जगाच्या प्रकाशाला कोण अनुसरत आहे?
“तुम्ही . . . ज्योतीसारखे जगात दिसता.”—फिलिप्पैकर २:१५.
१. खोट्या धार्मिक प्रकाशांबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?
पवित्र शास्त्र येशू ख्रिस्ताची ओळख “मोठा प्रकाश,” आणि “जगाचा प्रकाश” अशी स्पष्टपणे करून देते. (यशया ९:२; योहान ८:१२) तरीसुद्धा, तो पृथ्वीवर असताना फारच कमी लोकांनी त्याचे अनुसरण केले. बहुसंख्य लोकांनी वास्तविकतेत अंधकाराचे वाहक असणाऱ्या खोट्या प्रकाशांचे अनुसरण करण्यास निवडले. त्यांच्याबद्दल देवाचे वचन असे म्हणते: “कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. ह्यांत आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीहि नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल.”—२ करिंथकर ११:१३-१५.
२. लोकांचा निवाडा कोणत्या आधारावर केला जाईल याबद्दल येशूने काय म्हटले?
२ यास्तव, अधिक आश्चर्यकारक असलेला प्रकाश सर्वांनाच पाहिजे असतो असे नाही. येशू म्हणाला: “निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करितो तो प्रकाशाचा द्वेष करितो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.”—योहान ३:१९, २०.
अंधकाराचे चाहते
३, ४. येशूच्या दिवसातील धार्मिक पुढाऱ्यांना प्रकाशाचा पाठलाग करावयाचा नव्हता हे त्यांनी कशावरून दाखवून दिले?
३ येशू ह्या पृथ्वीवर असताना वस्तुस्थिती कशी होती याचा विचार करा. तो मशीहा आहे हे सिद्ध करण्यासाठी देवाने त्याला अद्भूत कृत्ये करण्याचा अधिकार दिला होता. उदाहरणार्थ, शब्बाथाच्या दिवशी त्याने जन्मांध असणाऱ्या माणसाला त्याची दृष्टी परत मिळवून दिली. दयेचे ते किती आश्चर्यकारक काम! तो माणूस किती कृतज्ञ होता! तो जीवनात पहिल्यांदा पाहू शकत होता! तरी, त्याबद्दल धार्मिक पुढाऱ्यांची प्रतिक्रिया काय होती? योहान ९:१६ असे सांगते: “ह्यावरून परूश्यांतील कित्येक म्हणाले, हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळीत नाही.” त्यांची मने किती विकृत होती! येथे एक आश्चर्यकारक बरे करण्याचे कृत्य घडले होते, पण पूर्वी अंधळा असणाऱ्या व्यक्तीबद्दल आनंद आणि रोग बरा करणाऱ्याबद्दल गुणग्राहकता दाखवण्याऐवजी त्यांनी येशूला धिक्कारले! असे केल्याने, निःसंशय त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रकटणाविरूद्ध अक्षम्य असे पाप केले.—मत्तय १२:३१, ३२.
४ नंतर, त्या ढोंग्यांनी पूर्वी अंधळा असणाऱ्या व्यक्तीला येशूबद्दल जेव्हा विचारले, तेव्हा तो माणूस म्हणाला: “हेच तर मोठे आश्चर्य आहे की, तो कोठला आहे हे तुम्हाला ठाऊक नाही; पण त्याने तर माझे डोळे उघडले. आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. हा देवापसून नसता तर ह्याला काही करता आले नसते.” धार्मिक पुढाऱ्यांची काय प्रतिक्रिया होती? “त्यांनी त्याला म्हटले, तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हाला शिकवतोस काय? मग त्यांनी त्याला बाहेर घालविले.” त्यांच्यात दयेचा किती अभाव होता! ते कठीण हृदयाचे होते. म्हणून येशूने त्यांना म्हटले की जरी ते त्यांच्या शारीरिक नेत्रांनी पाहू शकत होते तरी आध्यात्मिकरित्या ते अंधळे होते.—योहान ९:३०-४१.
५, ६. पहिल्या शतकातल्या धार्मिक पुढाऱ्यांनी असे काय केले की ज्यावरून त्यांना अंधकार आवडत होता हे दिसून आले?
५ दुसऱ्या प्रसंगी, जेव्हा येशूने लाजाराला मृतातून उठवले तेव्हा हे धार्मिक ढोंगी देवाच्या आत्म्याविरूद्ध पाप करीत होते हे स्पष्ट दिसून येते. त्या चमत्कारामुळे पुष्कळ सामान्य लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. तरी, धार्मिक पुढाऱ्यांनी काय केले त्याकडे नीट लक्ष द्या. “ह्यावरून मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करितो; आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रहि हिरावून घेतील.” (योहान ११:४७, ४८) त्यांना त्यांच्या स्थानाची आणि मोठेपणाची काळजी लागली होती. परिणाम काय होईल त्याकडे दुर्लक्ष करून ते देवाला नव्हे तर रोमी लोकांना प्रसन्न करू इच्छित होते. म्हणून त्यांनी काय केले बरे? “त्या दिवसापासून त्यांनी [येशूला] जिवे मारण्याचा आपसात निश्चय केला.”—योहान ११:५३.
६ तेवढेच होते का? नाही. त्यांनी पुढे काय केले यावरून त्यांना अंधकार किती आवडत होता हे दिसून येते: “मुख्य याजकांनी लाजारालाहि जिवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहूदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवीत होते.” (योहान १२:१०, ११) काय अविश्वसनीय दुष्टपणा! जरी त्यांनी त्यांचे स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी हे सगळे केले तरी, काय झाले? त्याच पिढीत, त्यांनी रोमी लोकांविरूद्ध बंड केल्यामुळे इ.स. ७० मध्ये रोमी लोकांनी त्यांची जागा, त्यांचे राष्ट्र, त्यांचे जीवसुद्धा घेतले!—यशया ५:२०; लूक १९:४१-४४.
येशूची दया
७. सत्याचे चाहते येशूच्या जवळ का गेले?
७ तसेच आपल्या काळात, सर्वांनाच आध्यात्मिक प्रज्वलितपणा पाहिजे असे नाही. पण सत्याबद्दल प्रेम बाळगणारे प्रकाशात येऊ इच्छितात. देव त्यांचा सार्वभौम असावा अशी त्यांची इच्छा आहे, आणि देवाने प्रकाश काय आहे ते समजवण्यासाठी पाठविलेल्या येशूकडे ते उत्सुकतेने वळतात, आणि त्याला अनुसरतात. येशू पृथ्वीवर असताना नम्र लोकांनी तेच केले. ते त्याच्या जवळ आले. परूश्यांनासुद्धा ते कबूल करावे लागले. त्यांनी अशी तक्रार केली: “जग त्याच्या मागे चालले आहे.” (योहान १२:१९) येशू स्वार्थी, मगरूर, सत्तेसाठी हपापलेल्या धार्मिक पुढाऱ्यांच्या एकदम विरोधात असल्यामुळे मेंढरासमान लोकांची त्यावर प्रीती होती, त्यांच्याविषयी तो म्हणाला: “जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटहि लावावयाचे नाहीत; आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करितात.”—मत्तय २३:४, ५.
८. धार्मिक ढोंग्यांच्या अगदी विरोधात येशूची मनोवृत्ती काय होती?
८ त्यांच्या अगदी विरोधात येशूची कृपाळू मनोवृत्ती पहा: “तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) आणि त्याबद्दल त्याने काय केले? सैतानाच्या व्यवस्थीकरणाकडून पिळवणूक झालेल्यांना तो म्हणाला: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२८-३०) येशूबद्दल यशया ६१:१, २ मध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे त्याने कार्य केले. तेथे आम्ही असे वाचतो: “प्रभु [यहोवा, न्यू.व.] परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता, व बंदिवानास बंधमोचन विदित करावे; परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] प्रसादाचे वर्ष, व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे.”
ज्योती वाहकांना एकत्र करणे
९. कोणत्या महत्त्वाच्या घटना १९१४ मध्ये घडल्या?
९ येशूचे स्वर्गारोहण झाल्यावर देवाने राज्य अधिकार देण्याची वेळ येऊपर्यंत त्याला थांबायचे होते. मग तो “शेरडांपासून”, “मेंढरे” वेगळे करतो. (मत्तय २५:३१-३३; स्तोत्रसंहिता ११०:१, २) ‘शेवटला काळ’ १९१४ मध्ये सुरू झाला तेव्हा ती वेळ आली. (२ तीमथ्य ३:१-५) देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा असा अधिकार दिल्यामुळे येशूने प्रकाशाचा पाठलाग करू इच्छिणाऱ्या लोकांना त्याच्या कृपेच्या उजव्या हातापाशी एकत्रित करण्याचे सुरू केले. पहिल्या महायुद्धानंतर, एकत्रीकरणाचे काम वाढत्या गतीने पुढे चालत राहिले.
१०. येशू ज्या लोकांचा उपयोग एकत्रीकरणाच्या कामात करत आहे त्यांच्याबद्दल कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो?
१० येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली, एकत्रीकरणाच्या कामाला मोठ्या यशाने फळ मिळाले. प्रज्वलित असलेल्या खऱ्या भक्तीत सर्व राष्ट्राचे एवढे लोक इतिहासात कधीही एकत्रीत झाले नव्हते. देवाकडून आणि ख्रिस्ताकडून येणाऱ्या प्रकाशाचा पाठलाग आज कोण करीत आहेत? फिलिप्पैकरांस २:१५ मध्ये म्हटल्याप्रमाणे “ज्योतिसारखे जगात” कोण दिसत आहेत व दुसऱ्यांना ‘या व जीवनाचे पाणी फुकट घ्या’ असे कोण निमंत्रण देत आहेत?—प्रकटीकरण २२:१७.
११. आध्यात्मिक प्रकाशाच्या संबंधाने ख्रिस्ती जगताचे स्थान कोठे आहे?
११ ख्रिस्तीधर्म जगत ते करीत आहे का? ख्रिस्तीधर्म जगत नक्कीच त्याच्या विभागीत धर्मांसोबत प्रकाश देणाऱ्यासारखे चमकत नाही. वास्तव्यात, येशूच्या दिवसातील धार्मिक पुढाऱ्यांसारखा त्याच्यातला पाळक वर्ग आहे. देवाकडून आणि ख्रिस्ताकडून येणाऱ्या खऱ्या प्रकाशाला ते प्रतिबिंबित करत नाहीत. थियोलॉजी टुडे ह्या मासिकाने ३३ वर्षांच्या आधी असे म्हटले: “दुःखाने हे कबूल करावयास हवे की चर्चमध्ये अत्युच्च तेजाने हा प्रकाश चमकत नाही. . . . चर्चच्या सभोवताली असणाऱ्या समाजांसारखीच तिची प्रवृत्ती झाली आहे. ते जगाचा प्रकाश नसून जगामध्ये चमकत असणाऱ्या प्रकाशांचा परावर्तक आहे.” आणि आज ख्रिस्तीधर्म जगताची परिस्थिती अधिक वाईट आहे. सैतान आणि त्याच्या जगाकडे देऊ करण्यासाठी तेच असल्यामुळे, ख्रिस्तीधर्म जगत जगाकडून प्रतिबिंबित करत असलेला तथाकथित प्रकाश खरे म्हणजे अंधकार आहे. ख्रिस्ती जगताच्या मतभेद असलेल्या आणि संपूर्ण जगीक असलेल्या धर्मांकडून कोणताही सत्याचा प्रकाश येत नाही.
१२. आज खऱ्या ज्योती वाहणाऱ्या संघटनेचे भाग कोण आहेत?
१२ यहोवाच्या साक्षीदारांच्या नवीन जगाच्या संस्थेबद्दल खात्रीने असे म्हणता येईल की ती ज्योती वाहणारी आजची खरी संघटना आहे. ऐक्याने तिचे सर्व सदस्य—पुरूष, स्त्रिया तसेच युवक—यहोवा आणि ख्रिस्ताकडून येणारा प्रकाश सर्व मानवजातीसमोर पाडत आहेत. मागच्या वर्षी संपूर्ण जगात, यहोवाच्या साक्षीदारांच्या जवळ जवळ ७०,००० मंडळ्यांमध्ये चाळीस लाखापेक्षा जास्त लोक देव आणि त्याच्या उद्देशांबद्दल इतरांना क्रियाशीलतेने सांगत होते. आणि प्रत्येक वर्षी आम्ही आध्यात्मिकतेत प्रज्वलित होऊ इच्छिणाऱ्या लोकांचे प्रचंड एकत्रीकरण चालू आहे हे पाहतो. पवित्र शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर आणि सत्याबद्दलचे अचूक ज्ञान मिळवल्यानंतर लाखो लोक बाप्तिस्मा घेत आहेत. खरेच, देवाची “अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.”—१ तीमथ्यी २:४.
१३. यहोवाकडून येणाऱ्या प्रकाशाची तुलना आपण कशासोबत करू शकतो?
१३ प्राचीन काळच्या देवाच्या लोकांनी मिसर देशाला सोडून दिले तेव्हा काय झाले त्याची तुलना आपण आता यहोवाकडून येणाऱ्या प्रज्वलितपणाशी करू शकतो: “त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे.” (निर्गम १३:२१, २२) देवाकडून दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ हे विसंबण्याजोगे मार्गदर्शक होते. दिवसामध्ये आपल्याला प्रकाश पुरवण्यासाठी देवाने जो सूर्य निर्मिलेला आहे त्याच्यासारखेच ते देखील विसंबण्याजोगे होते. ह्या दुष्ट शेवटल्या दिवसांमध्ये सत्याचा शोध घेणाऱ्याकरता आध्यात्मिकरित्या मार्ग प्रज्वलित करण्यासाठी आपणही यहोवावर विसंबून राहू शकतो. नीतिसूत्रे ४:१८ आम्हाला खात्री देते: “परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.”
राज्याचा प्रकाश प्रतिबिंबित करत राहणे
१४. ज्योती वाहकांचा मुख्य हेतू काय असला पाहिजे?
१४ यहोवा प्रज्वलितपणाचा उगमस्थान असल्यामुळे आणि ख्रिस्त त्या प्रकाशाचा मुख्य परावर्तक असल्यामुळे, येशूच्या अनुयायांनीसुद्धा तो प्रकाश प्रतिबिंबित करावयास हवा. त्याने त्यांच्याबद्दल असे म्हटले: “तुम्ही जगाचा प्रकाश आहा. . . . त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गांतील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१४, १६) त्याच्या अनुयायांनी मानवजातीसमोर जो प्रकाश पाडावयाचा होता त्याचा मुख्य विषय काय होता? जगाच्या इतिहासाच्या शेवटास त्यांना काय शिकवायचे होते? त्याच्या अनुयायांनी लोकशाही, हुकुमशाही, चर्च आणि राज्याच्या एकीकरणाविषयी, किंवा इतर जगीक कल्पनांविषयी प्रचार करावा असे येशूने सांगितले नाही. याउलट, मत्तय २४:१४ मध्ये त्याने असे भाकित केले की जगभरात विरोध असताना “सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगांत गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” सैतानाच्या जगाचा अंत करणाऱ्या आणि नीतिमत्वतेचे नवीन जग आणणाऱ्या परमेश्वराच्या राज्याबद्दल आज ज्योती वाहकांनी इतरांना सांगितले पाहिजे.—१ पेत्र २:९.
१५. ज्यांना प्रकाश हवा आहे अशांनी कोठे जावे?
१५ प्रकाशाचे चाहते, या जगाच्या दाव्यांनी आणि ध्येयांनी परावृत्त होणार नाहीत. हे जग त्याच्या शेवटाच्या जवळ येत असल्यामुळे ते सर्व दावे आणि ध्येये दिसेनासे होतील. देवाच्या राज्याचा प्रकाश पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांमध्ये पाडणाऱ्या लोकांद्वारे जी सुवार्ता घोषित केली जाते त्याकडे नीतीमत्वाचे चाहते वळतात. प्रकटीकरण ७:९, १० मध्ये भविष्यवादीत केलेल्या लोकांबद्दल असे म्हटले आहे: “मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते: ‘राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे.’” वचन १४ म्हणते: “मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत.” होय, ह्या जगाच्या अंतामधून वाचून देवाच्या राज्याखाली अनंतकाळच्या नवीन जगात ते प्रवेश करतात.
प्रज्वलित असलेले नवीन जग
१६. मोठ्या संकटात सैतानाच्या जगाचे काय होईल?
१६ नवीन जग सत्याच्या उज्वल प्रकाशात आच्छादले जाईल. देवाने सद्याच्या व्यवस्थीकरणाचा अंत केल्यानंतरच्या दिवसातील परिस्थितीचा विचार करा. त्यातील प्रत्येकजनाचा—सैतान, त्याचे दुरात्मे आणि त्याचे राजनैतिक, व्यापारी व धार्मिक व्यवस्थांचा सदासर्वकाळासाठी अंत होईल! सैतानाने प्रचारासाठी उपयोगात आणलेली सर्व उपकरणे देखील नाहीशी होतील. म्हणूनच, मोठ्या संकटानंतर ह्या दुष्ट जगाला हातभार लावणारे एकही वृत्तपत्र, मासिक, पुस्तक, पुस्तिका किंवा हस्तपत्रिका छापली जाणार नाही. जगीक दूरदर्शनावरून किंवा आकाशवाणीवरून कोणत्याही भ्रष्ट प्रभावांना प्रक्षेपित केले जाणार नाही. एका शक्तीशाली तडाख्यात सैतानाच्या जगाच्या संपूर्ण विषारी वातावरणाला काढून टाकले जाईल!—मत्तय २४:२१; प्रकटीकरण ७:१४; १६:१४-१६; १९:११-२१.
१७, १८. सैतानाच्या जगाचा अंत झाल्यानंतर आध्यात्मिक वातावरणाचे तुम्ही कसे वर्णन कराल?
१७ ती केवढी मोठी सुटका असेल! त्या दिवसापासून मानवजातीवर यहोवा आणि त्याच्या राज्याकडून येणारा हितकारक, उन्नती करणारा आध्यात्मिक प्रकाशच प्रभाव करील. यशया ५४:१३ असे भाकीत करते: “तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल.” यशया २६:९ म्हणते त्याप्रमाणे, देवाचे अधिपत्य संपूर्ण पृथ्वीवर गाजवीत असताना त्याचे अभिवचन असे आहे की, “जगात राहणारे धार्मिकता” शिकतील.
१८ लवकरच, मानसिक आणि आध्यात्मिक वातावरण चांगल्या कारणास्तव बदलण्यात येईल. आज सगळीकडे आढळणाऱ्या खिन्न करणाऱ्या, अनैतिक गोष्टींऐवजी त्याकाळी उभारणीकारक गोष्टी असतील. तेव्हा सर्वांना देव आणि त्याच्या उद्देशांबद्दलचे सत्य शिकवले जाईल. तेव्हा यशया ११:९ मधील भविष्यवाणी संपूर्ण अर्थाने पूर्ण होईल, जेथे असे म्हटले आहे: “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”
प्रकाशाचा पाठलाग करणे निकडीचे आहे
१९, २०. प्रकाशाचा पाठलाग करू इच्छिणाऱ्यांनी जागरूक का असावे?
१९ ह्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या वर्षांमध्ये, जगाच्या प्रकाशाचा पाठलाग करणे निकडीचे आहे. आम्हाला प्रकाशात चालण्यापासून रोखण्यासाठी फार मोठे युद्ध लढले जात आहे म्हणून आम्ही जागरूक असले पाहिजे. हा विरोध अंधकाराच्या शक्तींकडून म्हणजेच सैतान, त्याचे दुरात्मे आणि त्याच्या पार्थिव संघटनेकडून येतो. म्हणूनच प्रेषित पेत्र इशारा देतो: “सावध असा, जागे रहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.”—१ पेत्र ५:८.
२० सर्वांनी अंधकारात चालत रहावे अशी सैतानाची इच्छा असल्यामुळे, प्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांच्या मार्गात तो प्रत्येक अडथळा ठेवतो. सत्याचा विरोध करणाऱ्या नातेवाईकांकडून किंवा पूर्वीच्या मित्रांकडून हा दबाव असू शकतो. खोट्या धर्माच्या शिक्षणाने अंधळे केल्यामुळे किंवा अप्रामाणिक नास्तिक आणि अज्ञेयवादांच्या प्रचाराने पवित्र शास्त्राबद्दल शंका असू शकतात. किंवा एखाद्याच्या पापी प्रवृत्तींमुळे इश्वरी गरजांप्रमाणे राहणे कठीण होऊ शकते.
२१. देवाच्या नवीन जगात राहू इच्छिणाऱ्या सर्वांनी काय करायला हवे?
२१ मग ते कोणतेही अडथळे असू द्या, तुम्हाला दारिद्य्र, गुन्हे, अन्याय आणि युद्ध यापासून मुक्त असलेल्या नवीन जगात जीवन व्यतीत करायला आवडेल का? चांगले आरोग्य आणि नंदनवनमय पृथ्वीवर अनंत जीवनाचा आनंद घ्यायला तुम्हाला आवडेल का? असे असेल तर, येशू हाच जगाचा प्रकाश आहे या गोष्टीचा स्वीकार करा व त्याचे अनुकरण करा आणि “जीवनाचे वचन” धरून राहणाऱ्यांचा व “ज्योतीसारखे जगात” दिसणाऱ्यांचा संदेश ऐका.—फिलिप्पैकर २:१५, १६.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ धार्मिक पुढारी अंधकाराचे चाहते आहेत हे ते कशावरून दाखवून देतात?
▫ लोकांबद्दल येशूची काय मनोवृत्ती होती?
▫ ज्योती वाहकांच्या एकत्रीकरणाचे काम पुढे कसे वाढत गेले?
▫ लवकरच कोणते महत्त्वाचे बदल होतील?
▫ आज जगाच्या प्रकाशाला अनुसरणे एवढे निकडीचे का आहे?
[चित्र]
येशूने ज्या माणसाचे नेत्र उघडले त्या माणसाला निष्ठुर परूश्यांनी बाहेर घालविले