‘पवित्र शक्तीमुळे उत्पन्न होणारी एकता टिकवून ठेवा’
प्रेषित पौलने इफिसमधल्या ख्रिश्चनांना असं प्रोत्साहन दिलं: “प्रेमाने एकमेकांचं सहन करा. तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या शांतीच्या बंधनात, पवित्र शक्तीमुळे उत्पन्न होणारी एकता टिकवून ठेवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा.”—इफिस. ४:२, ३.
देवाच्या पवित्र शक्तीमुळेच आपल्यात एकता आहे. पण असं असलं तरी, पौलने सांगितलं की ही एकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. याचाच अर्थ, ‘एकमेकांशी बांधून ठेवणारं शांतीचं बंधन’ टिकवून ठेवणं ही आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे.
समजा, कोणीतरी तुम्हाला एक गाडी भेट म्हणून दिली. मग ती गाडी चांगल्या प्रकारे वापरण्याची जबाबदारी कोणाची आहे? नक्कीच तुमची. जर तुम्ही ती गाडी नीट वापरली नाही आणि ती खराब झाली तर कोण जबाबदार असेल? ती गाडी भेट म्हणून देणारा की तुम्ही?
त्याच प्रकारे, आपल्यातली एकता जरी देवाकडून मिळालेली भेट असली, तरी ती टिकवून ठेवायची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे एखाद्या भावाशी किंवा बहिणीशी आपलं पटत नसेल, तर आपण स्वतःला विचारू शकतो: ‘आमच्यातले मतभेद सोडवायला आणि एकता टिकवून ठेवायला मी होईल तितके प्रयत्न करतोय का?’
“एकता टिकवून ठेवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा”
पौलने म्हटलं, की एकता टिकवून ठेवण्यासाठी कधीकधी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. एखादा भाऊ किंवा बहीण आपलं मन दुखावते तेव्हा खासकरून आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. मग एकता टिकवून ठेवण्यासाठी काय करायची गरज आहे? आपल्याला खटकलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दल आपण भाऊबहिणींशी बोलणं योग्य ठरेल का? हे गरजेचं नाही. त्याऐवजी आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मी जर जाऊन बोललो तर एकता टिकून राहील की भांडण आणखी वाढेल?’ कधीकधी छोट्या-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आणि समोरच्याला माफ करण्यातच शहाणपण असतं.—नीति. १९:११; मार्क ११:२५.
स्वतःला विचारा: ‘मी जर त्या भावाशी जाऊन बोललो, तर एकता टिकून राहील की भांडण आणखी वाढेल?’
प्रेषित पौलने सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी “प्रेमाने एकमेकांचं सहन” करत राहिलं पाहिजे. (इफिस. ४:२) एका संदर्भात म्हटल्याप्रमाणे या शब्दांचा अर्थ, “इतरांना आहे तसं स्वीकारणं” असासुद्धा होऊ शकतो. म्हणजेच, आपल्यासारखंच आपले भाऊबहीणसुद्धा अपरिपूर्ण आहेत ही गोष्टी आपण मान्य केली पाहिजे. हे खरंय की आपण सगळेच “नवीन व्यक्तिमत्त्व धारण” करायचा प्रयत्न करत आहोत. (इफिस. ४:२३, २४) पण अपरिपूर्णतेमुळे आपल्यापैकी कोणालाही ते पूर्णपणे करणं शक्य नाही. (रोम. ३:२३) आपण ही गोष्ट जर मान्य केली, तर आपल्याला एकमेकांचं सहन करायला, एकमेकांना माफ करायला आणि असं करून आपल्यातली ‘एकता टिकवून ठेवायला’ सोपं जाईल.
भाऊबहीण आपलं मन दुखावतात तेव्हा त्यांना माफ केल्यामुळे आपल्याला ‘एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या शांतीच्या बंधनात’ राहणं शक्य होतं. इफिसकर ४:३ मध्ये ‘बांधून ठेवणारं बंधन’ यासाठी ग्रीक भाषेत जो शब्द वापरण्यात आलाय, त्याला कलस्सैकर २:१९ मध्ये “अस्थिबंधनं” असं म्हटलंय. ज्याप्रमाणे अस्थिबंधनं हाडांना एकमेकांशी घट्ट धरून ठेवतात, त्याचप्रमाणे आपल्यातली शांती आणि प्रेम, आपल्यात मतभेद असतानाही भाऊबहिणींसोबतचं आपलं नातं घट्ट ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतात.
म्हणून जेव्हा भाऊबहीण आपलं मन दुखावतात, आपल्याला चीड आणतात किंवा आपल्याला निराश करतात, तेव्हा त्यांच्या चुकांकडे लक्ष देण्याऐवजी आपण त्यांच्याशी दयाळूपणे वागलं पाहिजे. (कलस्सै. ३:१२) अपरिपूर्ण असल्यामुळे आपणही कधी न् कधी इतरांचं मन नक्कीच दुखावलं असेल. आपण जर ही गोष्ट लक्षात ठेवली तर आपल्याला नेहमी ‘पवित्र शक्तीमुळे उत्पन्न होणारी एकता टिकवून ठेवायला’ मदत होईल.