वेदांतीय पेच
“जीवाच्या अमरत्वाची कल्पना आणि मृतांच्या पुनरुत्थानाबद्दलचा विश्वास . . . हे भिन्न स्तरावरील दोन विचार आहेत, ज्यामधून निवड करण्यास हवी.” मृतांच्या परिस्थितीसंबंधाने प्रॉटेस्टंट तसेच कॅथलिक वेदांतवेत्त्यांमध्ये जो पेच निर्माण झाला आहे त्याचा सारांश फिलिप्प मनुचे वरील शब्द देतात. बायबल “शेवटल्या दिवशी” पुनरुत्थानाची आशा असल्याचे म्हणते. (योहान ६:३९, ४०, ४४, ५४) तथापि, पुष्कळ विश्वासधारकांना “जो जीव मरतेवेळी शरीरातून वेगळा होतो व देवाकडे जातो त्याच्या अमरत्वाबद्दल” आशा वाटते असे वेदांतवेत्ता क्रिस्बर्ट क्रेशॉग म्हणतात. ते पुढे सांगतात की, “हे पाहता, पुनरुत्थानाची आशा पूर्णतयः नसली तरीही बहुतांशी लोपली गेली आहे.”
असे आहे तर, गुंतागुंतीची समस्या पुढे येते, असे बर्नार सेबूए स्पष्ट करतात. ते विचारतात: “शारीरिक मरण ते शेवटले पुनरुत्थान यामधील ‘मध्यांतरात’ मृतांची स्थिती कशी असते?” हाच प्रश्न गेल्या काही वर्षात वेदांतीय वादाच्या केंद्रस्थानी होता असे दिसते. तो कशामुळे उद्भवला? आणि महत्त्वाचे म्हणजे, मृतांसाठी खरी आशा कोणती आहे?
पेचाचा मूळारंभ व वाढ
या विषयाबद्दल आरंभीच्या ख्रिस्ती जनांना स्पष्ट समज होती. शास्त्रवचनांमधून त्यांना कळाले होते की, मृतांना तर कसलीच जाणीव नसते, कारण इब्री शास्त्रवचने म्हणतात: “आपणांस मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; . . . ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस, तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, १०) त्या ख्रिश्चनांनी, पुनरुत्थान हे भावी काळात “प्रभूचे येणे” घडेल तेव्हा होणार अशी आशा धरली. (१ थेस्सलनीकाकर ४:१३-१७) या क्षणाची प्रतीक्षा करीत असता त्यांनी कोठेही जिवंत राहण्याची अपेक्षा धरली नव्हती. डॉक्ट्रीन ऑफ द फेथ याकरता व्हॅटिकन मंडळीचे सध्याचे अधिकारी योझफ रॉटसिंगर यांचे म्हणणे आहे: “जीवाच्या अमरत्वासंबंधी प्राचीन चर्चमध्ये कोणतीही तात्त्विक पुष्टी नव्हती.”
तथापि, नुवो डिझीयोनेरियो डी टेऑलॉझिआ स्पष्टता देते की, ऑगस्टीन किंवा ॲम्ब्रोस या चर्च फादर्सची लिखाणे वाचण्यात येतात तेव्हा “आपल्याला बायबलच्या सांप्रदायासंबंधाने काही तरी नव्या गोष्टींबद्दल माहिती मिळते—यहुदी-ख्रिस्ती तात्त्विकदृष्ट्या वेगळा असणारा ग्रीक वेदांत प्रणालीचा शिरकाव.” हे नवे शिक्षण “जीवाचे अमरत्व, वैयक्तिकाचा न्यायदंड होऊन त्याला मरणानंतर लगेच प्रतिफळ किंवा शिक्षा मिळणे,” यावर आधारलेले होते. यामुळे, “मध्यंतराच्या स्थितीबद्दल” प्रश्न सामोरा आला: शरीराच्या मरणानंतर जीव बचावून राहतो तर, “शेवटल्या दिवशी” पुनरुत्थानापर्यंत तो थांबून असता त्याचे काय होते? हा तो पेच आहे, जो मिटवण्यासाठी वेदांतवेत्त्यांचा लढा चालू आहे.
सा. यु. सहाव्या शतकात, पोप ग्रेगरी पहिले यांनी प्रतिपादन केले की, मृत्यू घडल्यावर जीव लगेच त्याच्या ठरलेल्या जागी जातो. १४ व्या शतकातील बाविसावे पोप जॉन यांची, मृतांना न्यायाच्या दिवशी त्यांचे अंतिम प्रतिफळ मिळेल ही खात्री झाली होती. तथापि, बारावे पोप बेनेडिक्ट यांनी त्यांच्या आधीच्या पोपचे खंडन केले. बेनेडिक्टस डिअस या पोपच्या हुकुमनाम्यात (सा. यु. १३३६) त्यांनी जाहीर केले की, “मृतांचे जीव मेल्यानंतर लगेच सुखलोक [स्वर्ग], शुद्धीकरण [परगेटरी], किंवा दंड [नरक] या स्थितीला जातात; जेव्हा जगाचा शेवट होईल तेव्हा ते त्यांच्या पुनरुत्थित शरीरांना जाऊन मिळतील.”
अशाप्रकारे वादविवाद व चर्चा होत असली आणि प्रॉटेस्टंट व इतर कर्मठ चर्चेस सर्वसाधारणपणे परगेटरीवर विश्वास ठेवत नसले तरी ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसनी कित्येक शतके वर नमूद केलेली मतप्रणाली स्वीकारली आहे. तथापि, गेल्या शतकाच्या समाप्तीपासून अधिकाधिक प्रामाण्य जीवाच्या अमरत्वाचे तत्त्व बायबलविरहीत असणाऱ्या उगमापासून आहे असे लोकांच्या लक्षात आणून देत आहेत. या कारणामुळे, “आधुनिक वेदांत मानवाला अशा एकत्रितपणात बघतो जो मृत्यूमध्ये कायमचा नष्ट होतो.” (द एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन) यामुळेच, बायबलवर विवेचन करणाऱ्यांना “मध्यंतराची स्थिती” अस्तित्वात असण्याबद्दल समर्थन करणे मोठे मुश्कीलीचे वाटते. मग, बायबल याबद्दल काही सांगते का, की ते वेगळीच आशा प्रस्तुत करते?
“मध्यंतराची स्थिती” यावर पौलाचा विश्वास होता का?
कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च म्हणते: “ख्रिस्तासोबत उठण्यासाठी आम्ही ख्रिस्तासोबत मेले पाहिजे: आम्ही ‘शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास केला पाहिजे.’ [२ करिंथकर ५:८] ते ‘दूर जाणे’ मृत्यूच्या वेळी घडते जे जीवाला शरीरापासून वेगळा करते. [फिलिप्पैकर १:२३] तो मृतांचे पुनरुत्थान होण्याच्या दिवशी परत शरीरासोबत एकत्र होईल.” तथापि, येथे उद्धृत करण्यात आलेल्या वचनांत प्रेषित पौल असे म्हणतो का की, जीव मृत्यूच्या वेळी शरीरास सोडतो आणि मग परत शरीरात एकत्र होण्यासाठी “शेवटला न्याय” होण्याची वाट बघत थांबून असतो?
करिंथकरास दुसरे पत्र ५:१ मध्ये पौल स्वतःच्या मृत्यूबद्दल आणि “मोडून टाकण्यात” येणार असे “पृथ्वीवरील . . . गृह” याबद्दल सांगत होता. तर मग, तेव्हा त्याचा विचार अमर जीव शरीराला सोडून जातो असा होता का? नाही. मनुष्य हा स्वत:च जीव आहे, असा पौलाचा विश्वास होता, मनुष्याला जीव आहे असा त्याचा विश्वास नव्हता. (उत्पत्ती २:७; १ करिंथकर १५:४५) पौल आत्म्याने अभिषिक्त असणारा ख्रिस्ती असल्यामुळे त्याची आशा त्याच्या पहिल्या शतकातील बांधवांसारखीच ‘स्वर्गात राखून ठेवलेली’ होती. (कलस्सैकर १:४; रोमकर ८:१४-१८) या कारणास्तव, देवाच्या नियुक्त वेळी त्याचे स्वर्गाकरता अमर आत्मिक प्राणी म्हणून पुनरुत्थान घडावे अशी त्याची ‘उत्कंठा’ होती. (२ करिंथकर ५:२-४) या आशेबद्दल बोलताना त्याने लिहिले: “आपण सर्व जण बदलून जाऊ. . . . शेवटला कर्णा वाजेल तेव्हा; कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ.”—१ करिंथकर १५:५१, ५२.
करिंथकरास दुसरे पत्र ५:८ मध्ये पौल म्हणतो: “आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते.” हे शब्द मध्यंतराच्या थांबून राहण्याच्या स्थितीला अनुलक्षून आहेत असे काहींना वाटते. असे लोक, येशूने आपल्या विश्वासू अनुयायांना जे वचन दिले की, तो त्यांच्यासाठी जागा तयार करावयाला जात होता आणि मग तो ‘त्यांना आपल्याजवळ घेणार होता,’ त्याचा संदर्भ देतात. पण ही आशा केव्हा साकार होणार होती? ख्रिस्ताने म्हटले की, तो त्याच्या भावी आगमनाच्या वेळी ‘पुन्हा येणार’ तेव्हा हे घडणार होते. (योहान १४:१-३) याचप्रमाणे, २ करिंथकर ५:१-१० मध्ये पौलाने म्हटले की, अभिषिक्त ख्रिश्चनांना सर्वसाधारण असणारी आशा स्वर्गीय निवासस्थानी वतन मिळवणे ही होती. ती, कोणा गृहीत धरलेल्या जीवाच्या अमरत्वामुळे नव्हे तर ख्रिस्ताच्या उपस्थिती दरम्यान होणाऱ्या पुनरुत्थानाद्वारे पूर्ण होणार आहे. (१ करिंथकर १५:२३, ४२-४४) शास्त्रवचनांवर प्रतिपादन करणारे शार्ल मासॉन म्हणतात की, २ करिंथकर ५:१-१० “‘मध्यंतराची स्थिती’ गृहीत धरण्याचा प्रयत्न करण्याशिवाय अधिक चांगलेपणाने समजून घेता येऊ शकते.”
फिलिप्पैकर १:२१, २३ मध्ये पौल म्हणतो: “मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. मी ह्या दोहोंसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.” पौल येथे ‘मध्यांतराच्या स्थितीबद्दल’ बोलत होता का? काहींना तसेच वाटते. तथापि, पौल म्हणतो की, तो दोन गोष्टींसंबंधाने—जीवन किंवा मरण—पेचात पडला होता. परंतु तो तिसऱ्या शक्यतेचा उल्लेख करीत म्हणतो की, “येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे.” ही ‘सुटका’ म्हणजे मरणानंतर लगेच ख्रिस्ताला जाऊन मिळणे आहे की काय? आपण आधी पाहिले तसे पौलाचा हा विश्वास होता की, विश्वासू ख्रिश्चनांना ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये पुनरुत्थान मिळणार होते. या कारणामुळेच, त्याच्या मनात त्या काळाबद्दलची घटना राहिली असावी.
हीच गोष्ट, त्याने फिलिप्पैकर ३:२०, २१ व १ थेस्सलनीकाकर ४:१६ मध्ये लिहिलेल्या शब्दांवरुन दिसते. ख्रिस्त येशूच्या उपस्थितीसमयी ती “सुटका” पौलाला, देवाने त्याच्यासाठी जे बक्षीस राखून ठेवलेले होते ते मिळवण्यास समर्थ करणार होती. हीच त्याची आशा होती हे त्याने तरुण तीमथ्याला लिहिलेल्या त्याच्या शब्दांवरून कळते: “आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेविला आहे; प्रभु जो नीतिमान् न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाहि देईल.”—२ तीमथ्य ४:८.
पुनरुत्थान—बायबलचे भव्य सत्य
पुनरुत्थानाची घटना ही ख्रिस्ताच्या उपस्थितीकाळात सुरु होईल असा आरंभीच्या ख्रिश्चनांचा विचार होता आणि बायबलच्या या भव्य सत्यामुळे त्यांना मोठे बळ व समाधान मिळाले. (मत्तय २४:३; योहान ५:२८, २९; ११:२४, २५; १ करिंथकर १५:१९, २०; १ थेस्सलनीकाकर ४:१३) त्या भावी आनंदाची ते विश्वासूपणे वाट बघत राहिले; त्यांनी अमर जीव या धर्मत्यागी शिक्षणाचा नकार केला.—प्रेषितांची कृत्ये २०:२८-३०; २ तीमथ्य ४:३, ४; २ पेत्र २:१-३.
अर्थात, पुनरुत्थान हे केवळ स्वर्गीय आशा असणाऱ्या ख्रिश्चनांपुरतेच मर्यादित नाही. (१ पेत्र १:३-५) कुलपिते आणि देवाचे प्राचीन काळचे सेवक यांनी यहोवा मृतांना पृथ्वीवर परत जीवन देऊ शकतो यावर आपला विश्वास प्रकट केला. (ईयोब १४:१४, १५; दानीएल १२:२; लूक २०:३७, ३८; इब्रीयांस ११:१९, ३५) गेल्या कित्येक शतकात ज्या करोडो लोकांना देवाबद्दलची माहिती नव्हती अशांना देखील पृथ्वीवरील नंदनवनमय वातावरणात पुन्हा जीवनप्राप्ती मिळण्याची सुसंधी आहे, कारण “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५; लूक २३:४२, ४३) हे खरोखरच रोमांचकारी भवितव्य नव्हे का?
त्रास व मृत्यू नेहमीच असतील असा आम्ही विश्वास ठेवावा यापेक्षा यहोवा अशा काळाकडे आमचे लक्ष केंद्रित करतो, जेथे ‘शेवटला शत्रू जो मृत्यू’ तो सर्वकाळाकरता काढून टाकण्यात येईल आणि विश्वासू मानवजात पृथ्वीवर पुनर्स्थापित झालेल्या नंदनवनमय बागेत चिरकालिकपणे जगेल. (१ करिंथकर १५:२६; योहान ३:१६; २ पेत्र ३:१३) आमचे प्रियजन पुन्हा जिवंत झाल्याचे पाहणे किती मनोरम असेल! देवाच्या वचनावर नव्हे तर, ग्रीक तत्त्वज्ञानावर आधारित असणाऱ्या व तात्पुरत्या गृहीत धरलेल्या मानवी जीवाच्या अमरत्वाच्या तत्त्वापेक्षा ही खात्रीची आशा केवढी चांगली आहे! तुम्ही आपली आशा देवाच्या खात्रीदायक अभिवचनांवर ठेवल्यास तुम्हाला देखील “ह्यापुढे मरण नाही” याबद्दलची हमी राहील!—प्रकटीकरण २१:३-५.
[३१ पानांवरील चित्रं]
पुनरुत्थान हे बायबलचे भव्य सत्य आहे