सर्वजण एकमेकांशी प्रेमाने राहतील तेव्हा
डोंगरावरील प्रवचनात, सर्वजण एकमेकांशी प्रेमाने राहतील अशा काळाविषयी येशू ख्रिस्ताने सांगितले. बोलण्याच्या सुरवातीला येशूने ३७ वे स्तोत्र उद्धृत करत म्हटले: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” ही अद्भुत परिस्थिती सत्यात कशी उतरेल याचेही वर्णन देत बायबलमधील स्तोत्र म्हणते: “दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.”—मत्तय ५:५; स्तोत्र ३७:९.
हा केवढा मोठा बदल असेल—पृथ्वीवरून दुष्कर्म करणाऱ्या सर्वांचाच नायनाट आणि फक्त एकमेकांवर प्रेम करणारे राहतील! हे कसे शक्य आहे? ते दाखवण्यासाठी आपल्या सुप्रसिद्ध डोंगरावरील प्रवचनात प्रार्थना कशी करावी ते शिकवताना येशू म्हणाला: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) देवाची इच्छा कोठे पूर्ण व्हायची आहे ते पाहा. फक्त स्वर्गातच नव्हे. तर “जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छे प्रमाणे होवो अशी आपण प्रार्थना करतो,” असे द ख्रिश्चन सेंच्युरीमध्ये ठासून सांगण्यात आले.
तर मग, येशू ख्रिस्ताने आपल्याला ज्यासाठी प्रार्थना करायला शिकवले ते देवाचे राज्य आहे तरी काय? ते स्वर्गातून राज्यशासन चालवणारे एक खरेखुरे सरकार आहे. म्हणूनच त्याला “स्वर्गाचे राज्य” असे संबोधले जाते. (मत्तय १०:७) या राज्याचा अथवा सरकाराचा नियुक्त राजा देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त आहे.
मरीयेकरवी येशूचा जन्म होण्याच्या कितीतरी काळाआधी यहोवाच्या यशया या संदेष्ट्याने त्या चमत्कारिक घटनेबद्दल आणि त्यानंतर काय घडेल याविषयी भाकीत केले: “आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यावर सत्ता राहील; त्याला अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपति म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.” (यशया ९:६, ७) येशूचे मरण व पुनरुत्थान झाल्यावर, तो आपल्या स्वर्गातील पित्याशेजारी राजासनाधीन झाला आणि राजा या नात्याने राज्य करण्याची आज्ञा मिळण्याची वाट पाहू लागला.—स्तोत्र ११०:१, २; इब्री लोकांस १०:१२, १३; प्रकटीकरण ११:१५.
सरतेशेवटी, द्वेषाने भरलेल्या या जगाचे काय होईल? बायबल याचे उत्तर कसे देते ते पाहा. दानीएल नावाच्या देवाच्या संदेष्ट्याने भाकीत केले: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.
ही बायबलची भविष्यवाणी भवितव्यात मानवी व्यवहारांमध्ये एक भला मोठा बदल घडेल याचे सूचक आहे हे स्पष्ट होते. हे सबंध व्यवस्थीकरण अर्थात देवाच्या शासनाधीन होण्यास हट्टीपणे नकार देणाऱ्या या मानवजातीला पृथ्वीवरून काढून टाकले जाईल! मग त्या जागी काय येईल ते पाहा.
नीतिमान नवीन जगातील जीवन
जुन्या जगाचा अंत होईल तेव्हा बचावणारे काही लोक असतीलच. बायबल म्हणते: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) होय, नोहा आणि त्याच्या कुटुंबाचा त्यांच्या काळातल्या लोकांमधून बचाव झाला त्याप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांचाही बचाव होऊन ते नवीन जगात प्रवेश करतील. प्रेषित पेत्राने लिहिले: “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची [देवाच्या] वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (तिरपे वळण मिळणे.)—२ पेत्र ३:५-७, ११-१३.
देवाचे राज्य हेच एकटे राज्यशासन चालवणारे सरकार असेल त्या काळाबद्दल बायबल असे वचन देते: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) नीतिमान लोक शुद्ध केलेल्या पृथ्वीवर जीवनाचा आनंद लुटतील. तो केवढा भव्य काळ असेल! बायबलमध्ये वर्णन केलेले आशीर्वाद ज्यांचे मागच्या पानांवर चित्र दिले आहे त्यांचे तुम्ही आधी परीक्षण केले नसल्यास, आता कृपया करा.
आपला निर्माणकर्ता आपल्या उपासकांसाठी केवढ्या अद्भुत गोष्टींचे अभिवचन देतो हे जाणून आपले मन सुखावत नाही का? देवाने पहिल्या मानवी दांपत्याला निर्माण केले आणि त्यांना पृथ्वीवरील बागेत ठेवले तेव्हा त्याचा हाच उद्देश होता! देवाने त्यांना काय सांगितले ते पाहा: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.”—उत्पत्ति १:२७, २८.
आदाम आणि हव्वेला मुले व्हावयाची होती आणि मोठे झाल्यावर त्यांनी पृथ्वीवरील त्या बागेची देखभाल करण्याच्या सुखावह कामात सहभागी व्हावयाचे होते. मानवांचे कुटुंब वाढत गेले असते तसे एदेन बाग वाढवण्याचे ते कामही केवढ्या आनंदाचे बनले असते, नाही? संपूर्ण पृथ्वी अशीच बागेसमान व्हावी हाच देवाचा उद्देश होता. तो उद्देश कधी पूर्ण होईल का? तो उद्देश पूर्ण होईल असे आपण खात्रीने म्हणू शकतो कारण स्वतः देव तसा शब्द देतो! तो वचन देतो: “मी बोलतो . . . ते शेवटास नेतो.”—यशया ४६:११; ५५:११.
मागील पानांवर ज्याचे चित्र दिले आहे त्या शास्त्रवचनांमध्ये वर्णन केलेल्या पार्थिव बागेत सर्वकाळासाठी राहायला तुम्हाला आवडेल काय? पण, सगळ्यांनाच तेथे सर्वकाळासाठी राहू दिले जाणार नाही हे अपेक्षितच आहे. त्यासाठी काही अटी आहेत. त्या कोणत्या?
सर्वकाळ जगण्याची योग्यता प्राप्त करणे
सर्वात प्रथम म्हणजे, देवाच्या नवीन जगात राहणाऱ्यांनी देव आपल्याला शिकवतो त्याप्रमाणे एकमेकांवर प्रेम करायला शिकले पाहिजे. बायबल म्हणते: “एकमेकांवर प्रीति करावी, असे तुम्हाला देवानेच शिकविले आहे.” (१ थेस्सलनीकाकर ४:९) देव आपल्याला हे कसे शिकवतो?
विशेषतः, आपले लिखित वचन बायबलद्वारे. याचा अर्थ असा होतो की, आपल्याला सर्वकाळ जगायचे असल्यास बायबलमधील देवाच्या शिकवणुकी आपण स्वीकारल्या पाहिजेत. बायबलचा अभ्यास करणाऱ्या एका पौर्वात्य विद्यार्थ्याने म्हटले: “बायबलमध्ये वचन दिले आहे त्याप्रमाणे सर्वजण एकमेकांवर प्रेम करू लागतील त्या काळाची मला आतुरता लागून राहिली आहे.”
आपल्या पित्याला प्रार्थना करताना येशूने एका महत्त्वपूर्ण अटीविषयी सांगितले. तो म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे ३२ पानी माहितीपत्रक तुम्हाला हे ज्ञान घेण्यास मदत करील. पृष्ठ ३२ वर दिलेले कुपन भरून Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401 या पत्त्यावर किंवा पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवल्यास तुम्हाला त्याची एक प्रत मिळू शकेल.
[८-१० पानांवरील चौकट/चित्रं]
देवाचे अभिवचन
प्रेममय जागतिक बंधुत्व
“देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
गुन्हेगारी आणि युद्धाचा अंत
“दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यांतून निर्मूलन होईल.”—नीतिसूत्रे २:२२.
“[देव] दिगंतापर्यंत लढाया बंद करितो.”—स्तोत्र ४६:९.
चवदार पदार्थांची विपुलता
“भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो.”—स्तोत्र ७२:१६.
लोकांच्यात आणि प्राण्यांमध्ये शांती
“लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, . . . त्यांस लहान मूल वळील.”—यशया ११:६.
आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू नाहीसे केले जातील
“[देव] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.
मृत प्रिय जनांचे पृथ्वीवर पुनरुत्थान
“कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९.