अन्याय अपरिहार्य आहे का?
“मला अद्यापही असं वाटतं, की लोकांचं मन मुळात चांगलं असतं. गोंधळ, विपत्ती आणि मृत्यू या गोष्टींनी तयार झालेल्या पायावर मी माझ्या आशा उभारू शकत नाही.”—ॲना फ्रॅन्क.
ॲना फ्रॅन्क, या १५ वर्षांच्या एका यहुदी मुलीने मरणाच्या काही काळाआधी स्वतःच्या डायरीत वरील वर्मी लागणारे शब्द लिहून ठेवले. तिचे कुटुंब दोन पेक्षा अधिक वर्षे ॲमस्टरडम शहरातील एका घराच्या पोटमाळ्यावर लपून बसले होते. परंतु एका खबऱ्याने त्यांच्या पत्त्याविषयी नात्सी लोकांना बातमी दिली तेव्हा चांगल्या जगाच्या तिच्या आशा धुळीस मिळाल्या. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे १९४५ मध्ये ॲनाला ज्वर चढला आणि बर्गेन-बेल्सन येथील छळछावणीत तिने दम तोडला. साठ लाख यहुदी लोकांची हीच गत झाली.
संपूर्ण जातीला नामशेष करण्याची हिटलरची पाशवी योजना जातीय अन्यायाबाबतीत आपल्या शतकातील सर्वात लज्जास्पद घटना असली, तरी इतरही अशा अनेक घटना आहेत. सन १९९४ मध्ये, र्वांडामध्ये पाच लाखांपेक्षा अधिक तुत्सी लोकांची कत्तल करण्यात आली केवळ या कारणामुळे की ते “वेगळ्या” जातीचे होते. पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये जातीय कारणामुळे सुमारे दहा लाख आरमेनियन लोकांना आपला जीव गमवावा लागला.
अन्यायाचे क्रूर चेहरे
जातीयसंहार ही अन्यायाच्या चेहऱ्याची केवळ एक बाजू आहे. सामाजिक अन्यायामुळे मानवजातीचा एक पंचमांश भाग त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबीत कंठतो. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे, मानवी हक्क गट आंतरराष्ट्रीय गुलामी विरोधी संस्थेच्या अहवालानुसार २०,००,००,००० लोक दास्यत्वात आहेत. संपूर्ण इतिहासात नसतील इतके गुलाम आज आहेत. त्यांचा जाहीर लिलाव केला जात नसला, तरी ते ज्या परिस्थितीत काम करतात ती परिस्थिती गतकाळातील गुलामांच्या परिस्थितीपेक्षा फारच वाईट आहे.
कायद्यामधील अन्याय लाखो लोकांचे मूलभूत हक्क हिरावून घेतो. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आपल्या १९९६ च्या अहवालात असे म्हणते, “मानवी हक्काची जवळजवळ दररोज कुठे ना कुठेतरी पायमल्ली होतच असते. गरीब आणि प्रतिकूल परिस्थितींमधील लोक विशेषतः स्त्रिया, वयस्कर लोक आणि शरणार्थी ह्यास बळी पडतात.” या अहवालाने निरीक्षण केले: “काही देशांतील राज्यव्यवस्था जवळजवळ कोसळली आहे कारण बळी तो कान पिळी या धोरणास अंकुश लावण्यासाठी कोणताही कायदेशीर अधिकार नाही.”
सन १९९६ या वर्षादरम्यान शंभरपेक्षा अधिक देशांत लाखो लोकांना कैदी बनविण्यात आले आणि त्यांचा छळ करण्यात आला. अलीकडील वर्षांमध्ये लाखो लोक अचानक गायब झाले आहेत. सुरक्षा दलांनी किंवा अतिरेकी संघटनांनी त्यांचे अपहरण केले हे उघड आहे. त्यांपैकी बहुतेक लोक मरण पावल्याची दाट शक्यता आहे.
युद्धात भयंकर अन्याय होतो, यात काही प्रश्न नाही; पण युद्धांतला हा अन्याय दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आधुनिक युद्धामध्ये सामान्य नागरिक बळी पडतात आणि या बळी पडलेल्यांमध्ये स्त्रिया व मुलेही असतात. शहरांवर बॉम्बवर्षा केल्यानेच असे होते असे नाही. लष्करी कारवायांच्या दरम्यान स्त्रियांवर आणि मुलींवर नेहमीच बलात्कार केला जातो. अनेक बंडखोर गट मुलांचे जबरदस्तीने अपहरण करून मारेकरी बनविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देतात. अशा प्रवृत्तीविषयी विवेचन मांडताना “मुलांवर सशस्त्र संघर्षाचा प्रभाव” हा संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल असे म्हणतो: “जगातील अधिकाधिक लोक हीन नैतिक दर्जे असलेल्या गोष्टींमध्ये गुंतले जात आहेत.”
यामध्ये कोणतीही शंका नाही, की नैतिक दर्जांच्या अभावामुळे जगात अन्याय—जातीय, सामाजिक, कायदेशीर आणि लष्करी अन्याय बोकाळला आहे. अर्थात, यात नवे असे काहीच नाही. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी एका हिब्रू संदेष्ट्याने खेदाने असे म्हटले: “कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही; दुष्ट धार्मिकास घेरून सोडितो म्हणून न्याय विपरीत होतो.” (हबक्कूक १:४) अन्याय हा प्रत्येक युगामध्ये होता, परंतु या २० व्या शतकाला अन्यायाचे युग म्हटले जाऊ शकते कारण या युगादरम्यान अन्यायाने त्याची परिसीमा केव्हाच ओलांडली आहे.
अन्यायाने खरंच काही फरक पडतो का?
अन्यायामुळे तुम्हाला स्वतःला त्रास होतो तेव्हा खरंच फरक पडतो. कारण यामुळे बहुतेक मानवजातीच्या आनंदाचा हक्क हिरावून घेतला जातो. अन्यायामुळे नक्कीच फरक पडतो कारण त्यामुळे बहुतेकदा रक्तरंजित संघर्ष होतात आणि परिणामी अन्यायाची आग नेहमी भडकत राहते.
न्याय असल्याशिवाय शांती आणि आनंद असूच शकत नाही, पण अन्यायामुळे आशावादाचा सत्यानाश होतो. खेदाची गोष्ट म्हणजे, ॲना फ्रॅन्क हिला तिच्या दुःखद अनुभवातून उमगले, की लोक गोंधळ, विपत्ती आणि मृत्यू या गोष्टींनी तयार झालेल्या पायावर त्यांच्या आशा उभारू शकत नाहीत. तिच्याप्रमाणे आपण सर्व काहीतरी चांगल्याची अपेक्षा करत असतो.
या इच्छेमुळे मानवी समाजामध्ये काही प्रमाणात न्याय आणण्याचा प्रयत्न करण्यास प्रामाणिक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. आणि म्हणूनच, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने १९४८ मध्ये जागतिक घोषणा या संमत केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे: “सर्व मानव जन्मतः स्वतंत्र असतात आणि त्यांची समान प्रतिष्ठा आणि समान हक्क असतात. त्या सर्वांकडे योग्यायोग्यतेची समज आणि विवेक आहे व त्यांनी एकमेकांशी बंधुभावाने वागावे.”
हे शब्द खरोखरच खूप उदात्त आहेत, पण मानवजात अद्यापही ते ध्येय गाठू शकलेली नाही—न्याय्य समाज जेथे सर्वांना समान हक्क मिळेल आणि प्रत्येक जण एकमेकांसोबत आपल्या बांधवाप्रमाणे वागेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जाहीरनाम्याच्या प्रस्तावनेत घोषित केल्यानुसार, हा उद्देश साध्य करता आल्यास “जगात स्वातंत्र्याचा, न्यायाचा आणि शांतीचा पाया” घातला जाईल.
मानवी समाजात अन्याय इतका मुळावला आहे का, की त्याचे कधीही उच्चाटन करता येणार नाही? किंवा स्वातंत्र्याचा, न्यायाचा आणि शांतीचा पाया घालण्याची काही शक्यता आहे का? असल्यास, हा पाया कोण घालू शकतो आणि सर्वांना याचा लाभ मिळेल याची खात्री कोण देऊ शकतो?
[Picture Credit Line on page 3]
UPI/Corbis-Bettmann