येशूचे जीवन व उपाध्यपण
गालीलातील आणखी एक प्रचार यात्रा
साधारणपणे दोन वर्षे प्रचाराचे जोरदार कार्य केल्यावर आता येशू ते थांबविणार का किंवा त्यात थोडा विश्राम घेणार का? नाही. याऐवजी तो गालीलमध्ये आणखी एक प्रचार यात्रा, तिसरी यात्रा काढून आपल्या कार्याला विस्तृत करतो. तो सर्व शहरांना तसेच खेड्यांना भेटी देतो, तेथील सभास्थानांमध्ये शिकवण देतो व राज्याची सुवार्ता घोषित करतो. या खेपेला त्याला जे दिसते त्याकरवी आपले हे प्रचार कार्य पूर्वीपेक्षा अधिक जोरदार करण्याची किती निकड आहे याची त्याला खात्री होते.
येशू जेथे कोठे जातो तेथे जमावाला आध्यात्मिक इलाज व सांत्वनाची केवढी गरज आहे ते बघतो. ते, मेंढपाळ नसल्यावर दुर्बळ होणाऱ्या व इतस्ततः भटकणाऱ्या मेंढरांप्रमाणे झाले आहेत हे पाहतो, त्यामुळे त्याला लोकांचा कळवळा वाटतो. तो आपल्या शिष्यांना म्हणतोः “पीक फार आहे खरे; पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव, पिकाच्या धन्याने कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”
येशूकडे आता एक योजना आहे. साधारणपणे एक वर्षाआधी निवडलेल्या आपल्या १२ प्रेषितांना तो आज्ञा देतो. तो त्यांच्या जोड्या करून सुवार्तिकांचे सहा गट बनवतो आणि त्यांना सूचना देतो. तो म्हणतोः “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’”
ज्या राज्याची सुवार्ता त्यांनी सांगायची आहे ते राज्य येशूने त्यांना शिकवलेल्या नमुनेदार प्रार्थनेतील राज्य आहे. देवाचे राज्य जवळ आले याचा अर्थ देवाकडून नियोजित केलेला राजा येशू ख्रिस्त तेथे उपस्थित होता. त्या अतिमानवी सरकारचे प्रतिनिधी आहोत अशी आपल्या शिष्यांची लोकांना ओळख पटावी यासाठी येशू त्यांना आजाऱ्यांना बरे करण्याचे एवढेच काय पण मृतांनाही उठविण्याचे सामर्थ्य देतो. ही सेवा त्यांनी विनामूल्य करावी अशी तो शिष्यांना सूचना करतो.
आपल्या प्रचार यात्रेत शिष्यांनी कसलीही भौतिक तयारी करू नये असे तो म्हणतो. “सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका. वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका; कारण कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे.” जे या संदेशाबद्दल गुणग्राहकता बाळगतात तेच लोक रसिकता दाखवून शिष्यांना अन्न तसेच राहण्याची सोय करण्यात पुढे येतील. येशूने तेच म्हटले की, “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा; आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्यांच्याकडेच राहा.”
यानंतर येशू घरमालकाला राज्याचा संदेश कशा पद्धतीने सांगावा त्याविषयी सूचना देतो. तो म्हणतोः “घरात जाताना ‘तुम्हाला शांती असो,’ असे म्हणा; ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो व ते योग्य नसेल तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.”
जे शहर या संदेशाला धिक्कारेल त्याबद्दल येशू म्हणतोः “न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल.” याचा अर्थ त्या सदोम्यांचे पुनरुत्थान होईल असा नाही. उलटपक्षी, येथे येशू अशा शहरातील लोकांचा दोष किती मोठा आहे ते जोर देऊन सांगता असता म्हणाला की, न्यायाच्या दिवशी पुनरुत्थान होण्यास सर्वथा अपात्र आहेत असा इस्राएलांनी ज्यांच्याविषयी आपल्या मनात विचार राखला होता त्या प्राचीन सदोमाला अधिक सोपे जाणार होते. मत्तय ९:३५–१०:१५; मार्क ६:६-१२; लूक ९:१-५.
◆ येशू त्याच्या गालीलकडील तिसऱ्या प्रचारयात्रेची सुरवात केव्हा करतो व त्याला कोणत्या गोष्टीची खात्री पटते?
◆ तो आपल्या १२ प्रेषितांना प्रचार कार्यासाठी बाहेर पाठवताना कोणत्या सूचना देतो?
◆ देवाचे राज्य जवळ आले आहे अशी शिकवण शिष्यांनी देणे का योग्य होते?
◆ आपल्या शिष्यांनी दिलेल्या संदेशाचा धिक्कार करणे केवढे गंभीर आहे हे येशू कसे जोर देऊन सांगतो?