न्यायी जग—स्वप्न नाही!
“न्याय ही मानवाची सर्वात चिंतेची बाब राहिली आहे,” असे डॅनिएल वेबस्टर या अमेरिकी मुत्सद्याने म्हटले. आणि बायबल म्हणते: “परमेश्वराला न्याय प्रिय आहे.” (स्तोत्र ३७:२८) देवाच्या स्वरूपात निर्माण केलेल्या पहिल्या मानवी जोडप्याकडे ईश्वरी गुण होते आणि त्या गुणांत न्यायाची समज हा देखील एक गुण होता.—उत्पत्ति १:२६, २७.
शास्त्रवचने अशा परराष्ट्रीय लोकांविषयी देखील बोलते, ‘ज्यांच्याकडे नियमशास्त्र नाही, तरी ते स्वाभाविकपणे नियमशास्त्रानुसार चालतात.’ अशा प्रकारे, “ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धिहि त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.” (रोमकर २:१४, १५) होय, मानवाला सदसद्विवेकबुद्धीच्या—चूक किंवा बरोबर यांच्या आंतरिक ज्ञानाच्या सामर्थ्यासह बनविण्यात आले आहे. स्पष्टपणे, न्यायाची गरज ही मनुष्यात स्वाभाविक आहे.
न्यायाच्या गरजेच्या अगदी जवळची संबंधित असलेली आणखी एक गरज म्हणजे आनंदासाठी मानवाचा शोध, कारण स्तोत्र १०६:३ असे म्हणते: “न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीति आचरितात, ते धन्य.” तथापि, मानवाला न्यायी जग आणण्यास शक्य का होत नाही?
मनुष्य अयशस्वी का झाला आहे?
न्यायी जग आणण्यास अयशस्वी होण्याचे एक मूलभूत कारण म्हणजे आपल्या पहिल्या पालकांकडून, आदाम आणि हव्वेकडून आपल्याला वारशाने मिळालेला दोष. बायबल सांगते: “एका माणसाच्याद्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) तो दोष म्हणजे पाप. आदामाला आणि हव्वेला निर्दोष बनवले होते पण त्यांनी देवाच्या विरोधात बंड करण्याचे ठरवले आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःला पापी बनवले. (उत्पत्ति २:१६, १७; ३:१-६) या कारणामुळे त्यांनी आपल्या मुलांना पापमय आणि चुकीच्या प्रवृत्तींचा वारसा दिला.
व्यक्तिमत्त्वाची गुणलक्षणे अर्थात लोभ आणि पूर्वग्रह पापमय प्रवृत्तींमुळे निर्माण झाली नाहीत का? आणि अशा प्रकारची गुणलक्षणे जगात अन्यायाला हातभार लावत नाहीत का? हेतुतः केला जाणारा पर्यावरणाचा दुरुपयोग आणि आर्थिक शोषण यांच्या मुळाशी लोभ आहे! जातीय संघर्ष आणि वंशिक अन्यायाच्यामागे निश्चितच पूर्वग्रह असतो. अशा प्रकारच्या प्रवृत्ती लोकांना चोरी करण्यास, फसवण्यास आणि इतरांना इजा होईल अशा प्रकारे वागण्यास प्रवृत्त करतात.
न्यायाने वागण्यासाठी आणि चांगले ते करण्यासाठी उत्तम हेतूने केलेले प्रयत्नही आपल्या पापमय प्रवृत्तींमुळे विफल होतात. स्वतः प्रेषित पौलाने मान्य केले: “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो.” तो या संघर्षाविषयी पुढे असे सांगतो: “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.” (रोमकर ७:१९-२३) कदाचित, आज आपल्याला तशाच प्रकारचा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे अन्याय इतका फोफावला आहे.
मानव ज्याप्रकारे राज्य करत आहे त्यामुळे देखील अन्यायाला खतपाणी मिळाले आहे. प्रत्येक देशात नियम आहेत आणि नियमांची अंमलबजावणी करणारे आहेत. तेथे न्यायाधीश आणि न्यायालये देखील आहेत. निश्चितच, मानवी अधिकार कायम ठेवण्याचा आणि सर्वांना समान न्याय मिळेल हे पाहण्याचा काही नीतिमान व्यक्तींनी प्रयत्न केला आहे. तरी देखील, त्यांचे प्रयत्न म्हणावे तितके यशस्वी झाले नाहीत. का? त्यांच्या अपयशाच्या वेगवेगळ्या कारणांविषयी थोडक्यात सांगताना, यिर्मया १०:२३ म्हणते: “हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” देवापासून दूर गेल्यामुळे धार्मिक आणि न्यायी जग स्थापन करण्यास मानव निव्वळ असमर्थ आहे.—नीतिसूत्रे १४:१२; उपदेशक ८:९.
न्यायी जग निर्माण करण्याकरता मानवाच्या प्रयत्नातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे दियाबल सैतान. बायबल हे स्पष्टपणे सांगते, की बंडखोर देवदूत सैतान हा मूळचा “मनुष्यघातक” आणि “लबाड” आहे आणि “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (योहान ८:४४; १ योहान ५:१९) प्रेषित पौल त्याची ओळख ‘या युगाचे दैवत’ अशी करून देतो. (२ करिंथकर ४:३, ४) धार्मिकतेचा द्वेष करत असल्यामुळे सैतान दुष्टाई वाढवण्यासाठी जे काही शक्य आहे ते करतो. जोपर्यंत तो या जगावर नियंत्रण ठेवतो तोपर्यंत मानव सर्वप्रकारच्या अन्यायांच्या आणि त्यामुळे होणाऱ्या दुःखमय परिणामांच्या दास्यत्वात राहील.
मानवी समाजात अन्याय अपरिहार्य आहे, असा यावरून अर्थबोध होतो का? न्यायी जग हे कधीही पूर्ण न होणारे स्वप्न आहे का?
न्यायी जग एक वास्तविकता—कसे?
न्यायी जगाची आशा वास्तवात आणण्यासाठी, मानवाला अशा उगमाकडे पाहिले पाहिजे, जो अन्यायाच्या कारणांचे निर्मूलन करू शकतो. पण पापाचा समूळ नाश आणि सैतान व त्याचे राज्यत्व कोण दूर करू शकतो? स्पष्टपणे, अशा प्रकारचे भयंकर कार्य कोणी मानव किंवा मानवी एजेन्सी पार पाडू शकत नाही. केवळ यहोवा देव हे कार्य साध्य करू शकतो! त्याच्याविषयी बायबल म्हणते: “तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) यहोवाला “न्याय प्रिय” असल्यामुळे मानवाने न्यायी जगात आनंदाचा आस्वाद घ्यावा अशी त्याची इच्छा आहे.—स्तोत्र ३७:२८.
न्यायी जग आणण्याच्या देवाच्या व्यवस्थेविषयी बोलताना प्रेषित पेत्राने लिहिले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) हे “नवे आकाश” म्हणजे नवे भौतिक आकाश नाही. देवाने भौतिक आकाश परिपूर्ण बनवले आहे आणि ते देवाची महिमा करते. (स्तोत्र ८:३; १९:१, २) हे “नवे आकाश” पृथ्वीवरील नवे राज्यत्व आहे. सध्याचे “आकाश” मानव-निर्मित सरकारांनी बनलेले आहे. लवकरच, हर्मगिदोनाच्या देवाच्या लढाईत ‘नव्या आकाशाचा’—त्याच्या स्वर्गीय राज्याचा किंवा सरकाराचा मार्ग मोकळा होईल. (प्रकटीकरण १६:१४-१६) त्या राज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे. मानवी राज्यत्वाचा कायमचा नाश केल्यानंतर, हे सरकार सनातन राज्य करील.—दानीएल २:४४.
तर मग, “नवी पृथ्वी” काय आहे? तो नवीन ग्रह नाही, कारण मानवाच्या वास्तव्यासाठी देवाने पृथ्वीला अगदी योग्य प्रकारे बनवले आहे आणि ती सदासर्वकाळ राहावी ही त्याची इच्छा आहे. (स्तोत्र १०४:५) ही “नवी पृथ्वी” लोकांच्या नवीन समाजाला सूचित करते. (उत्पत्ति ११:१; स्तोत्र ९६:१) जी “पृथ्वी” नाश केली जाईल ती अशा लोकांनी बनलेली आहे ज्यांनी स्वतःला या दुष्ट व्यवस्थीकरणाचे भाग बनवले आहे. (२ पेत्र ३:७) त्यांच्याऐवजी “नवी पृथ्वी” येईल जी दुष्टतेचा द्वेष करणाऱ्या आणि धार्मिकतेवर आणि न्यायावर प्रेम करणाऱ्या देवाच्या खऱ्या सेवकांनी मिळून बनलेली आहे. (स्तोत्र ३७:१०, ११) अशा प्रकारे, सैतानाचे जग गेलेले असेल.
पण सैतानासाठी काय राखून ठेवले आहे? प्रेषित योहानाने भाकीत केले: “त्याने [ख्रिस्त येशूने] दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्यास धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले; . . . त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला.” (प्रकटीकरण २०:१-३) साखळदंडाने बांधण्यात आलेला सैतान लोकांना प्रभावित करू शकणार नाही कारण त्याची अवस्था अंधारकोठडीत डांबलेल्या कैद्याप्रमाणे असेल. त्यावेळी मानवजातीला किती हायसे वाटेल, न्यायी जग येण्याचे ते पूर्वचिन्ह असेल! हजार वर्षांच्या अखेरीस सैतानाला नामशेष करण्यात येईल.—प्रकटीकरण २०:७-१०.
पण, आपल्याला वारशाने मिळालेल्या पापाबद्दल काय? पापाला समूळ काढण्यासाठी यहोवाने याआधीच तरतूद केली आहे. “मनुष्याचा पुत्र [येशू ख्रिस्त] . . . पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्तय २०:२८) “खंडणी” हा शब्द बंदिवान लोकांच्या सुटकेसाठी आवश्यक असलेल्या किंमतीला सूचित करतो. येशूने आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाचे मोल मानवांची सुटका होण्यासाठी खंडणी म्हणून दिले.—२ करिंथकर ५:१४; १ पेत्र १:१८, १९.
येशूच्या खंडणी बलिदानाचा आपल्याला आतासुद्धा फायदा होऊ शकतो. त्यावर विश्वास ठेवण्याद्वारे, देवासमोरील शुद्ध भूमिकेचा आपण आनंद घेऊ शकतो. (प्रेषितांची कृत्ये १०:४३; १ करिंथकर ६:११) देवराज्याच्या राज्याधिकाराच्या अधीन, खंडणीमुळे मानवजातीची पापातून पूर्णपणे मुक्तता होणे शक्य होईल. बायबलमधील शेवटचे पुस्तक ‘जीवनाच्या पाण्याच्या लाक्षणिक नदीचे’ वर्णन करते जिचा उगम देवाच्या सिंहासनापासून होतो तसेच तिच्या दोन्ही बाजूला लाक्षणिक फळझाडे असून त्यांना पाने देखील आहेत आणि ती पाने “राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.” (प्रकटीकरण २२:१, २) बायबल या ठिकाणी जे चित्रित करते ते निर्माणकर्त्याने, येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर मानवजातीची पापातून मुक्तता व्हावी म्हणून केलेल्या महान तरतुदीला सूचित होते. या तरतुदीच्या पूर्ण अवलंबामुळे आज्ञाधारक मानवजातीची पाप आणि मृत्यू यांपासून सुटका होईल.
न्यायी जगात जीवन
देवाच्या राज्यात कशाप्रकारचे जीवन असेल, याची कल्पना करा. गुन्हेगारी आणि हिंसाचार या गोष्टी गतकाळात जमा झाल्या असतील. (नीतिसूत्रे २:२१, २२) आर्थिक अन्यायाचे निर्मूलन झालेले असेल. (स्तोत्र ३७:६; ७२:१२, १३; यशया ६५:२१-२३) सामाजिक, जातीय आणि वंशिक दुजाभाव पूर्णपणे नाहीसा झालेला असेल. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) युद्धे आणि युद्धात वापरण्यात येणारी शस्त्रे असणार नाहीत. (स्तोत्र ४६:९) अन्यायाने मुक्त असलेल्या जगात लाखो मृत लोकांना जिवंत केले जाईल. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) प्रत्येक जण परिपूर्ण आणि उत्साही प्रकृतीचा आनंद घेईल. (ईयोब ३३:२५; प्रेषितांची कृत्ये २१:३, ४) बायबल आपल्याला “सत्याने” खात्री देते, की ‘[येशू ख्रिस्त] न्याय आणील.’—यशया ४२:३.
तोपर्यंत आपल्यावर अन्याय होऊ शकतो, पण आपण अन्यायाने त्याची परतफेड करू नये. (मीखा ६:८) आपल्याला अन्याय सहन जरी करावा लागत असला तरी आपण सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. अभिवचनयुक्त न्यायी जग लवकरच वास्तव्यात उतरेल. (२ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:११-१३) सर्वसमर्थ देवाने शब्द दिला आहे आणि तसे “होईल.” (यशया ५५:१०, ११) न्यायी जगातील जीवनासाठी तयारी करण्याची ही वेळ आहे आणि देव आपल्याकडून काय अपेक्षितो ते शिकण्याद्वारे आपण तसे करू शकतो.—योहान १७:३; २ तीमथ्य ३:१६, १७.
[७ पानांवरील चित्र]
देवाने वचन दिलेल्या नवीन जगात अन्यायाचे पूर्ण निर्मूलन केले जाईल