भेदभावावर कायमचा उपाय
आधीच्या लेखांमध्ये सुचवलेल्या गोष्टींचं पालन केल्यामुळे लाखो लोकांना भेदभावाची भावना कमी करायला बरीच मदत झाली आहे. पण खरी गोष्ट ही आहे, की आपण स्वतःहून कधीच ही भावना पूर्णपणे मनातून काढू शकत नाही. मग याचा अर्थ असा होतो का, की भेदभाव कधीच नाहीसा होणार नाही?
एक चांगलं सरकार
समाजातून भेदभावाची भावना पूर्णपणे काढून टाकण्यात मानवी सरकारं कमी पडली आहेत. मग भेदभावाच्या आजारावर कोणताच उपाय नाही का?
भेदभाव कायमचा काढून टाकण्यासाठी कोणत्याही सरकाराला पुढे सांगितलेल्या गोष्टी कराव्या लागतील:
१. लोकांना आपले विचार आणि आपल्या भावना बदलायला प्रोत्साहन द्यावं लागेल.
२. लोकांच्या मनातून भेदभावाच्या वाईट आठवणी काढून टाकाव्या लागतील.
३. असे नेते निवडावे लागतील जे कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान लेखतील.
४. सर्व राष्ट्रांच्या लोकांमध्ये एकी निर्माण करावी लागेल.
पवित्र शास्त्रात अशाच एका सरकाराबद्दल सांगितलं आहे. त्याला ‘देवाचं राज्य’ असं म्हटलं आहे.—लूक ४:४३.
ते सरकार कायकाय करेल हे जाणून घ्या.
१. चांगलं शिक्षण देईल
“जगात राहणारे नीतिमत्ता” शिकतील.—यशया २६:९.
“नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वासथ्य व निर्भयता होईल.”—यशया ३२:१७.
याचा काय अर्थ होतो? देवाचं राज्य लोकांना नीतीच्या गोष्टी शिकवेल. जेव्हा लोकांना योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय यातला फरक समजेल, तेव्हा इतरांबद्दलचे त्यांचे विचार बदलतील. आणि त्यांना याची जाणीव होईल, की आपण सर्व प्रकारच्या लोकांवर प्रेम केलं पाहिजे.
२. भावनिक जखमा भरून काढेल
देव “त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”—प्रकटीकरण २१:४.
याचा काय अर्थ होतो? देवाचं राज्य, अन्यायामुळे झालेलं सर्व दुःख काढून टाकेल. मग, ज्यांच्यावर पूर्वी अन्याय झाला होता त्यांच्या मनात द्वेषाची भावना उरणार नाही.
३. चांगलं नेतृत्व करणारा निवडेल
“तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करेल, पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करेल.”—यशया ११:३, ४.
याचा काय अर्थ होतो? देवाच्या राज्याचा राजा, येशू ख्रिस्त, कोणताही भेदभाव न करता न्यायाने राज्य करेल. तो कोणत्याही एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ समजणार नाही. आणि पृथ्वीवरचे सगळे लोक त्याचे नीतीनियम पाळतील याची तो खातरी करेल.
४. एकी निर्माण करेल
देवाचं राज्य सर्व लोकांना “एक मनाचे होऊन व एकमेकांवर सारखेच प्रेम [करायला], पूर्ण एकतेत राहून व एकच ध्येय मनात ठेवून” चालायला शिकवेल.—फिलिप्पैकर २:२.
याचा काय अर्थ होतो? देवाच्या राज्याच्या नागरिकांमध्ये फक्त वरवर दिसणारी एकता नसेल, तर त्यांच्यात खरं प्रेम असल्यामुळे ते “पूर्ण एकतेत” राहतील.