आम्ही त्यांना पुन्हा पाहू शकू का?
“तुम्ही आम्हाला कायमचं सोडून गेलात. हे किती अचानक घडलं. तुमच्या मृत्युमुळं आम्हाला दुःखद घाव मिळाले असले तरी तुम्ही सदैव आमच्या स्मरणात रहाल. आम्ही तुम्हासोबत आनंदात घालविलेली ती विस्मयकारक वर्षे कधीच विसरणार नाही. तसेच तुम्हाला एके दिवशी पुन्हा भेटण्याची आशा केव्हाही सोडणार नाही.”
लक्सेमबर्गच्या ग्रँड ड्युकी येथे वर्तमानपत्रात, आपल्या प्रियजनांच्या मृत्युनंतर मृताचे आप्त व मित्र वर नमूद असलेले भावनोग्दार प्रसिद्ध करतात. गोड आठवणी व मृत्युमुळे ओढवलेले नुकसान याविषयीची उदासीनता असे आशा व चिंतेने संमिश्र असणारे विचार जगात इतरत्र लोकांच्या मनात असतात. कदाचित तुम्हीही असा प्रतिसाद दाखविला असेल किंवा तो आपल्या कोणा मित्राकडून त्याचे कोणी प्रियजन वारल्यानंतर ऐकला असेल.
बहुतेक लोकांना, त्यांच्या प्रियजनांना पुन्हा एकदा पाहण्याची आशा अस्पष्ट व गोंधळात टाकणारी भासते. याची कारणे सरळ आहेत. खरे म्हणजे, प्रथमतः आजच्या काळात याविषयी काही जाणून घेण्यास कोणी वेळ देतच नाही. जेव्हा कोणी तसा प्रयत्न करतोच तेव्हा या प्रश्नाविषयी बहुतेक धर्मांकरवी जी माहिती सादर करण्यात येते ती अगदीच अस्पष्ट किंवा खात्री पटविण्यास विक्षिप्त अशी असते.
कदाचित तुम्हाला माहीत असेल की, मृत आपल्या वंशावळीकरवी आपले “भावी जीवन” चालू ठेवतात अशी पुष्कळ लोकांची कल्पना झालेली आहे. लोक ‘आपल्या मुलांच्या रुपाने जगत आहेत’ असा विचार कधी तुम्ही ऐकलाही असेल. पण असे हे “जीवन” त्या मृतासाठी काही सचेतनात्मक लाभ देते का आणि त्यांच्या जिवंत असलेल्या आप्तांसाठी पुनर्मिलनाची काही आशा प्रस्तुत करते का? कदापि नाही. या कारणास्तव अशा विचारात सांत्वन हे नसतेच.
आमचे मृत झालेले तसेच जिवंत असणारे प्रियजन यांच्यावरील आस्थेमुळेच आम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास हवीतः आम्हास प्रिय वाटणारी व्यक्ती वारते तेव्हा आम्ही तिला पुन्हा पाहू शकू का? याचे उत्तर होय आहे तर ते केव्हा व कोठे? स्वर्गात? किंवा याच पृथ्वीवर? खरेच, मृत प्रियजनांसाठी तसेच आम्हासाठीही भविष्यात कोणती आशा आहे?
स्पष्ट सांगायचे तर या सर्व प्रश्नांच्या बाबतीत चांगली बातमी आहे. चांगली ती या अर्थी की, ती खात्रीदायक व उल्लासित करणारी आशा आहे. ती बातमीही आहे कारण ती, बहुतेक लोकांनी आपल्या धार्मिक उगमाकडून जे काही ऐकले आहे त्यापेक्षा वेगळाच संदेश प्रदान करते.
आमच्या समान शकाच्या पहिल्या शतकात ख्रिस्ती सुवार्तिक पौल ग्रीसच्या अथेन्समध्ये होता तेव्हा त्याने मृतांसाठी असलेल्या शास्त्रवचनीय आशेविषयी बोलणी केली. ऐकणाऱ्यांपैकी काहींनी याविषयी चौकशी केली; पण बाकीच्यांना ती वायफळ गोष्ट वाटली. काही तत्त्वज्ञान्यांनी त्याच्याशी वाद घातला; ते त्याला म्हणालेः “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” दुसरे काही म्हणालेः “‘हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो.’ कारण येशू व पुनरुत्थान याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.” (प्रे. कृत्ये १७:१८) होय, पौलाला जी सुवार्ता सांगायची होती त्यामध्ये पुनरुत्थानाचा समावेश होता!
मृतांना पुन्हा पाहण्याविषयी, भावी पुनरुत्थानाविषयी कोणी देत असलेल्या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला ती व्यर्थ बडबड वाटेल का? किंवा तुमच्या धार्मिक शिक्षणामुळे तसेच तुमच्या व्यक्तीगत दृष्टीने पवित्र शास्त्रातील मृतांकरिता आशा दाखविणारा हा संदेश तुम्हाला जणू ‘परक्या दैवतांकडून’ आलेला असा चमत्कारिक व नवा वाटतो का?
पौलाला अथेनैकरांनी म्हटलेः “तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवीत आहात; याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.” (प्रे. कृत्ये १७:२०) आपल्या मृत प्रियजनांसाठी तसेच आज जे आम्ही जिवंत आहोत त्या आमच्यासाठीही पवित्र शास्त्रीय आशा काय आहे त्याविषयी अधिक शिकण्याची तुमची इच्छा आहे का? जर होय, तर पुढील लेख तुम्हाला मोठ्या आस्थेचा वाटेल.