येशूचे जीवन व उपाध्यपण
येशूचा पहिला चमत्कार
येशू व त्याचे नवीन लाभलेले शिष्य हे नुकतेच यार्देन खोरे सोडतात. आंद्रिया, पेत्र, योहान आणि याकोब, फिलिप्प व नथनेल हे अलिकडील एक दोन दिवसामागे येशूच्या पहिल्या शिष्यांपैकी एक बनले आहेत.
आता ते सर्वजण त्यांच्या मुळच्या गावी, गालील प्रदेशाच्या मार्गावर आहेत. नथनेलचे गाव काना येथे त्यांचा जाण्याचा बेत आहे. येशू जेथे मोठा झाला त्या नासारेथापासून जवळच पर्वतांनी वेढलेल्या अशा जागी हे शहर आहे. त्या सर्वांना काना येथील लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण आहे.
येशूची आई सुध्दा या लग्नाकरिता आली आहे. मित्राच्या कुटुंबातील लग्न असल्यामुळे मरीया ही काही पाहुण्यांच्या गरजा पुरविण्याचे काम पाहत आहे. त्यामुळे तिला एका गोष्टीची गरज लक्षात येते. याबद्दल ती येशूला म्हणते: “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”
मरीया असे म्हणते तेव्हा तिला असे सुचवावयाचे आहे की येशूने द्राक्षारसाच्या तुटवड्यासंबंधी काहीतरी करावे. येशू प्रथम टाळाटाळ करतो. “याच्याशी तुझा माझा संबंध काय?” असे तो विचारतो. देवाचा नियुक्त राजा या नात्याने त्याला त्याच्या हालचाली साठी त्याच्या कुटुंबाचे किंवा मित्रांचे मार्गदर्शन नको होते. यामुळे मरीया सूज्ञपणे सर्व गोष्टी आपल्या मुलाच्या हाती सोपविते. ती सेवकांना म्हणते: “हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा.”
तेथे सहा दगडी रांजण आहेत त्यामध्ये प्रत्येकी दहा गॅलन पाणी मावते. येशू तेथील सेवकांना सांगतो: “रांजण पाण्याने भरा.” सेवक ते रांजण पाण्याने पूर्णपणे भरतात. तेव्हा येशू त्यांना म्हणतो: “आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्यास द्या.”
भोजन कारभारी हा उत्तम दर्जाचा द्राक्षारस पाहून आश्चर्यचकित होतो. पण हा द्राक्षारस चमत्काराद्वारे बनविला आहे हे त्याला माहीत नसते. तो वराला बोलावून म्हणतो: “प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले की मग नीरस द्राक्षारस वाढतो. तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”
हाच येशूचा पहिला चमत्कार होय. हा चमत्कार पाहून त्याच्या नव्या शिष्यांचा विश्वास आणखीन बळकट होतो. यानंतर ते सर्वजण त्याची आई व भावांबरोबर गालील समुद्राजवळील कफर्णहुमाकडे प्रवास करू लागतात. योहान २:१–१२.
◆ काना येथील लग्न केव्हा घडते?
◆ येशू त्याच्या आईच्या सूचनेवर आक्षेप का घेतो?
◆ येशू कोणता चमत्कार करतो आणि इतरांवर त्याचा कसा परिणाम होतो?