प्रश्न पेटी
◼ आपल्या बांधवांवर प्रत्यक्ष प्रभाव पाडणाऱ्या आपत्तीचा घाला पडतो तेव्हा काय केले जावे?
आपत्तीचा घाला तुमच्या क्षेत्रात पडल्यास: गोंधळून जाऊ नका. शांत मनस्थिती राखा आणि मालमत्तेचा नव्हे तर जे खरोखरच बहुमोल आहे—जीवन, त्याचा विचार करा. तुमच्या कुटुंबाच्या तातडीच्या भौतिक गरजांकडे लक्ष द्या. मग आपल्या परिस्थितींची व स्थानाची माहिती वडिलांना कळवा.
निवारण साह्य पुरवण्यात वडील आणि सेवा सेवक एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. मोठ्या वादळाची पूर्वसूचना दिली जाते तसे एखाद्या आपत्तीची पूर्वसूचना दिली गेली असल्यास सर्वजण सुरक्षित ठिकाणी आहेत याची खात्री या बांधवांनी करावी आणि वेळ असल्यास आवश्यक सामग्री प्राप्त करून तिचे वितरण करावे.
त्यानंतर पुस्तक अभ्यास संचालकांनी प्रत्येक कुटुंबाचा ठावठिकाणा लावून त्यांचे क्षेमकुशल विचारावे. अध्यक्षीय पर्यवेक्षकाला किंवा दुसऱ्या एखाद्या वडिलाला प्रत्येक कुटुंबाच्या स्थितीची माहिती कळवली जावी; सर्व काही अगदी व्यवस्थित असले तरीही. कुणाला दुखापत झाली असल्यास वैद्यकीय उपचाराची व्यवस्था वडील करतील. त्याचप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या भौतिक गोष्टी किंवा आवश्यक घरगुती वस्तू देखील ते पुरवतील. (योहा. १३:३५; गलती. ६:१०) स्थानिक वडील, मंडळीला आध्यात्मिक व भावनात्मक आधार देतील आणि शक्य तितक्या लवकर मंडळीच्या सभा सुरू करण्याची व्यवस्था करतील. पूर्णतः पाहणी केल्यानंतर एखाद्या वडिलाने वडीलवर्गाच्या वतीने विभागीय पर्यवेक्षकाशी संपर्क साधून, झालेल्या कोणत्याही दुखापतीविषयी, राज्य सभागृहाच्या किंवा बांधवांच्या घरांच्या नुकसानीविषयी तसेच दुसऱ्या कोणत्याही खास गरजांविषयी कळवावे. विभागीय पर्यवेक्षक मग शाखा दफ्तराला फोन करून सदर परिस्थितीचा अहवाल देतील. मग, आवश्यक असलेले कोणतेही मोठे निवारण पुरवण्यास शाखा दफ्तर सहकार्य करेल.
आपत्तीचा घाला इतरत्र पडला असल्यास: प्रार्थनेत आपल्या बंधूभगिनींची आठवण करा. (२ करिंथ. १:८-११) तुम्ही आर्थिक साह्य करू इच्छित असल्यास आपल्या देणग्या संस्थेला पाठवू शकता. संस्थेचा पत्ता आहे: Watch Tower Society, H-58 Old Khandala Road, Lonavla, MAH 410 401. (प्रे. कृत्ये २:४४, ४५; १ करिंथ. १६:१-३; २ करिंथ. ९:५-७; पाहा ऑगस्ट १, १९८६, टेहळणी बुरूज, पृष्ठे २७-९.) जबाबदार बांधवांनी विशेष मागणी केल्याशिवाय आपत्तीग्रस्त क्षेत्रात वस्तू किंवा सामग्री पाठवू नका. यामुळे सुव्यवस्थित निवारण प्रयास आणि सामग्रींचे यथायोग्य वितरण केले जाण्याची खात्री राहील. (१ करिंथ. १४:४०) कृपया संस्थेला अनावश्यक फोन करू नये कारण यामुळे फोन लाईन्स व्यस्त राहतील आणि आपत्तीग्रस्त क्षेत्रातून येणारे फोन कॉल्स प्रतिबंधित होतील.
योग्य पारख केल्यानंतर निवारण समिती निर्माण करण्याची गरज आहे की नाही हे संस्था ठरवेल. जबाबदार बांधवांना याची माहिती दिली जाईल. पुढाकार घेणाऱ्या वडिलांशी सर्वांनी सहकार्य करावे जेणेकरून सर्व बांधवांच्या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातील.—यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी), पृष्ठे ३१०-१५.