जात—एवढा वादग्रस्त विषय का?
लिखित इतिहासाच्या सुरवातीपासूनच, “त्यांना” व “आम्हाला” या कल्पनेने लोकांच्या विचारसरणीवर वर्चस्व गाजवले आहे. पुष्कळांचे असे निश्चित मत झाले आहे की, तेच केवळ सर्व गोष्टी बरोबर पद्धतीने करणारे असे सर्वसामान्य लोक आहेत. यालाच शास्त्रज्ञ, वंशाभिमान असे म्हणतात, म्हणजेच एखाद्याचे स्वतःचे लोक आणि एखाद्याच्या पद्धती महत्त्वाच्या आहेत अशी कल्पना असणे.
उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीक लोक, ग्रीक नसणाऱ्या इतर सर्व व्यक्तींसाठी “बर्बर” ही संज्ञा वापरत होते व त्यांच्याबद्दल त्यांचे अनुकूल मत नव्हते. ग्रीक लोकांना परकीय भाषा, बुद्धीहीन “बड-बड” अशी वाटत होती, त्याद्वारे “बर्बर” हा शब्द निर्माण झाला. ग्रीक लोकांच्या आधी इजिप्तच्या लोकांना आणि ग्रीक लोकांच्या नंतरच्या रोमी लोकांना देखील ते इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे वाटत होते.
चीन हा विश्वाचा नसला तरी जगाचे केंद्रस्थान होते असे चिनी लोकांचे निश्चित मत होते त्यामुळे पुष्कळ शतकांसाठी ते त्यांच्या देशाला ड्रुंग गुओ, किंवा मध्य राज्य असे म्हणत होते. नंतर, लाल केस, हिरवे डोळे व लाल चामडी असणारे युरोपातील मिशनरी, चीनमध्ये आले तेव्हा चिनी लोकांनी त्यांना “विदेशी सैतान” असे संबोधले. त्याचप्रमाणे, पूर्वेकडील रहिवाशी प्रथम युरोप आणि उत्तर अमेरिका येथे आले तेव्हा त्यांच्या तिरप्या डोळ्यांमुळे आणि त्यांच्या चालीरिती विचित्र समजल्या गेल्यामुळे, थट्टा आणि संशयाला सहजपणे बळी पडले.
तरीपण, याबद्दल विचार करण्यासाठी एक अर्थपूर्ण वस्तुस्थिती आहे, कारण मानवजातीचे प्रकार [इंग्रजी] म्हणते त्याप्रमाणे: “एखाद्याच्या [जातीय] श्रेष्ठत्वामध्ये विश्वास करणे सोपे आहे; परंतु विज्ञानाच्या शोधांचा उपयोग करून त्याला पुरावा देण्याचा प्रयत्न करणे ही एक वेगळीच बाब आहे.” एक जात दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी जे प्रयत्न केले गेले ते सापेक्षतः नवीनच आहेत. ॲशली मॉनटागू या मानवशास्त्रज्ञांनी असे लिहिले की, “मानसिक तसेच शारीरिकरीत्या एक दुसऱ्यापासून भिन्न असणाऱ्या मानवांच्या नैसर्गिक किंवा जैविक जाती असतात, ही कल्पना अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत निर्माण झाली नव्हती.”
जातीय श्रेष्ठत्वाचा वादविषय १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या दरम्यान एवढा ज्वलंत का झाला?
गुलामांचा व्यापार आणि जात
सर्वात मोठे कारण हे की, तोपर्यंत गुलामांचा व्यापार अगदी टोकाला पोहोंचला होता, आणि युरोप व अमेरिकेमध्ये हजारो आफ्रिकी लोकांना जबरदस्तीने नेण्यात येत होते व त्यांना गुलामी करण्यास लावले जात होते. कुटुंबाचे विभाजन करून पुरुष, स्त्रीया व मुलांना जगाच्या वेगवेगळ्या भागात पाठवले जाई, आणि त्यांची पुन्हा कधी भेट घडत नसे. ख्रिस्ती असण्याचा दावा करणारे बहुसंख्य गुलामांचे व्यापारी आणि गुलामांचे मालक अशा अमानुष कृत्यांचे समर्थन कसे करू शकत होते?
काळे आफ्रिकी लोक नैसर्गिकरीत्या कनिष्ठ होते असा दृष्टिकोन फैलावण्याद्वारे. डेवीड ह्यूम या १८ व्या शतकातील स्कॉटीश तत्त्वज्ञांनी लिहिले, “सर्व निग्रो आणि सामान्यतः इतर सर्व जातीचे लोक गोऱ्या लोकांपेक्षा कनिष्ठ आहेत असा संशय घेण्यात मी योग्य आहे.” वस्तुतः, ह्यूमने असा दावा केला की एखाद्याला, “[निग्रो लोकांमध्ये] कोणताही बुद्धीमान शोध, कला, विज्ञान,” आढळून येणार नाही.
तथापि, असे दावे चुकीचे होते. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया (१९७३) नमूद करते: “शेकडो वर्षांआधी आफ्रिकेच्या विविध भागात अतिशय विकसित अशी निग्रो राज्ये अस्तित्वात होती. . . . पश्चिम आफ्रिकेच्या टिंबक्टू येथे इ.स. १२०० आणि १६०० च्या दरम्यान एक निग्रो-अरबी विश्वविद्यापीठ झपाट्याने प्रगती करीत होते आणि ते स्पेन, उत्तर आफ्रिका, आणि मध्यपूर्व येथे महशूर झाले.” तरीसुद्धा, गुलामांच्या व्यापारामध्ये गोवलेल्यांनी, काळे लोक गोऱ्या लोकांपेक्षा कनिष्ठ जातीचे होते, किंवा मानवांपेक्षा खालच्या योनीचे होते हा ह्यूमसारख्या तत्त्वज्ञानांचा दृष्टिकोन उचलला.
धर्म आणि जात
गुलामांच्या व्यापाऱ्यांना धार्मिक नेत्यांकडून त्यांच्या जातीय दृष्टिकोनासाठी पुरेसा पाठिंबा मिळाला. रोमन कॅथोलिक पोपच्या आज्ञेने १४५० च्या शतकामध्येच, “मूर्तिपूजक” आणि “काफर” लोकांचे “प्राण”, “देवाच्या राज्याकरता” वाचवण्यासाठी, त्यांना ताब्यात घेण्यास आणि गुलाम बनवण्यास मंजुरी दिली. चर्चकडून आशीर्वाद मिळाल्यामुळे, युरोपच्या प्राचीन शोधक प्रवाशांना आणि गुलामाच्या व्यापाऱ्यांना तद्देशीय लोकांना क्रूर वागणूक देताना मुळीच रुखरुख वाटली नाही.
गुलामगिरी आणि मानवी प्रगती [इंग्रजी] हे पुस्तक म्हणते, “१७६० या शतकामध्ये तसेच येणाऱ्या पुष्कळ शतकांमध्ये देखील जे होणार होते त्याप्रमाणे, कॅथोलिक, अँग्लिकन, लुथेरन, प्रेस्बिटीयरीन आणि रिफॉर्मड या चर्चच्या लोकांकडून काळ्या लोकांच्या गुलामगिरीसाठी मंजुरी दिली गेली.” ते पुढे म्हणते: “कोणत्याही आधुनिक चर्चने किंवा गटाने त्याच्या सदस्यांना काळ्या गुलामांचे मालक होण्यापासून किंवा त्यांचा व्यापार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नव्हता.”
काही चर्चेस सार्वत्रिक ख्रिस्ती बंधुत्वाबद्दल बोलले आहेत तरी त्याबरोबरच त्यांनी जातीयतेचा वादविवाद तीव्र करणाऱ्या शिकवणींना चेतवले आहे. उदाहरणार्थ, एन्सायक्लोपिडिया जूडायका असे म्हणते की “केवळ दीर्घकालीन लढायांनंतर आणि धर्मशास्त्राच्या चर्चेनंतर स्पेनच्या लोकांनी हे ओळखले की अमेरिकेमधील तद्देशीय जातींच्या लोकांचे देखील प्राण होते.”
त्याचा अर्थ असा होता की, जोपर्यंत तद्देशीय जातींच्या लोकांचे “प्राण,” त्यांना ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्याने “वाचवले” जात होते, तोपर्यंत त्यांना शारीरिकरीत्या कशी वागणूक दिली जाते ते महत्त्वाचे नव्हते. आणि काळ्या लोकांबद्दल बोलायचेच झाले तर, नाहीतरी ते देवाकडून शापित असलेले आहेतच असा वाद पुष्कळ धार्मिक नेत्यांनी मांडला. याला पुष्टी देण्यासाठी शास्त्रवचनांचा विपर्यास केला गेला. रॉबर्ट जेमसन, ए. आर. फॉस्सेट आणि डेवीड ब्राऊन या पाद्रींनी त्यांच्या पवित्र शास्त्रावरील भाषणात असे निश्चयाने सांगितले: “इजिप्तची अवनती आणि हामचे वंशज असणाऱ्या आफ्रिकी लोकांच्या गुलामगिरीद्वारे, कनानी लोकांचा नाश होऊन कनान शापित होईल [उत्पत्ती ९:२५], या विधीलिखिताची पूर्तता, झाली आहे.”—संपूर्ण पवित्र शास्त्रावरील टिकात्मक व स्पष्टीकरण देणारे भाष्य [इंग्रजी].
काळ्या जातीच्या लोकांच्या पूर्वजाला शापित केले होते ही शिकवण, पवित्र शास्त्रात मुळात शिकवलीच नाही. सत्य हे आहे की, काळ्या लोकांचा वंश कनानचा नसून ते कुशीचे वंशज होते. जॉन वुलमन यांनी १७६२ मध्ये असा वाद मांडला की, काळ्या लोकांच्या गुलामगिरीबद्दल ठरवण्यासाठी या पवित्र शास्त्रीय शापाचा उपयोग करणे व त्यांना त्यांच्या नैसर्गिक हक्कांपासून वंचित ठेवणे ही कल्पना, “विश्वसनीय तत्त्वांच्या वर्चस्वाची प्रामाणिक इच्छा करणाऱ्या कोणा एका व्यक्तीच्या मनात घालण्यासाठी फारच अतिनिंद्य आहे.”
खोटे विज्ञान आणि जात
काळे लोक कनिष्ठ जातीचे आहेत या सिद्धांताला पाठबळ देण्याच्या प्रयत्नात खोट्या विज्ञानाने देखील त्याचा आवाज मिळवला आहे. फ्रेंच लेखक, जोसेफ द गॉबीनो यांनी १९ व्या शतकाच्या दरम्यान लिहिलेल्या जातीय भेदावर निबंध [इंग्रजी] या पुस्तकाने, अशा भावी वाङ्मयीन लेखनांसाठी पाया घातला. त्यामध्ये, गॉबीनो यांनी श्रेष्ठतेच्या उतरत्या क्रमानुसार, गोऱ्या, पिवळ्या, आणि काळया अशाप्रकारे मानवांना वेगवेगळ्या तीन जातींमध्ये विभाजीत केले. त्यांनी असा दावा केला की प्रत्येक जातीचे अद्वितीय गुण रक्तामध्ये असतात आणि दोन भिन्न वंश अंतरजातीय विवाहाद्वारे एकत्र आले तर अवनती होऊ शकते आणि श्रेष्ठ गुणांना गमावले जाऊ शकते.
गॉबीनो असा वाद मांडतात की, एके काळी, गोरे, उंच, फिकट तपकिरी केस असलेले, निळसर डोळ्यांच्या लोकांची शुद्ध जात अस्तित्वात होती ज्यांना ते आर्य लोक म्हणतात. पुढे ते म्हणतात, आर्य लोकांनीच भारतामध्ये सुसंस्कृती आणि संस्कृत भाषेची सुरवात केली आणि याच आर्य लोकांनी प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये, सुसंस्कृती प्रस्थापित केली. परंतु कनिष्ठ सामान्य लोकांबरोबर अंतरजातीय विवाह केल्यामुळे, एके काळी श्रेष्ठ असणारी सुसंस्कृती तसेच आर्य जातीची अलौकिक बुद्धी आणि उत्कृष्ठ गुण देखील गमावले गेले. गॉबीनो पुढे निश्चयपूर्वक सांगतात की, उत्तर युरोप मधील नॉर्ड्वंशीय लोक आणि त्यांचाच एक भाग म्हणजे जर्मनचे लोक हे आता अस्तित्वात असणारे शुद्ध आर्य लोकांच्या वंशाच्या जवळील वंशाचे लोक आहेत.
गॉबीनोच्या, तीन-जातीय विभागाबद्दल, रक्ताच्या वंशावळीबद्दल, आर्य जातीबद्दल, असणाऱ्या मूलभूत कल्पनांना कोणताही वैज्ञानिक पुरावा नव्हता आणि आजचा वैज्ञानिक समाज त्याला संपूर्णतः अविश्वसनीय असे मानतो. तरीसुद्धा, इतरांनी त्यांचा पटकन स्वीकार केला. त्यांच्यापैकी एक, हॉस्टेन स्टीवॉर्ट चेम्बरलेन हा इंग्रज मनुष्य होता, गॉबीनोच्या कल्पनांनी तो इतका आकर्षित झाला की त्याने जर्मनीमध्ये वस्ती करावयास सुरवात केली आणि याची बाजू घेतली की केवळ जर्मनच्या लोकांकडूनच शुद्ध आर्य जातीचे परिरक्षण करण्याची आशा होती. स्पष्टतः, चेम्बरलेनचे साहित्य जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाचले जाऊ लागले आणि त्याचा वाईट परिणाम झाला.
जातीयवादाचा वाईट परिणाम
ॲडोल्फ हिटलर याने माईन कॉम्फ (माझा लढा) या पुस्तकात ठासून सांगितले की जर्मन जात ही आर्याची श्रेष्ठ जात होती आणि तीच या जगावर राज्य करील असे त्यांच्या भाग्यात लिहिलेले होते. हिटलरच्या मते, जर्मन अर्थशास्त्राचा नाश करण्यासाठी कारणीभूत असणारे यहुदी, या भव्य भाग्याला अडथळा होते असे त्याला वाटले. अशाप्रकारे, यहुद्यांचा आणि युरोपमधील इतर अल्पसंख्याक लोकांचा समूळ नाश करण्यास सुरवात झाली, व हे मानवी इतिहासातील निर्विवाद दुःखाच्या काळांपैकीचे एक होते. गॉबीनो आणि चेम्बरलेन यांच्या तसेच इतर जातीयवादाच्या कल्पनांचा हा विनाशकारी परिणाम होता.
तथापि, हा दुष्टपणा केवळ युरोपपर्यंतच सीमीत नव्हता. महासागराच्या पलिकडे, म्हणजेच तथाकथित नवीन जगातही, अशाचप्रकारच्या निराधार कल्पनांमुळे, निर्दोष लोकांच्या पिढ्यांवर अगणित त्रास ओढवला. आफ्रिकी गुलामांना अमेरिकेतील १८६१-१८६५ च्या यादवी युद्धानंतर मोकळीक मिळाली तरी, इतर नागरिक ज्या विशेष अधिकारांचा आनंद घेत होते त्या अधिकारांचा आनंद घेण्यापासून काळ्या लोकांना मनाई करणारे नियम पुष्कळ राज्यांमध्ये काढण्यात आले. का बरे? गोऱ्या नागरिकांना वाटले की काळ्या लोकांच्या जातीची, नागरिकत्वाच्या कामांमध्ये आणि शासनामध्ये सहभाग घेण्यासाठी, तेवढी बौद्धिक क्षमता नव्हती.
वर्णसंकराचा नियम ज्यामध्ये गोवलेला होता अशा घटनेच्या एका उदाहरणावरून हे दिसते की जातीयवादाच्या भावना किती खोलवर रूजल्या होत्या. काळ्या आणि गोऱ्या वर्णाच्या लोकांमधील विवाहांवर हा नियम प्रतिबंध घालत होता. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका जोडप्याला त्या घटनेचा निकाल ऐकवताना न्यायाधीशाने असे म्हटले: “सर्वसमर्थ देवाने, गोरे, काळे, पिवळे, मॅले आणि लाल अशा जातींना निर्माण केले आणि त्याने त्यांना वेगवेगळ्या खंडात ठेवले आणि देवाच्या या व्यवस्थेच्या आड कोणी आले नसते तर असे विवाह होण्याची काही कारणेच नसती.”
या न्यायाधीशाने हे वाक्य, १९ व्या शतकात किंवा कोणत्या ग्रामीण भागात उच्चारले नसून, त्याने हे १९५८ मध्ये, अमेरिकेच्या राजभवनापासून १०० किलोमीटरच्या आतील अंतरावर असलेल्या भागात म्हटले! खरे म्हणजे, अमेरिकेच्या सर्वश्रेष्ठ न्यायालयाने १९६७ च्या नंतरच अंतरजातीय विवाहासंबंधाने असणाऱ्या सर्व कायद्यांना रद्द केले.
अशा तफावत निर्माण करणाऱ्या नियमांमुळे, तसेच शाळांमध्ये, चर्चेसमध्ये आणि इतर सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये इतरांपासून विभक्त ठेवल्यामुळे आणि नोकरी आणि घर पुरवठ्याच्या बाबतीत तफावत केल्यामुळेच अशांतता, मोर्चे आणि हिंसा या गोष्टी, अमेरिकेमध्ये आणि इतर पुष्कळ ठिकाणी जीवनाच्या वास्तविकता बनल्या आहेत. जीवांचे आणि मालमत्तेच्या नुकसानीला एखाद्याने विचारात घेतले नाही तरी, त्यामुळे झालेली यातना, द्वेष आणि वैयक्तिकांना अपमानास्पद दिलेली वागणूक व त्रास या गोष्टी तथाकथित सुसंस्कृत समाजासाठी लज्जास्पद आणि कलंकित करणाऱ्या आहेत असेच संबोधले जाऊ शकते.
याप्रमाणे, जातीयवाद ही मानवी समाजाला पीडा देणारी अशी कलह निर्माण करणारी शक्ती आहे. निश्चितच, आमच्या अंतःकरणांचे स्वपरीक्षण करून आम्ही स्वतःला असे विचारणे आवश्यक आहे की: एक जात दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे असे शिक्षण देणाऱ्या शिकवणींना मी नाकारतो का? जातीय श्रेष्ठतेविषयी असणाऱ्या उरलेल्या भावनांना मी माझ्यामधून काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे का?
स्वतःला असे विचारणे देखील उचित असेल की: आज जातीयवादाची प्रवृत्ती आणि ताण जो इतका माजलेला आहे याचा कधी अंत केला जाईल याविषयी कोणती आशा आहे? भिन्न राष्ट्राचे, भाषेचे आणि चालीरिती असणारे लोक कधी शांतीने एकत्र राहू शकतील का?
[७ पानांवरील चित्र]
काळे लोक मानवाच्या खालच्या योनीचे आहेत असे पुष्कळ गोरे लोक समजत होते
[चित्राचे श्रेय]
Reproduced from DESPOTISM—A Pictorial History of Tyranny
[८ पानांवरील चित्र]
नाझी हत्याकांडाच्या छावण्या जातीयवादाच्या कल्पनांचा विनाशकारी परिणाम ठरल्या
[चित्राचे श्रेय]
U.S. National Archives photo