युद्धे नेहमीच असतील का?
जुलै १, १९१६ रोजी फ्रान्सच्या उत्तर भागातील पिकार्डी प्रांतातील रम्य शेतीच्या भूभागात सोमेच्या सर्वप्रथम युद्धास सुरवात झाली. प्रचंड तोफगोळ्यांचा मारा केल्यानंतर व अनेक हवाई हल्ले केल्यावर ब्रिटीश आणि फ्रेंच लष्कराने खंदकात लपलेल्या त्यांच्या विरोध्यांना, जर्मनांना निर्णायक धडक द्यावी या इराद्याने त्यांच्यावर प्रचंड हल्ला केला. पण तो भेदक ठरला नाही. उलट पहिल्या दिवशी ब्रिटीशांचे २०,००० सैनिक धारातीर्थी पडले. पुष्कळ आठवडे तुंबळ युद्ध चालूच होते पण ते यशस्वी ठरेना. आक्टोबरमधील पावसाने त्या युद्धक्षेत्रास चिखलाचा सागर केला. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत दोस्तरा केवळ पाच मैल पुढे सरकली. या काळादरम्यान ४,५०,००० जर्मन; २,००,००० फ्रेंच व ४,२०,००० ब्रिटीश सैन्य मारले गेले. दशलक्षापेक्षा अधिक सैनिक, जे बहुतेक तरुण होते, या युद्धात प्राणास मुकले.
पहिल्या जागतिक युद्धातील ही केवळ एक उपकथा होती. शिवाय पहिले महायुद्ध हे इतिहासभरात झालेल्या अगणित लढायांमधील एकमेव असे त्या काळापर्यंतचे अत्यंत भयानक युद्ध होते. मानवी जीवांचा हा केवढ्या मूर्खपणातील नाश!
मग, अशा मार्गाने मनुष्य एकमेकांच्या जिवांची हानी करण्यावर एवढा जोर का देत असतो? याला कारणे बहुत असली तरी त्यामध्ये स्वार्थपणा, महत्त्वाकांक्षीपणा, हाव तसेच सत्तेची व प्रतिष्ठेची लालसा ही आवर्जून सांगता येतील. युद्ध उद्भवण्याचे आणखी एक कारण म्हणजे राष्ट्रीयत्व. खरोखर, पवित्र शास्त्रात मानवी इतिहासाचे जे परिक्षण केलेले आहे त्याचेच अचूक परावर्तन ही युद्धस्थिती दाखवते. ते परिक्षण सांगतेः “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.”—उपदेशक ८:९.
धर्मानेही युद्धांना वेळोवेळी चिथावणी दिलेली आहे. धर्मवेड्या राष्ट्रांकरवी मध्ययुगात लढविण्यात आलेली धर्मयुद्धे केवळ दिखाऊ धार्मिक कारणास्तव होती; जसे की, ख्रिस्ती धर्मराज्ये आपणासाठी पॅलेस्टाईन परत मिळवू इच्छित होते. या शतकातील दोन जागतिक महायुद्धात वेगवेगळ्या धार्मिक संप्रदायांच्या धर्मगुरुंनी आपल्या बाजूच्या सैनिकांच्या धार्मिक भावनांना चेतवून दुसऱ्या बाजूच्या त्यांच्या शत्रूंचा अधिक प्रमाणात निःपात करण्याचे उत्तेजन दिले. आजही काही संघर्ष चक्क धार्मिक पार्श्वभूमीवरच चिथावले जात आहेत.
आशेची किरणे
तर मग, ही सर्व युद्ध थांबविली जातील अशी आशा आपण करू शकतो का? होय, जरुर. येशू ख्रिस्ताला “शांतीचा अधिपती” असे संबोधिण्यात आलेले आहे. तो या पृथ्वीवर असताना आपल्या नामाच्या अनुरोधात जगला. त्याने लोकांस शिकविले की, त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांवर आपणासारखीच प्रीती करावी. याशिवाय त्याने त्यांना, त्यांच्या शत्रूंवरही प्रेम करावयास सांगितले. (यशया ९:६; मत्तय ५:४४; २२:३९) याचा परिणाम हा झाला ही, पहिल्या शतकात त्याच्या शिकवणूकीकडे ज्यांनी लक्ष दिले ते शांततावादी, आंतरराष्ट्रीय बंधुत्व पाळणारे बनले. एकमेकांशी युद्ध करणे ही गोष्ट त्यांच्या विचारालादेखील भयानक वाटली. तथापि, कालांतराने या सुरवातीच्या ख्रिश्चनांठायीच्या या शुद्ध विश्वासाला डागाळले गेले. नंतर चर्चेस देखील राजकारणात ढवळाढवळ करू लागली आणि त्यांचेही हात राष्ट्रांच्या युद्धातील रक्ताने माखू लागले.
बऱ्याच काळानंतर, युरोपात बदल होण्याचे वारे वाहू लागले. असे दिसू लागले की, मनुष्यजातीला वेळोवेळीच्या युद्धांचा कंटाळा आलेला आहे. १८९९ मध्ये व परत १९०७ मध्ये नेदरलँडमधील हेग या शहरी आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरविण्यात आली. १८९९ मधील अधिवेशनात “आंतरराष्ट्रीय संघर्षाकरिता एक पॅसिफिक [शांतीदायक] निर्वाळा” मंजूर करण्यात आला. यामुळे अनेकांना वाटू लागले की हे २० वे शतक मावळू लागेल तसतसे युद्धांची पाशवी आवड लोपत जाईल. परंतु, पहिल्या जागतिक महायुद्धाच्या तोफांनी सर्व आशा धुरात उधळून लाविल्या. मग याचा असा अर्थ होतो का की, मनुष्याने अपेक्षिलेल्या शांतीच्या आशा कधीच पूर्ण होणार नाहीत?