युद्ध आणि संघर्षांचा आपण अंत करू शकतो का?
लोक बऱ्याच कारणांसाठी लढतात. काही जण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी लढतात. तर इतर काही जण एखाद्या प्रदेशावर किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी लढतात. अनेक संघर्ष बऱ्याच काळापासून चालत आलेल्या वांशिक आणि धार्मिक द्वेषामुळे होतात. मग हे संघर्ष थांबवण्यासाठी आणि शांती आणण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत? आणि हे प्रयत्न यशस्वी होतील अशी अपेक्षा आपण करू शकतो का?
Drazen_/E+ via Getty Images
आर्थिक विकास
ध्येय: लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणं. यामुळे आर्थिक असमानता कमी करता येईल किंवा पूर्णपणे काढून टाकता येईल. कारण युद्ध आणि संघर्षाचं हे एक महत्त्वाचं कारण आहे.
हे का कठीण आहे: पैसा खर्च करण्याच्या पद्धतीत जगातल्या सरकारांनी बदल केला पाहिजे. २०२२ मध्ये जगभरात शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी जवळपास २,६८० अब्ज रुपये खर्च करण्यात आले. पण त्याच वर्षी लष्करासाठी जितका पैसा खर्च करण्यात आला, त्याच्या तुलनेत ही रक्कम फक्त ०.४ टक्के इतकीच होती.
“संघर्ष टाळण्यासाठी आणि शांती टिकवून ठेवण्यासाठी जितका पैसा खर्च केला पाहिजे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा आणि साधनसंपत्ती युद्धामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही खर्च करतोय.”—संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव, ॲन्टोनियो ग्युटारेश.
बायबल काय म्हणतं: जगातली सरकारं आणि संघटना गोरगरीबांना मदत तर करू शकतात, पण ते गरिबी पूर्णपणे कधीच काढून टाकू शकत नाहीत.–अनुवाद १५:११; मत्तय २६:११.
आंतरराष्ट्रीय हितसंबंध
ध्येय: दोन्ही बाजूंना फायदा व्हावा म्हणून आपसात बोलून किंवा वाटाघाटी करून वादविवाद टाळणं किंवा ते शांतीने मिटवणं.
हे का कठीण आहे? एक किंवा त्यापेक्षा जास्त पक्ष वाटाघाटी करायला, तडजोड करायला किंवा एखादा करार स्वीकारायला कधीकधी तयार नसतात. शिवाय, शांतीचे करार झाले, तरी ते सहजासहजी मोडले जातात.
“आंतरराष्ट्रीय हितसंबंध नेहमीच टिकून राहतील असं नाही. युद्ध संपवण्यासाठी दोन्ही देशांनी वाटाघाटीने केलेल्या करारात इतके दोष असू शकतात, की त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी चिघळू शकते.”—रेमंड एफ. स्मिथ, अमेरिकन डिप्लोमसी.
बायबल काय म्हणतं: लोकांनी ‘शांती टिकवून ठेवायचा’ प्रयत्न केला पाहिजे. (स्तोत्र ३४:१४) पण आज बरेच लोक “बेइमान, . . . कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, . . . विश्वासघात करणारे आहेत.” (२ तीमथ्य ३:१-४) अशा प्रवृत्तींमुळे प्रामाणिक राजकीय नेत्यांना संघर्ष सोडवणं शक्य होत नाही.
निःशस्त्रीकरण
ध्येय: सगळी, खासकरून आण्विक, रासायनिक आणि जैविक शस्त्रं कमी करणं किंवा ती पूर्णपणे नष्ट करणं.
हे का कठीण आहे: सत्ता गमावण्याची किंवा आपण स्वतःला वाचवू शकणार नाही अशी भीती असल्यामुळे राष्ट्रं निःशस्त्रीकरणाला तयार नसतात. शिवाय, फक्त शस्त्र नाहीशी केल्यामुळे लढायांची कारणं नाहीशी होत नाहीत.
“शीतयुद्धाच्या शेवटी निःशस्त्रीकरणाची बरीच वचनं आणि आश्वासनं देण्यात आली. यामध्ये धोके टाळण्यासाठी व्यावहारिक पावलं उचलण्याचा, आंतरराष्ट्रीय ताणतणाव कमी करण्याचा आणि सुरक्षित जगाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा हेतू होता. पण ही सगळी वचनं आणि आश्वासनं अपूर्णच राहिली आहेत.”—“सेक्युरिंग आवर कॉमन फ्यूचर: ॲन अजेंडा फॉर डिसआर्ममेंट.”
बायबल काय म्हणत: लोकांनी त्यांच्या शस्त्रांचा त्याग केला पाहिजे आणि आपल्या ‘तलवारी ठोकून त्यांपासून नांगरांचे फाळ बनवले’ पाहिजेत. (यशया २:४) पण आणखीही काही गोष्टी गरजेच्या आहेत. कारण हिंसा ही माणसाच्या मनातूनच येते.—मत्तय १५:१९.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सामूहिक संरक्षण
ध्येय: शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी एकमेकांना मदत करणं. यामागे विचार असा आहे, की एकाच वेळी बऱ्याच राष्ट्रांशी युद्ध करावं लागेल या भीतीने कोणतंही शत्रू-राष्ट्र युद्धच सुरू करणार नाही.
हे का कठीण आहे: एकाच वेळी बऱ्याच देशांसोबत युद्ध करावं लागेल अशी भीती निर्माण करून शांती प्रस्थापित होईलच असं नाही. कारण राष्ट्रं नेहमीच दिलेल्या वचनांचं पालन करत नाहीत किंवा शत्रूंविरुद्ध केव्हा आणि कसं पाऊल उचलायचं याबद्दल ते सहमत असतीलच असं नाही.
“राष्ट्रसंघाने (लीग ऑफ नेशन्सने) आणि नंतर संयुक्त राष्ट्रसंघाने बरेच प्रयत्न करून . . . देशांमध्ये युती आणली खरी, पण त्यामुळे युद्धं काही थांबली नाहीत.”—“एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका.”
बायबल काय म्हणतं: सहसा लोक एकत्र येऊन काम करतात, एकमेकांना मदत करतात तेव्हा सुरक्षेची हमी असते. (उपदेशक ४:१२) पण कायम टिकणाऱ्या शांतीसाठी आणि सुरक्षेसाठी आपण मानवी संघटनांवर भरवसा ठेवू शकत नाही. “शासकांवर भरवसा ठेवू नका. माणसावर भरवसा ठेवू नका, कारण तो तारण करू शकत नाही. त्याचा श्वास निघून जातो, तो मातीला मिळतो; त्याच दिवशी त्याच्या विचारांचा शेवट होतो.”—स्तोत्र १४६:३, ४.
बरेच देश एकत्र येऊन शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करत असले, तरी आजसुद्धा संपूर्ण जग युद्धाने ग्रासलेलं आहे