्त होण्याची हमी आहे?—स्तोत्रसंहिता ३७:३.
बंधुप्रेम कोठे आहे?
३. शांती आणण्यामध्ये धर्मांनी केलेले प्रयत्न का अपयशी ठरले?
३ पोप जॉन पॉल २ यांनी “सबंध मानवजात आपल्या बचावाविषयी मोठ्या धोक्यास सामोरी आहे” असा इशारा देऊन बराच काळ लोटला नसेल. “हा धोका विभिन्न धार्मिक गटाच्या एकोप्याने चांगल्या प्रकारे परतवून लावता येईल” असेहि त्यांनी प्रतिपादिले. ते म्हणाले की, धर्म पुढाऱ्यांनी “शांती व समेटासाठी एकत्रपणे कार्य केले पाहिजे” ही देवाची इच्छा आहे. पण जर तशी देवाची इच्छाच होती तर मग त्याने या अनुषंगाने इतक्या शतकात जे प्रयत्न करण्यात आले ते का आशीर्वादित केले नाहीत बरे? त्याने हा आशीर्वाद न देण्याचे कारण की या धर्मांनी शांती ही देवाच्या राज्याकरवी येऊ शकते याविषयी देवाच्या मार्गावर भाव व्यक्त केला नाही. (मत्तय ६:९, १०) उलटपक्षी, त्यांनी राष्ट्रांच्या राजकारणाला व युध्दांना आपले पाठबळ दर्शविले. याचा परिणाम हा झाला की युध्दकाळात एका राष्ट्राच्या धर्म जोपासणाऱ्या लोकांनी दुसऱ्या राष्ट्राच्या धर्माच्या लोकांची कत्तल केली व कधी कधी तर ही कत्तल दुसऱ्या देशातील आपलाच धर्म जोपासणाऱ्यांची केली. कॅथोलिकांनी कॅथोलिकांना ठार केले, प्रॉटेस्टंटांनी प्रॉटेस्टंट लोकांना ठार केले, असेच इतर धर्माच्या लोकांनीही केले. पण देवाची सेवा करीत आहोत असा दावा करणारे खरे आध्यात्मिक बांधव एकमेकांस कधी ठार करतील का?
४. खऱ्या धर्माच्या दर्जाबद्दल येशूने काय म्हटले व ही “नवी आज्ञा” का होती?
४ येशूने आपल्या अनुयायांना हे सांगून खऱ्या धर्माविषयीचा दर्जा प्रस्थापित केलाः “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) तद्वत, जे खऱ्या धर्माचे पालन करीत आहेत अशांनी एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. ही “नवी आज्ञा” होती ती या अर्थी की, “जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी,” असे येशूने म्हटले. आपल्या अनुयायांसाठी तो आपले जीवनसुध्दा देण्यास तयार होता. तेव्हा त्यांनीही असेच करण्याची इच्छा धरली पाहिजे—आपल्या समविश्वासूंचे जीवन घेणे नव्हे, तर जरुर भासल्यास त्यांच्यासाठी आपला जीवही द्यायची त्यांची तयारी असली पाहिजे. यात ते नवेपण होते कारण ही गोष्ट मोशेच्या नियमशास्त्रात अपेक्षिली गेली नव्हती.
५. देवाच्या खऱ्या उपासकांमध्ये प्रीती व ऐक्यता असण्याच्या गरजेविषयी देवाचे वचन कसे जोरदार भाष्य करते?
५ देवाचे वचन म्हणतेः “‘मी देवावर प्रीती करतो’ असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो कोणी प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरहि प्रीती करावी ही त्याची आपल्याला आज्ञा आहे.” (१ योहान ४:२०, २१) अशा प्रेमामुळे जे यहोवावर भाव ठेवतात ते खरे आंतरराष्ट्रीय ऐक्य जोपासतात. प्रेषित पौल करिंथकरांस पहिले पत्र १:१० मध्ये म्हणतोः “बंधुजनहो, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हास विनंति करतो की तुम्हा सर्वांचे बोलणे एकसारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत. तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.”—तसेच १ योहान ३:१०-१२ देखील पहा.
६. “मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे,” असे यहोवाचे साक्षीदार का म्हणू शकतात?
६ द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ म्हणते की, दुसऱ्या जागतिक महायुध्दात ५ कोटी ५० लाख लोकांची हत्या झाली. ही हत्या यहोवाच्या साक्षीदारांव्यतिरिक्त इतर प्रमुख धर्मांच्या लोकांनी घडविली. यहोवाच्या कोणाही साक्षीदाराने कोणासही ठार केले नाही कारण एकमेकांवर प्रीती करावी आणि राष्ट्रांच्या युध्दात समाविष्ट होण्याचे नाकारावे ही आज्ञा त्यांनी पाळली. आपल्या या तटस्थ भूमिकेमुळे काही साक्षीदारांना मृत्यु पत्करावा लागला तरीही ते प्रेषित पौलाप्रमाणेच म्हणू शकलेः “मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे.”—प्रे. कृत्ये २०:२६.
७, ८. चर्चसोबत संबंध राखणारे आपल्या रक्तदोषाची कबुली कशी देतात?
७ जपानवर १९४५ मध्ये अणुबॉम्ब टाकणाऱ्या वायुसेनेच्या कॅथोलिक धर्मपुरोहिताने अलिकडेच म्हटलेः “गेल्या १,७०० वर्षांपासून चर्चने युध्दाला मोठे आदराचे स्थान दिले आहे. युध्दात सहभागी होणे हे सन्माननीय ख्रिस्ती कार्य आहे असे त्याने लोकांना मानावयास लाविले आहे. पण हे खरे नाही. आमचा बुध्दीभ्रंश करण्यात आला आहे. . . . न्यायी युध्दाचे शुभवर्तमान हे असे आहे की जे येशूने कधीच शिकविले नाही. . . . येशूचे जीवन वा त्याच्या शिक्षणात असे कोठेच आढळत नाही की, अण्वस्त्राकरवी लोकांना भस्मसात करणे हे बेकायदेशीर असले तरी जाळपोळ करुन लोकांना भस्मसात करणे हे कायदेशीर आहे.”
८ लंडनच्या कॅथोलिक हेरल्ड ने म्हटलेः “आरंभीच्या ख्रिश्चनांनी . . . येशूचे शब्द अंतःकरणपूर्वक मानले आणि मृत्युची शिक्षा होती तरी रोमी सैन्यात भरती होण्याचे नाकारले. चर्च या मूळ दर्जास टिकून राहिले असते तर आज इतिहास वेगळा दिसला नसता का? . . . युध्दाचा निषेध सर्व चर्चेसनी संगनमताने केला . . ., म्हणजे चर्चच्या प्रत्येक सभासदाने ख्रिस्ती राहण्याची निष्ठा बाळगली, युध्दाला नकार दर्शविण्याची निर्धारपूर्वक प्रतिज्ञा केली तर शांतीची अपेक्षा निश्चितपणे करता येईल. पण, असे काही घडणार नाही हे आपल्याला माहीत आहे.”
९. या जगाच्या धर्मांना यहोवाने त्यागले आहे असे निदान आम्ही का काढू शकतो?
९ अशाप्रकारे या जगाच्या धर्मांनी देवाच्या वचनाला पार धुडकावून लावले आहे. जसे परुशी करीत होते त्याचप्रमाणे हेही लोक देवावर आपला भाव ठेवीत नाही. “आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात; परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.” (तीतास १:१६) त्यामुळेच देवाने जसे पहिल्या शतकातील दांभिक यहुदी धर्माचा निश्चितपणे त्याग केला होता त्याचप्रमाणे त्याने या जगाच्या धर्मांचाहि धिक्कार केला आहे.—मत्तय १५:९, १४.
यहोवावर भाव ठेवण्यामुळे बचाव
१०, ११. यरुशलेमाने शरणागति पत्करावी अशी अश्शुरने मागणी केली त्यावेळी हिज्कीया राजाने काय केले, आणि सन्हेरीबचा प्रवक्ता कोणाचा उपमर्द करीत होता?
१० या जगाच्या समस्यांच्या बाबतीत मानवी उपाय योजनांवर आपली भिस्त ठेवू नका. उलटपक्षी, जो आपली अभिवचने पुरी करुन दाखवितो त्या देवावर आपला भाव ठेवा. (यहोशवा २३:१४) याचे उदाहरण पाहण्यासाठी ख्रिस्तयुगापूर्वी आठव्या शतकात काय घडले ते लक्षात घ्या. हे यहुदाचा राजा हिज्कीया याच्या काळी घडले. पवित्र शास्त्र याच्याविषयी म्हणते की, “त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे तो यहोवाच्या दृष्टीने जे ठीक ते करी.” (२ राजे १८:३) याच्या कारकीर्दीत अश्शुर हे प्रबळ जागतिक साम्राज्य यरुशलेमावर चाल करुन आले. अश्शुरी राजा सन्हेरीब याच्या प्रवक्त्याने यरुशलेमाला असे बोलून शरणागति पत्करण्यास सांगितलेः “राजा म्हणतोः ‘हिज्कीयास तुम्हाला भुरळ घालू देऊ नका; त्याच्याने तुमचा माझ्या हातून बचाव व्हावयाचा नाही. . . . हिज्कीया तुम्हास यहोवावर भिस्त ठेवण्यास न लावो.’”—२ राजे १८:२९, ३०.
११ यावेळी हिज्कीयाने काय केले? पवित्र शास्त्र सांगतेः “हिज्कीयाने यहोवाची प्रार्थना केलीः ‘हे यहोवा, इस्त्राएलाच्या देवा, करुबारुढ असलेल्या देवा, तूच कायतो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा खरा देव आहेस. तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. हे यहोवा कान लावून ऐक. हे यहोवा डोळे उघडून पहा आणि सन्हेरिबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठविला आहे त्याचे शब्द ऐक. . . . हे यहोवा आमच्या देवा त्याच्या हातातून आम्हाला सोडीव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व रा जाणतील की तूच कायतो यहोवा देव आहेस.”—२ राजे १९:१५-१९.
१२. यहोवाने हिज्कीयाच्या प्रार्थनेचे कसे उत्तर दिले?
१२ यहोवाने ही प्रार्थना ऐकली व त्याने यशया संदेष्ट्याला हिज्कीयाकडे हे सांगायला पाठविलेः “अश्शुरच्या राजाविषयी यहोवा म्हणतोः ‘तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन त्याजशी सामना करणार नाही.’” तर मग हिज्कीयाने अश्शुरचा सामना करावयाला पुढे यावयाचे होते का? नाही, त्याला केवळ यहोवावर आपला भाव ठेवायचा होता व तो त्याने ठेवला. याचा परिणाम काय दिसला? “यहोवाच्या देवदूताने जाऊन अश्शुरी गोटातले एक लक्ष पंचायशी हजार लोक मारिले.” यहोवास व त्याच्या लोकांस टोमणा दिल्यामुळे सन्हेरिबाला स्वतः जाब द्यावा लागला, कारण त्याच्याच मुलांनी त्याला ठार केले. यहोवाने सांगितले त्याप्रमाणे यरुशलेमाविरुध्द एकही शस्त्र उगारण्यात आले नाही.—२ राजे १९:३२-३७.
१३, १४. सर्व राष्ट्रांमधून सामोऱ्या आलेल्या लोकांचा या सद्य व्यवस्थीकरणाच्या अंतामधून कशाच्या आधारावर बचाव होईल?
१३ आमच्या काळीही असेच काही घडेल. यहोवावर भाव ठेवणारे या जगाने दिलेले टोमणे व त्याचा होणारा अंत यातून निभावतील. “ज्यांस तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण हे यहोवा जे तुझा शोध करतात त्यास तू खचित टाकून देणार नाहीस.” (स्तोत्रसंहिता ९:१०) तथापि, या रक्तपाती जगाचा नाश करण्याआधी यहोवा प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना सुरक्षिततेकरता त्याच्यापाशी येण्याचे निमंत्रण देतो. हा सर्व राष्ट्रातून सामोरा आलेला “मोठा लोकसमुदाय” आहे व तो “मोठ्या संकटातून” बचाव मिळवतो. ते यहोवावर भाव ठेवीत असल्यामुळे व त्याची “अहोरात्र” सेवा करीत असल्यामुळे या व्यवस्थीकरणाच्या अंतामधून वाचतील.—प्रकटीकरण ७:९-१५.
१४ हेच लोक, आज जगभरात जी हाक निनादत आहे त्याला प्रतिसाद देत आहेत. याविषयीचे भाकित यशया २:२, ३ मध्ये असे करण्यात आले होतेः “शेवटल्या दिवसात असे होईल की, यहोवाच्या मंदिराचा डोंगर [त्याची खरी उपासना] . . . स्थापण्यात येईल. . . . देशोदेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतीलः ‘चला, आपण यहोवाच्या पर्वतावर . . . चढून जाऊ, तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.’” ४थे वचन म्हणतेः “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करतील; आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही ते इतःपर युध्दकला शिकणार नाहीत.”
१५. यशया २:२-४ चा भविष्यवाद कोण पूर्ण करीत आहेत व कसा?
१५ आज, आमच्या काळी कोण ‘तरवारी मोडून त्यांचे फाळ करीत आहेत’? कोण ‘युध्दकला शिकत नाहीत’? सबंध पृथ्वीभरातील आपल्या आध्यात्मिक भाऊ व बहिणींकरता कोण अतूट प्रेम व्यक्त करीत आहेत व कोण आपसात ऐक्याने राहात आहेत? कोण यहोवावर खरेपणाने भाव ठेवीत आहेत व कोण इतरांना तसे करण्यास सांगत आहेत? आमच्या काळातील वस्तुस्थिती याचे केवळ एकच उत्तर असल्याचे सांगते व ते म्हणजे, यहोवाचे साक्षीदार. ते हिज्कीया राजाप्रमाणे संपूर्ण अंतःकरणाने यहोवावर आपला भाव ठेवतात आणि त्याच्या आज्ञांचे पालन करुन तो भाव व्यक्त करीत आहेत.
तेजोमय भवितव्य
१६, १७. यहोवावर भाव ठेवणाऱ्यांना तो कसले तेजोमय भवितव्य देणार?
१६ यहोवावर भाव ठेवणाऱ्यांना तो, या जुन्या जगाच्या समाजाचे उच्चाटन करुन त्याऐवजी नव्याची प्रस्थापना करील तेव्हा कल्पना करता येणार नाही इतके तेजोमय भवितव्य बहाल करील. या पृथ्वीवरील नव्या जगात कसलीही भीती किंवा अविश्वास, दारिद्र्य, अन्याय आणि गुन्हेगारी राहणार नाही. पुढे कोणाही युध्दाद्वारे किंवा गर्भपाताद्वारे हत्या करण्यात येणार नाही. प्रकटीकरण २१:४ असेहि अभिवचन देतेः “यापुढे मरण हे नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत.”
१७ काही काळातच ही पृथ्वी, येशूने वचन दिले त्याप्रमाणे नंदनवन बनेल. (लूक २३:४३) शिवाय मरण नाहीसे झाल्यामुळे यहोवावर भाव ठेवणारे या नंदनवनात सदासर्वदा राहतील. त्यावेळी मीखा ४:४ याची संपूर्ण पूर्णता होईलः “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील; कोणी त्यांस घाबरविणार नाही.” जरा विचार करा की तुम्ही अशा समाजात राहात आहात जेथे तुम्हाला भेटणारा प्रत्येकजण असा आहे की ज्याच्यावर तुम्ही आपला विश्वास टाकू शकता! हे असे का घडेल? कारण यशया ५४:१३ म्हणतेः “तुझी सर्व मुले यहोवापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.”
१८. यहोवावर भाव ठेवणारे आता देखील कोणते लाभ मिळवीत आहेत?
१८ तथापि, आता देखील जगभरात लाखो यहोवाचे साक्षीदार त्याच्यावर भाव ठेवण्याद्वारे लाभ मिळवीत आहेत. उदाहरणार्थ, यहोवाचे कायदे व तत्वे यांचे पालन केल्यामुळे यहोवाचे सेवक आज तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगापासून अलिप्त आहेत. नैतिकदृष्ट्या शुध्द अशा वातावरणात जीवन व्यतित करीत असल्यामुळे त्यांना जगभरात सर्वसाधारणपणे दिसणारे लैंगिक आजार, एडस् यासारख्या रोगांची भीती नाही. ते मादक औषधाच्या गैरवापराच्या आहारी जात नसल्यामुळे मादक औषधे सेवन करणाऱ्यांना ज्या मनास इजा देणाऱ्या व मरणप्राय आघात आणणाऱ्या पीडा सतावतात त्यापासून सुरक्षित आहेत. शिवाय ते रक्त संक्रमण स्विकारीत नाहीत त्यामुळे संक्रमणाद्वारे रक्तात यकृत रोगासारखे जे प्राणघातक आजार शिरतात व जे एकतर जीव घेतात वा कायमचे अधू करतात त्याच्या संपर्कात येत नाहीत. अशा या रोगामुळे नुसत्या अमेरिकेत दर वर्षी दहा हजार रक्त संक्रमित करणारे दगावतात.
१९. यहोवाची सेवा करणाऱ्यांना सध्या मृत्यु मिळाला तरी तो त्यांची कशी सुटका करील?
१९ यहोवावर भाव ठेवणारे काहीजण वृध्दापकाळ, आजार वा एखाद्या अपघातात दगावले तरीही यहोवा त्यांची सुटका करील. तो त्यांना पुनरुत्थान देऊन ही सुटका देईल. या कारणास्तव प्रेषित पौल आम्हाला हे उत्तेजन देतो की, “आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरवसा ठेवावा.”—२ करिंथकर १:९.
यहोवा आपल्या सेवकांना उंचावतो
२०, २१. (अ) येशूच्या बाबतीत जे घडले ते पाहता आम्हालाही कोणत्या विरोधाची अपेक्षा धरता येईल? (ब) यहोवाने येशूला जसे उंचाविले तसे तो आपल्या लोकांना कसे उंचावील?
२० “सगळे जग त्या दुष्टाला [दियाबल सैतान] वश झाले आहे” हे ध्यानात ठेवा. (१ योहान ५:१९) त्यामुळेच तुम्ही देवावर भाव ठेवता तर सैतान व त्याचे जग तुमचा विरोध करीत राहील. तुमची थट्टा करण्याने वा तुम्हावर छळ आणण्याने ते हा भाव निष्फळ करु पाहतील. हेच येशूच्या बाबतीत देखील घडले. त्याला वधस्तंभी खिळल्यानंतर, “जवळून जाणारे डोकी हलवीत त्याची अशी निंदा करीत होते की, ‘तू देवाचा पुत्र असलास तर . . . वधस्तंभावरुन खाली ये!’ तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करीत म्हणालेः ‘त्याने दुसऱ्यांना वाचविले, त्याला स्वतःला वाचविता येत नाही! . . . तो देवावर भरवसा ठेवितो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे.’”—मत्तय २७:३९-४३.
२१ तीन दिवसांनी देवाने येशूला मृतातून पुनरुत्थित करुन त्याची खरीच सुटका केली. पण त्या थट्टा करणाऱ्यांच्या पीढीतील काहींना रोमी सैन्याने ठार केले तर काहींना दास्यत्वात नेले. आता ख्रिस्त हा देवाच्या राज्याचा राजा आहे व तोच पुनरुत्थानाच्या कार्यावर देखरेख ठेवील तेव्हा त्या थट्टेखोरांचे पुनरुत्थान झालेच तर यांना दोन हजार वर्षांआधी ज्याची त्यांनी थट्टा केली होती त्याच्यापुढे आपली शिरे नमवावी लागतील! होय, यहोवा आपल्या सेवकांना उंचावतो कारण त्यांनी हे दृढपणे घोषित केलेले आहे की, “देवावर मी भरवसा ठेविला आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”—स्तोत्रसंहिता ५६:११.
२२. यहोवावर भाव ठेवणाऱ्यांच्या बाबतीत व जे भाव ठेवीत नाहीत त्यांच्याबद्दल तो काय घोषित करतो?
२२ आपल्या सेवकांच्याबाबतीत यहोवा हे घोषित करतोः “जो पुरुष यहोवावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषय यहोवा आहे तो धन्य! तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळ देण्याचे सोडणार नाही.” याचप्रमाणे यहोवा असेही घोषित करतोः “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहु करतो व ज्याचे अंतःकरण यहोवापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल; व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही.”—यिर्मया १७:५-८.
२३. आम्हाला सार्वकालिक जीवन हवे आहे तर आम्ही काय केले पाहिजे?
२३ तद्वत, या कठीण समयात ‘यहोवावर भाव ठेवा व सदाचाराने वागा, पृथ्वीवर वसती करुन राहा व इमानाने चाला; यासोबत यहोवाठायी पूर्णांनंद करा म्हणजे तो तुमचे मनोरथ पूर्ण करील.’ (स्तोत्रसंहिता ३७:३, ४) तुम्ही देवावर भाव ठेवता म्हणून त्याने वचन दिलेल्या नीतीमान नव्या जगातील सार्वकालिक जीवन आपल्याला मिळावे असा जो तुमचा मनोरथ आहे तो सफळ होवो.
उजळणीचे प्रश्न
◻यहोवावर भाव ठेवणाऱ्यांनी कोणत्या दर्जाचे पालन केले पाहिजे?
◻या जगातील धर्म यहोवावर भाव ठेवण्याचे शिकवितात का?
◻हिज्कीया राजाने यहोवावर ठेवलेला भाव कसा बहुमानित झाला?
◻आमच्या काळात यशया २:२-४ चा भविष्यवाद कसा पूर्ण होत आहे?
◻यहोवावर भाव ठेवणाऱ्यांना कशा प्रकारचे भवितव्य मिळणार?
[१७ पानांवरील चित्रं]
अश्शुरच्या राजाच्या प्रवक्त्याने यहोवाचा उपमर्द केला आणि यरुशलेमाने शरणागति घ्यावी अशी मागणी केली
[१८ पानांवरील चित्रं]
यहोवावर भाव ठेवणारे नव्या जगात पूर्ण स्वरुपाची शांती व निर्भयता अनुभवतील