जुलै—जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिकेसाठी संदर्भ
१७-२३ जुलै
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल १८-२०
“यहोवा क्षमा करतो तेव्हा तो पापांची आठवण ठेवतो का?”
(यहेज्केल १८:१९, २०) “तरी तुम्ही म्हणता, बापाच्या दुष्कर्माचा भार पुत्राने का वाहू नये? हे पाहा, मुलगा न्यायाने व धर्माने वागला, त्याने माझे सर्व नियम पाळून त्याप्रमाणे वर्तन केले तर तो खात्रीने वाचेल. जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल; मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही, आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही; धार्मिकाला त्याच्या धार्मिकतेचे फळ मिळेल; दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल.”
टेहळणी बुरूज१२-E ७/१ पृ. १८ परि. २
यहोवा क्षमा करतो तेव्हा तो पापांची आठवण ठेवतो का?
यहेज्केल संदेष्ट्याद्वारे यहोवाने अविश्वासू यहूदा आणि यरुशलेमविरुद्ध न्यायाचा संदेश घोषित केला. राष्ट्र या नात्याने त्यांनी यहोवाची उपासना नाकारली आणि पूर्ण देशाला हिंसेने भरलं. यरुशलेमचा विनाश बाबेलच्या हातून होईल, असं यहोवाने भाकीत केलं होतं. न्यायाचा संदेश देताना यहोवाने एक आशेचा संदेशसुद्धा दिला. प्रत्येक व्यक्तीला निवड करण्याची संधी होती. ती व्यक्ती तिच्या कार्यांसाठी जबाबदार असणार होती.—वचन १९, २०.
(यहेज्केल १८:२१, २२) “तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापापासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरणार नाही. त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत, त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल.”
टेहळणी बुरूज१२-E ७/१ पृ. १८ परि. ३-७
यहोवा क्षमा करतो तेव्हा तो पापांची आठवण ठेवतो का?
एखादी व्यक्ती वाईट कामांपासून मागे फिरते आणि चांगलं ते करू लागते तेव्हा काय? यहोवा म्हणतो: “तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापापासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरणार नाही.” (वचन २१) खरा पश्चात्ताप दाखवून जो वाईट कामांपासून मागे फिरतो, त्याला यहोवा क्षमा करतो.—स्तोत्र ८६:५.
पण त्याने केलेल्या पापांबद्दल काय? यहोवा याबद्दल सांगतो: “त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत.” (वचन २२) पश्चात्ताप करणाऱ्याचे पाप “त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत” किंवा ते पुन्हा आठवले जाणार नाहीत. ही गोष्ट लक्ष देण्यासारखी का आहे?
बायबलमध्ये ज्या हिब्रू शब्दाचं भाषांतर “हिशोबी धरले जाणार नाहीत” किंवा आठवण्यात येणार नाहीत असं करण्यात आलं आहे, त्याचा अर्थ मागच्या गोष्टी आठवल्या जाणार नाहीत फक्त इतकाच होत नाही. तर एका संदर्भात ‘आठवणे’ या शब्दाबद्दल असं म्हटलं आहे: “बऱ्याच वेळा, यात कार्याचा समावेश होतो. किंवा या शब्दाच्या आधी किंवा नंतर क्रियांचा उल्लेख दिसून येतो.” त्यामुळे ‘आठवण करणे’ याचा अर्थ ‘कार्य करणे’ असाही होऊ शकतो. त्यामुळे यहोवा जेव्हा म्हणतो की पश्चात्ताप करणाऱ्याचे पाप त्याच्या “हिशोबी धरले जाणार नाहीत,” तेव्हा तो असं म्हणत असतो की यापुढे तो त्या पापांसाठी त्या अपराध्याच्या विरोधात कार्य करणार नाही. जसं की, तो त्या पापांसाठी त्याला दोषी ठरवणार नाही किंवा शिक्षा देणार नाही.
यहोवा कितपत क्षमा करतो याचं हृदयस्पर्शी वर्णन आपल्याला यहेज्केल १८:२१, २२ मध्ये पाहायला मिळतं. यहोवा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा तो ती पापं आठवणीत ठेवत नाही. याउलट तो ती पापं त्याच्या मागे टाकून देतो. (यशया ३८:१७) हे जणू पाप पूर्णपणे पुसून टाकण्यासारखं आहे.—प्रेषितांची कार्ये ३:१९.
अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला यहोवाच्या दयेची गरज आहे. कारण आपण बऱ्याच वेळा पाप करतो. (रोमकर ३:२३) पण खरा पश्चात्ताप करणाऱ्याला यहोवा क्षमा करतो ही गोष्ट आपल्याला समजावी, अशी त्याची इच्छा आहे. यहोवा जेव्हा आपल्या पापांची क्षमा करतो, तेव्हा तो ती पापं विसरतो. याचा अर्थ तो ती पापं पुन्हा आठवून त्यासाठी आपल्याला दोषी ठरवत नाही किंवा शिक्षा देत नाही. ही गोष्ट किती दिलासा देणारी आहे! देवाच्या दयेमुळे त्याच्या आणखी जवळ येण्यास तुम्ही प्रेरित होत नाही का?
(यहेज्केल १८:२३) “प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे याने मला संतोष होतो ना?”
(यहेज्केल १८:३२) “कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही; तर मागे फिरा व जिवंत राहा.”
टेहळणी बुरूज०८-E ४/१ पृ. ८ परि. ४
हर्मगिदोन—सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध
देव न्यायाधीश आहे. त्यामुळे तो दुष्टांचा न्याय करेल, तेव्हा तो योग्य असेल अशी खात्री आपण बाळगू शकतो. अब्राहामने विचारलं की “सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” अब्राहामला हे शिकायला मिळालं, की यहोवा नेहमी योग्य न्याय करतो. (उत्पत्ति १८:२५) बायबलमधून आपल्याला असंही आश्वासन मिळतं, की यहोवाला दुष्टांचा नाश करण्यात आनंद मिळत नाही. असं तो तेव्हाच करतो, जेव्हा त्याच्याजवळ कोणताच पर्याय उरत नाही.—यहेज्केल १८:३२; २ पेत्र ३:९.
३१ जुलै–६ ऑगस्ट
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यहेज्केल २४-२७
“सोर नगराविरुद्ध केलेली भविष्यवाणी, यहोवाच्या वचनावरील आपला विश्वास वाढवते”
(यहेज्केल २६:३, ४) “यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अगं सोरे, मी तुझ्याविरुद्ध आहे, समुद्र आपल्या लाटा लोटतो त्याप्रमाणे मी तुझ्यावर बहुत राष्ट्रे लोटेन. ते सोरेच्या तटांचा विध्वंस करतील व तिचे बुरूज पाडून टाकतील; मी तिच्यावरील माती खरडून काढून तिचा उघडा खडक करेन.”
ऑल स्क्रिपचर्स पृ. १३३ परि. ४
यहेज्केल—बायबलचं २६ वं पुस्तक
सोर, मिसर आणि अदोम या शेजारच्या राष्ट्रांविरोधात असलेल्या यहेज्केलच्या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेवरूनही, हे पुस्तक विश्वसनीय असल्याचा पुरावा मिळतो. उदाहरणार्थ, यहेज्केलने भविष्यवाणी केली होती की सोरचा नाश केला जाईल. नबुखद्नेस्सरने १३ वर्षं वेढा घातल्यानंतर सोरवर ताबा मिळवला, तेव्हा या भविष्यवाणीचा काही भाग पूर्ण झाला. (यहे. २६:२-२१) या युद्धात सोरचा पूर्णपणे विनाश झाला नाही. पण सोरचा पूर्णपणे विनाश व्हावा असा न्यायदंड यहोवाने दिला होता. त्याने यहेज्केलद्वारे असं सांगितलं होतं की: “मी तिच्यावरील माती खरडून काढून तिचा उघडा खडक करेन . . . ते . . . तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्व काही पाण्यात बुडवून टाकतील.” (२६:४, १२) या घटनेच्या २५० पेक्षा जास्त वर्षांनंतर जेव्हा थोर सिकंदरने सोर बेटाविरुद्ध चढाई केली, तेव्हा खरंतर या भविष्यवाणीची पूर्णता झाली. सिकंदरच्या सैनिकांनी नाश झालेल्या मुख्य प्रदेशाच्या अवशेषांचा ढिगारा समुद्रामध्ये फेकून सोर बेटापर्यंत ८०० मीटर लांब पूल तयार केला. इ.स.पू. ३३२ मध्ये सिकंदरने शहराभोवती चलाखीने वेढा घालून ४६ मीटर उंच भिंत पार केली आणि शहरावर कबजा मिळवला. यात हजारो लोक मारले गेले आणि अनेकांना गुलाम म्हणून विकलं गेलं. यहेज्केलच्या भविष्यवाणीनुसार सोर ‘उघडा खडक होऊन जाळे पसरण्याचे ठिकाण’ बनलं. (२६:१४) यहेज्केलच्या भविष्यवाणीनुसार, वचन दिलेल्या देशाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या विश्वासघातकी अदोमी लोकांचाही नाश झाला. (२५:१२, १३; ३५:२-९) यासोबतच यरुशलेमचा विनाश आणि इस्राएलची पुनर्स्थापना, यांबद्दल असलेल्या यहेज्केलच्या भविष्यवाण्या अगदी अचूक असल्याच्या सिद्ध झाल्या.—१७:१२-२१; ३६:७-१४.
(यहेज्केल २६:७-११) “कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबुखद्नेस्सर, यास उत्तरेहून घोडे, रथ, स्वार व मोठे दळ यासह सोरेवर आणेन. भूप्रदेशातल्या तुझ्या कन्यांस तो तरवारीने वधेल; तो तुझ्याविरुद्ध बुरूज बांधेल, मोर्चा रचेल व तुझ्याविरुद्ध ढालींचा कोट उभारेल. तो तुझ्या तटांस आपली आघातयंत्रे लावेल, आपल्या हत्यारांनी तुझे बुरूज पाडून टाकेल. त्याचे घोडे इतके येतील की, त्यांनी उडवलेल्या धुळीने तू झाकून जाशील; तटबंदीची नगरे फोडून आत शिरतात तसे तो तुझ्या वेशीतून आत शिरेल, तेव्हा स्वार, चाके व रथ यांच्या आवाजाने तुझे तट हादरतील. तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवेल; तो तुझे लोक तरवारीने ठार मारेल, तुझे मजबूत स्तंभ जमीनदोस्त होतील.”
क्रियेशन पृ. २१६ परि. ३
बायबल—हे खरंच देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलं आहे का?
सोर फेनिकेचं एक मुख्य बंदर होतं. त्याच्या दक्षिणेकडे यहोवाची उपासना करणारं प्राचीन इस्राएल राष्ट्र होतं. सोरने या इस्राएल राष्ट्राला धोका दिला होता. २५० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याद्वारे भाकीत केलं होतं, की सोरचा पूर्णपणे विनाश होईल. यहोवाने भाकीत केलं होतं: “मी तुझ्यावर बहुत राष्ट्रे लोटेन. ते सोरेच्या तटांचा विध्वंस करतील व तिचे बुरूज पाडून टाकतील; मी तिच्यावरील माती खरडून काढून तिचा उघडा खडक करेन. ती समुद्रात जाळी पसरण्याचे ठिकाण होईल.” यहेज्केलने सोरला वेढा घालणाऱ्या पहिल्या राष्ट्राबद्दल आणि राजाबद्दलही आधीच सांगितलं: “पाहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबुखद्नेस्सर, यास . . . सोरेवर आणेन.”—यहेज्केल २६:३-५, ७.
(यहेज्केल २६:४) “ते सोरेच्या तटांचा विध्वंस करतील व तिचे बुरूज पाडून टाकतील; मी तिच्यावरील माती खरडून काढून तिचा उघडा खडक करेन.”
(यहेज्केल २६:१२) “ते तुझी संपत्ती लुटतील, तुझा माल लुटतील; तुझे तट उध्वस्त करतील, तुझे रंगमहाल पाडून टाकतील; तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्व काही पाण्यात बुडवून टाकतील.”
इन्साईट-१ पृ. ७०
सिकंदर
आशिया मायनरमध्ये पारसी लोकांविरुद्ध लढताना सिकंदरला दोनदा विजय मिळाला. (ग्रेनीकस नदीजवळ सिकंदरने आपली पहिली लढाई जिंकली आणि दुसरी लढाई ईसस इथे जिंकली. इथे अंदाजे पाच लाख पारसी सैनिकांचा पराभव झाला.) पळून गेलेल्या पारसी लोकांचा पाठलाग करण्याऐवजी सिकंदरने सोर बेटावर आपलं लक्ष केंद्रित केलं. अनेक शतकांआधी भाकीत करण्यात आलं होतं की त्याच्या भिंती, बुरूज, घरं आणि सोरची माती समुद्रात टाकली जाईल. (यहे २६:४, १२) आणि ही गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे, की काही वर्षांपूर्वी नबुखद्नेस्सरने नाश केलेल्या मुख्य नगराच्या अवशेषांचा उपयोग करून, सिकंदरने सोर बेटाकडे जाण्यासाठी ८०० मीटरचा एक पूल बांधला. इ.स.पू. ३३२ च्या जुलै महिन्यात सिकंदरने त्याच्या समुद्री सैन्य दलाचा आणि युद्धाच्या यंत्रांचा वापर करून समुद्राच्या घमेंडी राणीचा नाश केला.