मृतांसाठी कोणती आशा?
एक तरुण कुटुंब दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याला सुटीकरता आपल्या वाहनात बसून चालले होते. बायकोचे आईवडील पुढेच दुसऱ्या एका वाहनात होते. एकाएकी वाहनाचे चाक बसले. सबंध मंडळी रस्त्याच्या बाजूला दुसरे चाक बसविण्याच्या प्रयत्नात असता दारुने झिंगलेल्या एका वाहनचालकाने आपले वाहन या दोन वाहनांवर आदळले. त्या स्त्रीचे आईवडील जागीच ठार झाले. तिचा पती काही दिवसांनी वारला. त्या स्त्रीची शरीरातील हाडे निखळली व आणखी दुखापत झाली. तिच्या मुलीला मेंदूमध्ये जखम होऊन ती पक्षघाती झाली.
या कुटुंबावर केवढी भयानक घटना ओढवली! त्या मृत स्त्रीच्या बहिणीने ती बातमी ऐकली तेव्हा ती एकदमच बधिर झाली. अशाप्रकारच्या दुःखद घटना सर्व देशात घडतात. त्यामुळे दुःखाने भारावलेले त्यांचे नातेवाईक तसेच मित्र यांना याचे नेहमीच आश्चर्य वाटत राहिले आहे की, ‘मृत खरेच मरतात का’ किंवा . . .
‘मृत जिवंत असतात का?’
जीव अमर आहे असे बहुतेक सर्वच धर्म शिकवतात. यामुळे त्यांचे अनुयायी असे समजतात की, जे मरतात ते खरेपणाने मरत नाहीत तर, ते स्वर्गात, परगेटरी किंवा नरकात, कोठे तरी जिवंत असतात. चर्चमध्ये असे शिकवण्यात येते की, परगेटरी व नरकात जाणाऱ्यांना भयंकर यातना संभवतात व त्या सर्वकाळासाठी असतात. पण, प्रीतीचा देव आपल्या निर्मितीला इतकी क्रूर छळवणूक देणार का?—१ योहान ४:८.
तसे तर आपल्याला वाटत नाही. पण याची खात्री कशी होणार? यासाठी पुढे असणारा पवित्र शास्त्रातील पुरावा कृपया काळजीपूर्वक लक्षात घ्या. तो म्हणतोः “यहोवा देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला, तेव्हा मनुष्य जिवंत जीव झाला.” (उत्पत्ती २:७) हे प्रेरित विधान, पहिला माणूस आदाम याला जीव देण्यात आला असे म्हणते का? नाही, तो जीव झाला, जिवंत व्यक्ती झाला. याला प्रेषित पौलाने देखील दुजोरा दिला व म्हटलेः “असा शास्त्रलेख आहे की, पहिला मनुष्य आदाम जिवंत जीव झाला.” पौल येथे उत्पत्तीमधील अवतरण घेत होता.—१ करिंथकर १५:४५, द जरूसलेम बायबल.
मग, मानवी जीव मरतो का? यहेज्केल संदेष्ट्याने लिहिलेः “सर्व जीव माझे आहेत, बापाचा जीव तसा पुत्राचाही जीव माझा आहे. जो जीव पाप करितो तो मरेल.” (यहेज्केल १८:४, २०; उपदेशक ९:५, १०) तेव्हा, जर जीव मेला तर त्या व्यक्तीला काहीच कळत नसणार, मग त्याला यातना जाणवणारच नाहीत. प्रेषित पेत्राने इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टनंतर आपले पहिले जाहीर व्याख्यान दिले तेव्हा त्याने म्हटलेः “जो जीव त्या संदेष्ट्याचे [येशूचे] ऐकणार नाही तो लोकातून अगदी नष्ट केला जाईल.” यास्तव जीव मर्त्य आहे.—प्रे. कृत्ये ३:२३.
मृत पुन्हा जिवंत होतील का?
पवित्र शास्त्र खरे आहे असा ज्यांचा विश्वास आहे ते मानतात की, येशू वारला व तिसऱ्या दिवशी त्याचे पुनरुत्थान झाले. (प्रे. कृत्ये १०:३९, ४०) हे कसे घडले? देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने.
पण येशूचे पुनरुत्थान एक अपवाद होते का? नाही. पौलाने करिंथकरांच्या मंडळीला असे लिहिले की, “खिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच; तो महानिद्रा घेणाऱ्यांमध्ये प्रथमफळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून [खिस्ताद्वारे] मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे.” (१ करिंथकर १५:२०-२२) यास्तव, पुष्कळांचे मृतातून पुनरुत्थान होईल. येशूने असेही म्हटलेः “याविषयी आश्चर्य करू नका, कारण असा समय येत आहे की, जेव्हा स्मृती कबरेतील सर्व त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी . . . बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९) यामुळे लाखो लोकांचे पुनरुत्थान होणार ही खात्री मिळते.
वर दिलेल्या स्पष्टीकरणामुळे तुमच्या मनात पुनरुत्थान या विषयाबद्दल अधिक आस्था निर्माण झाली असेल तर तुम्ही कदाचित असे विचारालः ‘हे कोणाकोणाचे पुनरुत्थान होणार व केव्हा?’ या महत्त्वपूर्ण प्रश्नांबद्दल आपण आता पाहू या.