विलापगीत १:१-५:२२ या शास्त्रवचनांपासून धडे
दुःखामध्येही यहोवा आशा देतो
यहोवा हा “आशा देणारा देव” आहे व तो दुःखामध्येही आशा देतो. (रोमकर १५:१३) हाच मुद्दा विलापगीत या पुस्तकात स्पष्ट करण्यात आला आहे. हे पुस्तक यहोवाचा संदेष्टा व साक्षीदार यिर्मया याने इ. स. पूर्व ६०७ मध्ये पूर्ण केले. पण त्यात आढळणारे काही धडे आपण ठळकरित्या बघू या.
यरुशलेमाची दैन्यावस्था
पाप आनंद आणीत नाही. पहा ती यहुदाची समृध्द राजधानी पापीष्ठ यरुशलेम कशी भयाण दिसते आहे. यहुदा कोणा विधवा झालेल्या राजकन्येप्रमाणे अश्रु ढाळत आहे कारण तोहि उद्ध्वस्त झाला आहे. त्याचे “वल्लभ” मिसर यालाही बाबेलान्यांनी इ. स. पूर्व ६०७ मध्ये संपादित केलेल्या विजयापासून त्याला वाचवता आले नाही. लोक आता पूर्वीसारखे सियोनेकडे सणासाठी येत नाहीत. तिची मुले आता बंदिवान झाली आहेत. तिचे शत्रु तिच्या पतनावर उल्लास करीत आहेत. अशुचि विदेश्यांनी मंदीर भ्रष्ट केले आहे व लोक अन्नासाठी आपल्या मोलवान वस्तु देत आहेत. केवळ पापामुळे हे सगळे घडले आहे!—१:१-११.
पातक्यांना शिक्षा देण्यात यहोवा न्यायी आहे. हेच यरुशलेम सुध्दा कबूल करतो व तसे बोलून दाखवितो. देवाने त्याला जे दुःख दिले आहे तसे दुःख इतरत्र कोठे आहे का हे तो विचारतो. त्याने अग्नि पाठविला व मंदीर उजाड झाले. शहराचे पाप एका जोखडासमान झाले आणि यहोवाने शहराचे “द्राक्षकुंड” तुडविले तेव्हा रक्त रसाप्रमाणे वाहू लागले. सियोनाने दुःखाने व याचनेने आपले हात पसरिले पण तिचा सांत्वनकर्ता कोणीही नाही. यहोवा बंडखोर यरुशलेमास शिक्षा देण्यात न्यायी आहे. तो यरुशलेमाच्या शत्रुंनाही असाच दंड देवो.—१:१२-२२.
“यहोवाचा क्रोध”
जबाबदार लोकांनी पापास धिक्कारले नाही तर ते दोषी आहेत. देवाने यरुशलेमास “आकाशातून पृथ्वीवर झुगारुन दिले आहे,” याचे व देवाचे “पदासन” जे मंदीर त्याचाही त्याने नाश होऊ दिला. (स्तोत्रसंहिता १३२:७) अशारितीने त्याने यहुदाचे “राज्य भ्रष्ट केले आहे.” शत्रुंनी एखाद्या मांडवाप्रमाणे मंदीराचा विध्वंस केला आहे, त्यांनी संपादिलेल्या विजयाचा गोंगाट सणासुदीच्या जल्लोषासारखा होत आहे. मरणाच्या लागास आलेली मुले आपल्या मातांकडे अन्नान्न करीत आहेत. पण या सगळ्या गोष्टींचा दोष कोणाचा आहे? तो खोट्या संदेष्ट्यांचा दोष आहे, त्यांनीच खरे पाहता यरुशलेमाच्या पापाचा धिक्कार करण्याऐवजी विपरीत भाकिते केली. (यिर्मया १४:१३) होय, प्रार्थना करा, कारण “यहोवाच्या क्रोधदिनी” बरेच मृत्युमुखी पडले आहेत!—२:१-२२.
यहोवाची दया सनातन आहे
आम्ही धीर धरुन यहोवाकडे आशेने पाहत राहिले पाहिजे. पीडित लोकांच्या वतीने भाष्य करताना यिर्मया प्रातिनिधिकरित्या हे उद्गार काढतो. देव त्याची प्रार्थना खुंटवितो त्यामुळे तो त्याच्या शत्रुंमध्ये उपहासाचा व निंदाव्यंजक पोवाड्याचा विषय बनतो. त्याची आशा किंवा ‘यहोवाविषयी त्याला वाटत असलेली आशा’ विलय पावली आहे असे त्याला वाटते. तरीपण तो ‘मुकाट्याने वाट पाहत आहे,’ कारण “जे यहोवाची आशा धरुन राहतात त्यांस . . . [तो] प्रसन्न होतो.”—३:१-२७.
खरा पश्चाताप इश्वरी दया प्रदान करतो. याची खात्री असल्यामुळेच यिर्मया हे आर्जवितोः “चला, आपण . . . यहोवाकडे परत जाऊ.” लोकांच्या पापाच्या भाराने यहोवाचा क्रोध संतप्त झाल्यामुळे ते प्रार्थनेद्वारे यहोवाकडे जाऊ शकत नाही. पण यिर्मया याचना करतोः “हे यहोवा, . . . मी तुझ्या नामाचा धावा केला [आहे], माझ्या आरोळीला आपला कान बंद करु नको.” अर्थातच, पश्चाताप न दाखविणारे शत्रू नष्ट होतील.—३:२८-६६.
“आम्हास परत घे”
हेतुपुरस्सर पापाकरवी आम्ही आपणावर नाश आणू शकतो. यहुदाच्या पापामुळे “सीयोनेचे प्रिय पुत्र” निकामी अशा कुंभाराच्या भंगलेल्या पात्रासारखे झाले आहेत. वेढ्यात जे तरवारीने ठार झाले ते ज्यांना उपासमारीने हळूवारपणे मरण आले त्यापेक्षा बरे होते असेच म्हणावे लागेल. खरेच, “यहोवाने आपला क्रोध पूर्ण प्रगट केला आहे.” भ्रष्ट झालेले संदेष्टे व याजक अंधळेपणाने भटकत आहेत आणि ‘यहोवाचा अभिषिक्त’ सिद्कीया राजा याला धरुन नेण्यात आले आहे. तर आता देव पापीष्ठ अदोमाकडे आपले लक्ष वळवो.—४:१-२२.
दुःखामध्ये केवळ यहोवाच खरी आशा देतो. यिर्मयाला याची जाणीव आहे व म्हणूनच तो याचना करतोः “हे यहोवा आम्हावर काय गुजरले याचे स्मरण कर.” ‘परदेशीयांनी आमची घरे हस्तगत केली आहेत, आमच्या पूर्वजांनी केलेल्या दुष्कर्मांचे फळ आता आम्ही भोगतो आहे. पोरे मोठ्या कष्टाने लाकडे वाहून नेत आहेत.’ तरीही यिर्मया दयेची आशा धरुन आहे व तो प्रार्थना करतोः “हे यहोवा तू आम्हास आपणाकडे परत घे म्हणजे आम्ही वळू.”—५:१-२२.
तद्वत, विलापगीतात दिलेल्या या धड्यांवर मनन कराः पाप आनंद देत नाही. पाप्यांना शिक्षा देण्यात देव न्यायी आहे व शिवाय जबाबदार पदी असणारे लोक जर चुकीची कृत्ये धिक्कारीत नाहीत तर ते दोषी आहेत. आम्ही सहनतेने यहोवाची आशा धरुन राहिले पाहिजे आणि खऱ्या पश्चातापामुळे इश्वरी दया मिळू शकते हा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. पण जर आम्ही हेतुपुरस्सर पाप करीत राहिलो तर स्वतःवर नाश ओढावून आणू शकतो. हे प्रेरित पुस्तक यहोवा हाच आम्हाला दुःखामध्ये खरी आशा प्रदान करु शकतो याची खात्री देते.
[३१ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
◻ १:१५—यहोवाने आज्ञा दिली व तसे घडू दिले म्हणून त्याने “यहूदाच्या कुंवार कन्येला द्राक्षकुंडात तुडविले आहे.” “यहुदाची कुंवार कन्या” ही यरुशलेम आहे व तिला कुमारी असे समजण्यात आले होते. तथापि, बाबेलोन्यांनी इ. स. पूर्व ६०७ मध्ये त्या राजधानी शहराचा विध्वंस केला तेव्हा इतका रक्तपात घडला की जणू कोणा द्राक्षकुंडातून रस ओघळत आहे असे दिसत होते. याचप्रमाणे प्रतिनमुनेदार यरुशलेम म्हणजे ख्रिस्ती धर्मराज्य यालाही असेच चिरडले जाईल हे यहोवा पाहील.
◻ २:६—देवाचा “मांडव” हा यरुशलेमाचे मंदीर होता. त्याचे पवित्रस्थान जेव्हा बाबेलोन्यांकरवी उद्ध्वस्त झाले तेव्हा त्याने त्याचा, बागेचा जसा विध्वंस करण्यात येतो त्याप्रमाणे ‘विध्वंस’ होऊ दिला. अशाप्रकारे तप्त सूर्यापासून मिळणारा आसरा तात्पुरता भंग पावला.
◻ ३:१६—बाबेलोन्यांनी शहराचे पतन केल्यामुळे अविश्वासू यरुशलेमावर यहोवाने जी विपत्ती येऊ दिली ती या शब्दात वर्णिण्यात आली आहेः “त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडावयास लाविले आहे.” हे उघड आहे की जेव्हा इस्त्राएली बंदिवासात जात होते त्यावेळी त्यांना जमिनीत खड्डा खणून आपली भाकरी भाजावी लागली. याकरताच त्यांच्या भाकरीत खडेही आले व ते खाताना दाताखाली रगडून दाताचा काही भाग तुटला गेला.
◻ ४:३—मातांनी आपल्या मुलांविषयी जी निष्ठुरता दाखवली त्याचा विरोधाभास येथे कोल्ही आपल्या मुलांची जी काळजी घेतात त्याकरवी दाखविण्यात आला आहे. कोल्हा हा निर्दयी प्राणी आहे असे समजले जाते तरी कोल्हीण ‘आपले दूध आपल्या पिलांना पाजते.’ यरुशलेमावर पडलेल्या वेढ्यामुळे अन्नाची इतकी भीषण टंचाई निर्माण झाली होती की दुष्काळात अडकलेल्या स्त्रिया निर्दयी बनल्या, त्यांना मुलांना पाजण्यास दूध नव्हते आणि स्वतः जिवंत राहावे म्हणून त्यांनी आपल्या मुलांचा बळी घेऊन त्यावर आपला चरितार्थ केला! (विलापगीत २:२०) याप्रकारे, शहामृग जसे अंडी घालून तेथेच सोडून जाते तशी या स्त्रियांची स्थिती झाली होती.
◻ ५:७—यिर्मयाच्या काळातील यहुद्यांना आपल्या पूर्वजांच्या पापाचा भार वहावा लागला पण याचा हा अर्थ नाही की यहोवा पालकांच्या पापाबद्दल मुलांना थेट शिक्षा देतो. खरे म्हणजे चुकीच्या पातकांचा परिणाम पुढल्या पिढ्यांना दीर्घकाळापर्यंत जाणवत राहातो. (यिर्मया ३१:२९, ३०) याकारणास्तव, आपल्याला व्यक्तीगतपणे देवाला स्वतःचा जाब द्यावयाचा आहे हे आम्ही लक्षात ठेवणे बरे.—रोमकर १४:१२.