ते धर्म का सोडत आहेत?
मी कोणत्याही धर्माला मानत नाही, असे १९ व्या शतकाच्या मध्यात, प्रशियाच्या (आताचे उत्तरेकडील जर्मनी) एखाद्या रहिवाशाने म्हटले तर सर्वजण त्याकडे आश्चर्याने पाहत असत. खरे तर प्रमुख प्रस्थापित धर्मातून निघून इतर अप्रस्थापित चर्चमध्ये जाणाऱ्या व्यक्तीची पोलिस-चौकशी देखील होऊ शकत होती. पण आज काळ किती बदलला आहे!
आज, अनेक जर्मनवासी चर्चला राजीनामा देत आहेत. अहवाल असे सांगतो, की ४ पैकी १ जण कोणत्याही धर्माला मानत नाही. ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये हीच परिस्थिती पाहण्यास मिळते. सदस्यत्व, जर धर्माचे जीवनी-रक्त आहे, तर “युरोपमधील चर्च रक्तस्रावामुळे मरणाला टेकली आहेत,” असे रिमर ग्रॉनिमीर या जर्मन लेखकांनी म्हटले.
ते धर्माला का नाकारतात
अनेक लोक संघटित धर्माला का नाकारतात? बहुतेक वेळा यामागे आर्थिक कारणे असतात. विशेषतः अशा देशांमध्ये जेथे सदस्यांकडून चर्च-कर भरण्याची अपेक्षा केली जाते. अनेक लोक असे विचारतात, ‘मी काबाडकष्ट करून मिळवलेला पैसा चर्चला का म्हणून द्यायचा?’ चर्चची प्रचंड संपत्ती आणि सामर्थ्य पाहून काहींच्या मनात चर्चविषयी तिटकारा निर्माण होतो. अशाप्रकारचे लोक कदाचित जर्मनीमधील कोलोन शहरातील कार्डिनल जोयाकिम मायस्नर यांच्याशी सहमत असतील कारण त्यांनी असे म्हटले, की चर्चच्या संपत्तीने कदाचित भौतिक गोष्टींकडे अधिक लक्ष देण्यावर प्रभाव पाडला असेल, पण “ख्रिस्तावरील विश्वासाच्या गांभीर्यावर लक्ष केंद्रित केले नाही.”
चर्चमध्ये अगदी कंटाळवाणे, निरस वाटत असल्यामुळे आणि तेथे आध्यात्मिक अन्नाद्वारे तृप्ती होत नसल्यामुळे काही लोक चर्च सोडून देत आहेत. आमोस संदेष्ट्याने भाकीत केलेल्या दुष्काळामुळे ते ग्रस्त झाले आहेत, “तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची [“यहोवाची,” NW] वचने ऐकण्यासंबंधीचा होईल.” (आमोस ८:११) त्यांच्या धर्मातून त्यांना फारच कमी पोषण होत असल्यामुळे ते त्यांचा धर्म सोडून देत आहेत.
त्यांची समस्या जरी खरी असली, तरी सर्वच धर्मांचा त्याग करणे खरोखरच योग्य आहे का? भूक लागलेल्या एका मनुष्याची कल्पना करा. त्याला भाकरीसारखे काहीतरी दिसते. तो जेव्हा खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती भुशापासून बनवली असल्याचे त्याच्या लक्षात येते. म्हणून तो खाण्याचा आणि भूक भागवण्याचा विचार सोडून देईल का? नाही, तर तो अन्नाचा शोध घेईल. त्याचप्रमाणे एखादा धर्म जर त्याच्या सदस्यांची आध्यात्मिक भूक भागवत नसेल, तर त्या सदस्यांनी त्यांचा धर्म सोडून द्यावा का? आध्यात्मिक भूक भागवण्यासाठी इतर मार्गाचा शोध घेणे सुज्ञतेचे ठरणार नाही का? काही लोकांनी नेमके हेच केले आहे, हे पुढील लेखावरून स्पष्ट दिसून येते.