आपल्या पृथ्वीचे भवितव्य काय?
“रानटी सामाजिक हिंसा, अनेक लढाया, त्यामुळे अस्तित्वात आलेले असंख्य निर्वासित लोक, युद्धांत बळी पडलेले कोट्यवधी लोक आणि ‘आत्मरक्षणाकरता’ केलेला वारेमाप खर्च; या सर्व बाबतींत, इतिहासातील दुसरे कोणतेही शतक २० व्या शतकाची बरोबरी करू शकत नाही,” असे वर्ल्ड मिलिटरी ॲण्ड सोशल एक्स्पेंडिचर्स १९९६ या वृत्तात म्हटले आहे. ही स्थिती कधी बदलेल का?
कित्येक शतकांपूर्वी देवाने दिलेल्या एका अभिवचनाची प्रेषित पेत्राने ख्रिश्चनांना आठवण करून दिली, ते अभिवचन म्हणजे: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) हे शब्द मुळात यशयाच्या भविष्यवाणीत समाविष्ट होते. (यशया ६५:१७; ६६:२२) बॅबिलोनमध्ये ७० वर्षांपर्यंत बंदिवासात राहिल्यावर प्राचीन इस्राएल आपल्या वाग्दत्त देशात पुनर्स्थापित झाले, तेव्हा या शब्दांची प्राथमिक पूर्णता झाली. “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांच्या अभिवचनाचा पुन्हा उल्लेख करण्याद्वारे पेत्राने दाखवले की या भविष्यवाणीची एका आणखी मोठ्या स्तरावर—सबंध जगात पूर्णता अद्याप व्हायची आहे!
सबंध पृथ्वीवर नीतिमत्तेची परिस्थिती स्थापन करावी ही देवाचीच इच्छा आहे आणि ख्रिस्ताच्या राज्यत्वाधीन आपल्या स्वर्गीय राज्याच्या माध्यमाने तो ही इच्छा पूर्ण करील. “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (यशया २:४) आमच्या स्वर्गातील पित्या, किंवा प्रभूची प्रार्थना जिला म्हणतात, त्या प्रार्थनेत येशूने आपल्या अनुयायांना अशीच संपूर्ण शांती आणि सुरक्षितता पृथ्वीवर येण्याची अपेक्षा करण्यास व त्यासाठी प्रार्थना करण्यास शिकवले; त्याने त्यांना अशी प्रार्थना करण्यास शिकवले की, “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्तय ६:९, १०.
स्वर्गाइतकेच नीतिमान आहे अशा एका जगात राहायला तुम्हाला आवडेल का? देवाला जाणून घेण्याचा आणि त्याच्या नीतिमान मार्गांनी चालण्याचा मनोभावे प्रयत्न करणाऱ्यांना बायबल हीच आशा देऊ करते.