सहावी गोष्ट
नैतिक मूल्यांची गरज
नैतिक मूल्य म्हणजे काय?
नैतिक मूल्य असलेल्या लोकांना चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक स्पष्टपणे कळतो. एका विशिष्ट क्षणी किंवा परिस्थितींत चांगलं काय व वाईट काय हे ते आपल्या भावनांच्या आधारावर ठरवत नाहीत. तर ते मार्गदर्शनासाठी तत्त्वांवर अवलंबून राहून त्यांनुसार जीवनात निर्णय घेतात; मग त्यांना त्या वेळी कोणी पाहत नसलं तरीही.
नैतिक मूल्यं महत्त्वाचे का आहेत?
मुलांच्या मनावर नैतिकतेच्या बाबतीत सतत चुकीच्या विचारांचा भडिमार होत असतो. शाळेतल्या मित्रांकडून किंवा ते ज्या प्रकारची गाणी, चित्रपट, टिव्हीवरचे कार्यक्रम पाहतात त्यांतून त्यांना सतत चुकीचं मार्गदर्शन मिळत असतं. या गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव होत असल्यामुळे चांगल्या-वाइटाच्या स्तरांबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण होऊ शकते.
ही समस्या खासकरून किशोरवयात असताना उद्भवू शकते. बियॉन्ड द बिग टॉक या पुस्तकात म्हटलं आहे, “सोबत्यांकडून आणि मिडियाकडून असा दबाव टाकला जातो की इतरांनी आपल्याला पसंत करावं म्हणून आपण विशिष्ट प्रकारे वागलं पाहिजे. हा धोका मुलांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. तसंच, काय योग्य आहे हेदेखील त्यांनी शिकणं गरजेचं आहे, मग त्या गोष्टी त्यांच्या मित्रांना आवडत नसल्या तरीही.” यावरून स्पष्टच आहे की मुलं किशोरवयात येण्याआधीच त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे.
मुलांना नैतिक मूल्यांबद्दल कसं शिकवावं?
चांगलं काय आणि वाईट काय हे शिकवा.
बायबल तत्त्व: “[प्रौढ लोकांनी] आपल्या समजशक्तीचा उपयोग करण्याद्वारे तिला चांगले व वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.”—इब्री लोकांना ५:१४.
चांगलं आणि वाईट काय हे स्पष्ट शब्दांत सांगा. दररोजच्या व्यवहारात जा गोष्टी घडतात त्यांचं उदाहरण देऊन चांगल्या व वाईट गोष्टींतला फरक दाखवा. उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलाशी कोणी खोटं बोललं तर तुम्ही त्याला सांगू शकता, “त्यांचं वागणं चुकीचं आहे कारण ते प्रामाणिक नाहीत.” पण तुमचा मुलगा खरं बोलला तर तुम्ही म्हणू शकता, “तू बरोबर केलंस कारण तू प्रामाणिकपणे वागलास.” जर एखादी व्यक्ती मोठ्यांना मदत करत नसेल तर तुम्ही मुलाला सांगू शकता, “असं वागणं चुकीचं आहे कारण ती व्यक्ती दया दाखवत नाहीये.” पण जर तुमच्या मुलाने मोठ्यांना मदत केली तर तुम्ही म्हणू शकता, “तू खूप चांगलं काम केलंस कारण तू दया दाखवलीस.” असं केल्यामुळे तुमच्या मुलांना हळूहळू समजायला मदत होईल की नैतिक मूल्यांचा आपल्या कार्यांशी कसा संबंध असतो.
एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट का असते हे मुलांना समजवून सांगा. उदाहरणार्थ, तुम्ही काही प्रश्न विचारू शकता जसं की, ‘प्रामाणिक असणं नेहमी चांगलं का असतं? खोटं बोलल्याने मैत्रीला कसा तडा जाऊ शकतो? चोरी करणं चुकीचं का आहे?’ चांगलं आणि वाईट काय यांमधला फरक समजण्यासाठी तुमच्या मुलांसोबत तर्क करा.
नैतिक मूल्यं असणं का फायद्याचं असतं यावर जोर द्या. तुम्ही म्हणू शकता, “जर तू प्रामाणिकपणे वागलास तर लोक तुझ्यावर भरवसा ठेवतील” किंवा, “दयाळूपणे वागल्याने लोकांना तुझ्यासोबत राहायला आवडेल.”
कुटुंब नैतिक तत्त्वांचं पालन करतं याची खातरी करा.
बायबल तत्त्व: “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात हे सतत तपासून पाहा.”—२ करिंथकर १३:५.
तुमच्या कुटुंबाने नैतिक मूल्यांचं पालन केलं तर तुम्ही मनापासून म्हणू शकाल:
“आम्ही खोटं बोलत नाही.”
“आम्ही दुसऱ्यांवर हात उचलत नाही किंवा त्यांच्यावर आरडाओरडा करत नाही.”
“आम्ही रागावून किंवा घालूनपाडून बोलत नाही.”
तुमच्या मुलांना स्पष्टपणे दिसून येईल की नैतिक मूल्यं हे फक्त नियम नाहीत तर ते तुमच्या कुटुंबाची ओळख आहे.
तुम्ही मुलांसोबत तुमच्या कुटुंबासाठी ठरवलेल्या मूल्यांबद्दल वेळोवेळी चर्चा करा. रोज ज्या गोष्टी घडतात त्यातून मुलांना शिकवा. टिव्हीवर किंवा शाळेत शिकवल्या जाणाऱ्या मूल्यांची तुलना तुम्ही ठरवलेल्या मूल्यांशी करा. तुमच्या मुलाला विचारा, “अशा परिस्थितीत तू काय केलं असतंस?, आपल्या कुटुंबाने ही परिस्थिती कशी हाताळली असती?”
चांगलं काय ते करण्याचा मुलांचा निर्धार पक्का करा.
बायबल तत्त्व: “चांगला विवेक टिकवून ठेवा.”—१ पेत्र ३:१६.
चांगल्या वागणुकीची प्रशंसा करा. तुमची मुलं नैतिक तत्त्वांनुसार कार्य करत असतील तर त्यांची प्रशंसा करा आणि त्यांची वागणूक चांगली का होती हेही त्यांना समजवा. जसं की तुम्ही म्हणू शकता, “तू प्रामाणिकपणे वागलास, मला खरंच तुझा अभिमान वाटतो!” तुमच्या मुलाने त्याची चूक स्वतःहून कबूल केली असेल तर त्याला सुधारण्याआधी त्याच्या प्रामाणिकपणासाठी त्याची प्रशंसा करा.
चुकीची वागणूक सुधारा. तुमच्या मुलांना त्यांच्या कार्यांच्या परिणामांना सामोरं जाऊ द्या. ते कुठे चुकले आणि त्यांची वागणूक कशा प्रकारे कुटुंबाने ठरवलेल्या स्तरांनुसार योग्य नव्हती हे त्यांना समजलं पाहिजे. काही पालक आपल्या मुलांना त्यांची चूक दाखवत नाहीत, कारण त्यांना मुलांची मनं दुखवायची नसतात. पण पालक जेव्हा मुलांना सुधारतात तेव्हा मुलांना त्यांचा विवेक प्रशिक्षित करायला मदत होते. यामुळे ते भविष्यात काही चुकीचं करण्याचं टाळतील.