लोक घरी भेटत नाहीत तेव्हा
१. घरोघरच्या सेवाकार्यात कोणत्या एका सर्वसामान्य आव्हानाला आपल्याला तोंड द्यावे लागू शकते?
१ बऱ्याच क्षेत्रांत लोकांची त्यांच्या घरी भेट घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. या ‘कठीण दिवसांत’ बऱ्याच जणांना उदरनिर्वाह चालवण्याकरता बरेच तास काम करणे भाग आहे. (२ तीम. ३:१) काहीजण कदाचित खरेदी करण्यासाठी किंवा मनोरंजनाकरता घराबाहेर असू शकतात. अशा लोकांपर्यंत आपल्याला सुवार्ता कशी पोचवता येईल?
२. घरी न भेटणाऱ्या लोकांनाही साहाय्य दिले जाईल याची आपण खात्री कशी करू शकतो?
२ त्यांच्याविषयी माहिती नोंदून ठेवा: सर्वात आधी, घरी न भेटणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवली पाहिजे. खासकरून जर तुम्ही एखाद्या क्षेत्रात वारंवार कार्य करत असाल तर असे करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही त्या रस्त्याचे नाव, क्षेत्राचा क्रमांक, तुमचे नाव व तारीख लिहून घेता का? फॉर्मवर तुम्ही काही जागा रिकामी ठेवू शकता जेणेकरून तुम्ही किंवा दुसरा एखादा प्रचारक जेव्हा या घरी नसलेल्या व्यक्तींना भेट देईल तेव्हा त्याला त्यांच्याविषयी अधिक माहिती नोंदता येईल. साक्षकार्य संपल्यावर, ज्याच्याकडे या क्षेत्राचे कार्ड आहे त्याला घरी नसलेल्या लोकांविषयी तुम्ही लिहून घेतलेली माहिती आठवणीने द्यावी. जर त्याने तुम्हालाच घरी नसलेल्या या व्यक्तींशी संपर्क साधण्यास सांगितले तर मग तुम्ही ती माहिती आपल्याजवळच ठेवू शकता.
३. घरी न भेटणाऱ्या लोकांशी संपर्क साधण्याचे कोणते काही मार्ग सुचवण्यात आले आहेत?
३ वेगळ्या वेळी जाऊन पाहा: जी व्यक्ती कामाच्या वेळात घरी भेटली नाही ती कदाचित संध्याकाळी किंवा शनिवारी-रविवारी घरी भेटू शकेल. तेव्हा अशा जास्त सोयीच्या वेळी जाऊन त्यांची भेट घेण्याकरता तुम्ही आपल्या वेळापत्रकात फेरबदल करू शकता का? (१ करिंथ. १०:२४) जर हे शक्य नसेल तर तुम्ही घरी न भेटलेल्या लोकांबद्दल नोंदून ठेवलेली माहिती एखाद्या अशा प्रचारकाला देऊ शकता की जो दुसऱ्या वेळी जाऊन त्या व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करेल. नाहीतर, तुम्ही त्या व्यक्तींशी पत्राद्वारे किंवा दूरध्वनीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकता. ज्या प्रचारकांना त्यांच्या प्रकृतीमुळे घरोघरच्या कार्यात सहभाग घेता येत नाही त्यांना याबाबतीत तुम्हाला मदत करण्यास आनंद वाटेल.
४. घरी न भेटणाऱ्या लोकांकडे पुन्हा जाणे किती महत्त्वाचे आहे हे कशावरून कळून येते?
४ एका उदाहरणावरून घरी न भेटणाऱ्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते. प्रचारकांना तीन वर्षांपर्यंत एका घरी वारंवार जाऊनही कोणी भेटले नाही. मग अचानक एके दिवशी त्यांना घराची मालकीण भेटली. तिला भेटल्यावर त्यांना समजले की ही स्त्री या क्षेत्रात राहायला येण्यापूर्वी बायबलचा अभ्यास करत होती आणि तो पुन्हा सुरू करता यावा म्हणून ती बऱ्याच काळापासून साक्षीदार आपल्या घरी येण्याची वाट पाहात होती.
५. एखादे क्षेत्र पूर्ण झाले आहे असे केव्हा म्हणता येते?
५ क्षेत्र पूर्ण करा: कोणतेही क्षेत्र पूर्ण झाले आहे असे केव्हा म्हणता येते? सहसा, जेव्हा प्रत्येक घरातील व्यक्तीशी संपर्क साधण्याकरता माफक प्रयत्न केल्यानंतर असे म्हणता येते. विशेषतः ज्या क्षेत्रांत वारंवार कार्य केले जात नाही अशा क्षेत्रांत, घरी न भेटणाऱ्या व्यक्तींच्या दारात एखादी हस्तपत्रिका किंवा एखादे जुने मासिक विचारपूर्वक ठेवणे उचित ठरेल. प्रत्येक क्षेत्र चार महिन्याच्या कालावधीत पूर्ण झाले पाहिजे. यानंतर ते क्षेत्र परत केले पाहिजे जेणेकरून क्षेत्राच्या विभागणीचे कार्य सांभाळणाऱ्या बांधवाला आपल्या अहवालांत याची नोंद ठेवता येईल.
६. आपल्या क्षेत्रातील प्रत्येकाला सुवार्ता सांगण्याचा आपण प्रयत्न का केला पाहिजे?
६ आपली इच्छा आहे की शक्य तितक्या लोकांना यहोवाच्या नावाचा धावा करून तारण मिळावे. (रोम. १०:१३, १४) यात अशाही लोकांचा समावेश आहे की जे आपण त्यांच्या घरी गेलो तेव्हा नव्हते. प्रेषित पौलाप्रमाणे आपलेही ध्येय हेच असावे की आपण ‘देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची सेवा शेवटास न्यावी.’—प्रे. कृत्ये २०:२४.