तरुणांच्या मृत्यूची शोकांतिका
“मला वाटतंय आमची ही पिढी मरून नाहीशी होतेय.”—यु.एस.ए., कनेटीकट येथील विद्यापीठातील १८ वर्षांची नवखी, जोहॅना पी.
ऑस्ट्रेलियाच्या हद्दीतल्या टास्मानिया बेटाची राजधानी असलेल्या होबार्ट शहराबाहेर एका शेतमळ्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी एक भयाण दृश्य पाहिले. त्या घरात १० ते १८ वर्षांदरम्यानच्या चार मुली होत्या. सगळ्या ठार होऊन पडलेल्या; त्यांच्या वडिलांनीच त्यांना ठार मारले होते आणि स्वतःच्याही डोक्यात गोळी झाडून तेही बाजूलाच पडलेले होते. त्यांनी आपला उजवा हात कुऱ्हाडीने कापून टाकला होता. या खून-आत्महत्या प्रकरणाने सबंध टास्मानियाच्या लोकांमध्ये खळबळ माजली होती. हे का घडले असे कोडे लोकांसमोर पडले. त्या निष्पाप चौघीच का?
प्रतिज्ञेवर मुक्त केलेल्या एका बलात्कारी व्यक्तीने सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यावर त्यातील चौघींचा खून केला. बेल्जियम अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. त्यांच्याही समोर तेच कोडे—का? अर्जेंटिनात ३०,००० लोकांचा डर्टी वॉर असे नाव पडलेल्या युद्धात बळी पडला; यातले बहुतेक आपली लेकरे होती असे काही मातांना ठामपणे वाटते.a यांतल्या काही दुर्दैवी लोकांचा छळ केला, त्यांना मादक औषधे दिली मग विमानाने समुद्रावर नेले आणि समुद्रात अक्षरशः फेकून दिले. त्यातले अनेकजण जिवंतच होते. त्यांच्यावर असे मरण का ओढवले? त्यांच्या माता अजूनही जबाब मागत आहेत.
सन १९५५ मध्ये मातांच्या जागतिक परिषदेने, युद्धे निरर्थक आहेत असा दोष लावला आणि त्यांची ही परिषद “एक मोठी कळकळीची याचना आहे, युद्धांच्या दुष्परिणामांपासून आणि तयारीपासून आपल्या लहान-मोठ्या लेकरांचे रक्षण करायला झटणाऱ्या सगळ्या स्त्रियांची ही इशारेवजा कळकळच आहे” असे घोषित केले. पण उलट, त्या परिषदेनंतर झालेल्या रक्तपाती संघर्षांमध्ये बळी पडलेल्या युवकांची संख्या जगभरात वाढतच चालली आहे—मानवाचे भविष्य घडवू शकणारी पिढीच्या पिढीच नष्ट झाली.
तरुणांच्या मृत्यूचा दीर्घ इतिहास
इतिहासाची पाने कोवळ्या मुलांच्या रक्ताने अगदी माखलेली आहेत. आपल्या तथाकथित अतिप्रगत २० व्या शतकातही, जातीय आणि वंशीय संघर्षांमध्ये मुख्यतः युवकांचेच बळी पडले आहेत. जणू या तरुणांना आपल्या वाडवडिलांच्या चुकांची आणि आकांक्षांची भरपाई करावी लागते—स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन.
एका आफ्रिकन देशात, स्वतःला प्रभूची सेना म्हणवणाऱ्या तरुणांच्या एका धर्मवेड्या गटातील सदस्यांच्या मनावर असे बिंबवण्यात आले आहे की, गोळ्यांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होऊ शकत नाही, असे द न्यू रिपब्लिक पत्रिका अहवाल देते. म्हणूनच, त्या लेखाचे शीर्षक होते, “तरुणांची मरुभूमी”! ज्या कुटुंबातील मुले-मुली यात दगावली—जी खरोखर बुलेटप्रुफ नव्हती—त्या कुटुंबियांनी साहजिकच प्रश्न केला: आमचीच मुले-मुली का दगावली? काय निष्पन्न झाले त्यातून?
या दुःखात आणखी भर आहे ती, आत्महत्या करून मरणाऱ्या तरुणांची.
[तळटीपा]
a तथाकथित डर्टी वॉर किंवा घृणास्पद युद्ध एका लष्करी पक्षाच्या शासनादरम्यान (१९७६-८३) घडले होते; त्यामध्ये विद्रोही असल्याचा संशय असलेल्या हजारो लोकांना ठार मारण्यात आले होते. इतर अंदाजांनुसार १०,००० ते १५,००० लोक बळी पडले.