मृतांचे भय सर्वत्र आहे
सूर्य मावळून बराच उशीर झाला होता. तुम्हाला घरी लवकर जाण्याची इच्छा होती; परंतु जरा उशिरा जात आहात. जवळच्या स्मशानभूमीतून पार होत असताना तुमच्या छातीत धडधडायला लागते. रात्रीच्या शांततेत थोडा जरी आवाज झाला तर तुम्ही बेचैन होता. अचानक तुम्हाला थोड्याच अंतरावरून कर्कश, भयानक आवाज ऐकू येतो. लवकरात लवकर घराचा आश्रय घेण्यासाठी तुम्ही पावलांचा वेग वाढवता आणि तुमच्या नाडीचे ठोके देखील जोराने पडू लागतात.
स्मशानभूमीत किंवा जवळपास असताना तुम्हाला कधी धाकधूक वाटली आहे का? जर होय तर, तुमच्यावर देखील संपूर्ण जगभरात सर्वसामान्य असलेल्या धार्मिक कल्पनेचा प्रभाव पडला असेल. ती म्हणजे, मृतांचे आत्मे जीवितांना मदत किंवा इजा करतात.
मृतांना जीवितांची मदत लागते किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत तर ते जीवितांना इजा करतात अशाप्रकारच्या विश्वासांमुळे अनेक अंधश्रद्धा उद्भवलेल्या आहेत. उदाहरणार्थ, काही लॅटिन-अमेरिकन राष्ट्रांमध्ये, अनेक लोकांची अशी प्रथा आहे की, ते एखादी व्यक्ती अपघातामुळे जेथे मरण पावली त्या ठिकाणी, एक छोटेसे घर बांधून त्यावर क्रूस लावतात. मृताच्या जीवाला किंवा आत्म्याला मदत करण्यासाठी वा त्यांना त्याच्याबद्दलची आपुलकी असल्याचे दाखवण्यासाठी लोक तेथे मेणबत्त्या लावतात किंवा फुले वाहतात. काही बाबतीत, “चमत्कारिकरीत्या” प्रार्थनेला उत्तरे मिळाल्याच्या बातम्या पसरविल्या जातात जेणेकरून लोक, मृताचा जीव किंवा आत्मा याच्या राहण्याच्या त्या लहानशा ठिकाणाला ज्याला ॲनिमिटा असे म्हटले जाते तेथे वारंवार जाऊ लागतात. तेथे जाऊन हे लोक मॉन्डॉज् किंवा शपथा घेतात की, जर मृत व्यक्तीने त्यांना काही साध्य करण्यास किंवा प्राप्त करण्यास मदत केली—कदाचित चमत्कारिकरीत्या बरे करणे—तर ते त्यांची कृतज्ञता एका खास पद्धतीने दाखवतील. दुसऱ्या बाजूला पाहता, असेही सांगितले जाऊ शकते की, एखाद्या व्यक्तीचा जीव रात्रीच्या अंधारात प्रकट होऊन, तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना घाबरवतो. ते आत्मे पेनॉनडो आहेत व गत घटनांसाठी जीवितांना त्रास देतात असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते.
मृतांच्या “आत्म्याला” तृप्त करण्यासाठी अनेक राष्ट्रांतील लोक पुष्कळ प्रयत्न करतात. मोठमोठे भोजन समारंभ आयोजितात, बली देतात, सांत्वनदायक बोल बोलले जातात—ह्या सर्व गोष्टी मृत व्यक्तीच्या आत्म्यापासून होणाऱ्या शिक्षा टाळण्याच्या उद्देशाने केल्या जातात. असे समजले जाते की, आत्म्याला शांत केल्यामुळे, मागे जिवंत राहिलेल्यांना आशीर्वाद आणि प्रतिफळ मिळतील.
ॲफ्रिकेतील एक अहवाल म्हणतो: “अनेकांचा असा विश्वास आहे की, कोणतीही घटना ‘स्वाभाविकपणे किंवा नैसर्गिकरीत्या’ होत नसते. आजारपण, संकट, अफलत्व, आर्थिक संकट, प्रमाणापेक्षा अधिक वर्षाव किंवा प्रखर उष्णता, अपघात, कौटुंबिक फुटी, मृत्यू—यासारख्या कोणत्याही घटनांसाठी मनुष्यापेक्षा अधिक शक्ती असलेले अदृश्य आत्मे कारणीभूत आहेत असा विश्वास केला जातो.” आणखी एक अहवाल म्हणतो: “लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांनी स्वर्गातील जागा व्यापली आहे व पृथ्वीवर त्यांचे जे नातेवाईक जिवंत आहेत त्यांच्यावर ते सतत लक्ष ठेवतात. या पूर्वजांकडे मानवांपेक्षा अधिक सामर्थ्य असते, व पृथ्वीवरील त्यांचे नातेवाईक मृतांना कशाप्रकारे आदर देतात किंवा दुर्लक्ष करतात यावर अवलंबून आशीर्वाद व संरक्षण देण्यास किंवा त्यांना शिक्षाही देण्यास त्याचा उपयोग करतात असे समजले जाते.”
परंतु या गोष्टी देवाच्या वचनाच्या एकवाक्यतेत आहेत का? तुमचे काय मत आहे?
[[३ पानांवरील चित्र]
चिलीतील एक “ॲनिमिटा”