तरुण लोक विचारतात
मित्राने मन दुखावलं तर?
तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?
नात्यांमध्ये समस्या येणारच. तुमचा मित्र, कदाचित जिवलग मित्र असं काहीतरी बोलेल किंवा करेल, ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. पण प्रत्येकाकडून चुका होतात; तुमच्याकडूनही झाल्या असतील. तुम्हीही कधीतरी कोणाचं मन दुखावलं असेल.—याकोब ३:२.
इंटरनेट कधीकधी आगीत तेल ओतण्याचं काम करतं. डेविड नावाचा तरुण म्हणतो, “तुमच्या मित्रांनी पार्टी केल्याचे फोटो तुम्ही इंटरनेटवर बघता आणि विचार करता, ‘मला का बरं नाही बोलवलं?’ असं घडतं तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं, एकटं पाडल्यासारखं वाटतं.”
तुम्ही समस्या सोडवायला शिकू शकता.
तुम्ही काय करू शकता?
स्वतःचं परीक्षण करा. बायबल म्हणतं: “लगेच रागावू नकोस, कारण राग मूर्खाचं लक्षण आहे.”—उपदेशक ७:९, तळटीप.
“तुम्हाला कधीकधी नंतर कळतं की ज्याचं तुम्हाला वाईट वाटलं होतं, ती खरंतर इतकी मोठी गोष्ट नव्हती.”—अलायसा.
विचार करा: दुसऱ्यांचं बोलणं तुम्ही लगेच मनाला लावून घेता का? दुसऱ्यांच्या लहान-सहान चुकांकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकू शकता का?—उपदेशक ७:२१, २२.
माफ केल्याने कोणते फायदे होतात त्याचा विचार करा. बायबल म्हणतं: “अपराधाकडे दुर्लक्ष केल्यामुळे . . . गौरव होईल.”—नीतिवचनं १९:११.
“जरी तुमच्याकडे तक्रार करण्याचा कारण असलं, तरी मोठ्या मनाने माफ करणं कधीही चांगलं. तसंच याचा असाही अर्थ होतो, की आपण समोरच्याला वारंवार त्याच्या चुकीची जाणीव करून देऊ नये आणि त्याला त्याबद्दल माफी मागायला लावू नये. एकदा माफ केलं, तर तो विषय तिथेच सोडून द्या.”—मॅलोरी.
विचार करा: समस्या खरंच खूप मोठी आहे का? शांती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही समोरच्याला माफ करू शकता का?—कलस्सैकर ३:१३.
मैत्रीत सतत एकमेकांच्या चुका काढणं हे नीटनेटक्या खोलीचं दार सारखंसारखं उघडून, जोराचा वारा आत येऊ देण्यासारखं आहे
समोरच्याचा विचार करा. बायबल म्हणतं: “फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.”—फिलिप्पैकर २:४.
“मैत्रीत प्रेम आणि आदर असतं, तेव्हा तुम्ही तुमच्यातले मतभेद लवकरात लवकर मिटवायचा प्रयत्न करता. हे मौल्यवान नातं तुम्हाला सहजासहजी तोडायचं नसतं, कारण त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली असते.” —निकोल.
विचार करा: समोरची व्यक्ती तुम्हाला असं का बोलली असेल? त्याच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करा.—फिलिप्पैकर २:३.
थोडक्यात: मन दुखावल्यावर ती परिस्थिती कशी हाताळायची हे माहीत असणं एक कौशल्य आहे. या कौशल्याचा तुम्हाला मोठेपणीही फायदा होईल. मग ते आताच शिकून घेणं फायद्याचं ठरणार नाही का?