वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी उपाय
आहे त्यात समाधानी राहा
जे लोक समाधानी असतात ते आपल्या जीवनात आनंदी असतात. परिस्थिती बदलते तेव्हा आहे त्यात समाधानी राहायला ते आपल्या जीवनशैलीत फेरबदल करायला तयार असतात.
हे का महत्त्वाचं आहे?
मानसशास्त्रज्ञ जेसिका कोल्हर यांनी असं लिहिलंय, की ‘समाधानी लोकांचा दृष्टिकोन जास्त सकारात्मक असतो. त्यांना सहसा इतरांचा हेवा वाटत नाही. त्यामुळे ते आनंदी असतात आणि ते जास्त चिंता करत नाहीत. खरंतर, पैसा आणि भौतिक गोष्टी जास्त नसल्या, तरी ते खूप आनंदी असतात. कारण ते त्यांच्या जीवनात अशा गोष्टींना जास्त महत्त्वं देतात ज्या पैशांनी विकत घेता येत नाहीत. जसं की, घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे मिळणारा आनंद.’
तुम्ही काय करू शकता?
इतरांसोबत तुलना करायचं टाळा. आपण जर आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींची तुलना इतरांकडे असलेल्या महागड्या आणि चैनीच्या गोष्टींशी केली, तर आपण कधीच समाधानी राहणार नाही आणि आपल्याला इतरांचा हेवा वाटेल. शिवाय, अशा प्रकारे तुलना करणं वस्तुस्थितीकडे डोळेझाक करण्यासारखं ठरेल. कारण ज्यांच्याकडे जास्त मालमत्ता असते, ते कदाचित कर्जबाजारीसुद्धा असू शकतात. सेनिगॉलमध्ये राहणारी निकोल म्हणते, “आनंदी राहायला मला जास्त गोष्टींची गरज नाही. मी जर समाधानी आहे, तर इतरांकडे जास्त गोष्टी असल्या तरी मला काही फरक पडत नाही.”
हे करून बघा: इतरांची संपत्ती आणि महागडी जीवनशैली दाखवणाऱ्या जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्ट पाहायचं टाळा.
कदर बाळगा. आपल्याजवळ जे काही आहे त्याची आपल्याला कदर असेल, तर आपण समाधानी असण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला जास्त गोष्टींची गरज आहे किंवा आपल्याला जास्त मिळालं पाहिजे असा विचार आपण करणार नाही. हैटीमध्ये राहणारा रॉबर्टन म्हणतो: “इतरांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींवर मी विचार करतो. मग त्यांनी जे काही केलंय त्याबद्दल मला किती कदर आहे हे मी त्यांना सांगतो. मी माझ्या आठ वर्षांच्या मुलालाही शिकवलंय, की जेव्हा कोणी आपल्याला काहीतरी देतं तेव्हा आपण थँक्यू म्हटलं पाहिजे.”
हे करून बघा: तुम्हाला ज्या गोष्टींची कदर वाटते त्या गोष्टी दररोज लिहून काढा. मग ते चांगलं आरोग्य असेल, तुमचं कुटुंब असेल, चांगले मित्र असतील किंवा एखादा सुंदर सूर्यास्त असेल.
आहे त्यात समाधानी राहणं आपल्या सगळ्यांनाच काही वेळा कठीण जाऊ शकतं. पण तरीही आपण समाधानी राहायचा प्रयत्न केला, तर आपल्याला फायदाच होईल! कारण आपण समाधानी असतो तेव्हा आनंदीही असतो आणि आनंद पैशाने विकत घेता येत नाही.