असुरक्षितता—सबंध जगात फैलावलेला रोग
जीवनाचा काही भरवसा नाही असे तुम्हाला काही वेळा वाटते का? मग असा विचार करणारे तुम्ही एकटेच नाही कारण लाखो लोकांना अगदी असेच वाटते. असुरक्षिततेला राष्ट्रीय, धार्मिक किंवा सामाजिक मर्यादा नाहीत; एखाद्या रोगाप्रमाणे तिने पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या लोकांना ग्रासून टाकले आहे.
एका शब्दकोशात म्हटले आहे त्यानुसार, आपले जीवन असुरक्षित असते तेव्हा, आपल्याला “सुखरूप वाटत नाही, जिवाची सतत चिंता लागून राहते.” चिंता म्हणजे मनावर एक प्रकारचे ओझे असते आणि त्यामुळे तणाव निर्माण होतो; त्याचा विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. पण आपल्याला चिंता आणि असुरक्षितता वाटण्याचे काय कारण आहे?
युरोपातील चिंता
युरोपीय संघात (ईयू), ६ व्यक्तींपैकी १ व्यक्ती दारिद्र्यात जगते, १ कोटी ८० लाख बेकार आहेत, तर असे असंख्य लोक आहेत ज्यांना नोकरी सुटण्याची भीती वाटत असते. युरोपीय संघाच्या अनेक देशांमध्ये, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या लोकांचा धोका असल्याचे माहीत असल्यामुळे पालकांच्या मनात धडकी भरली आहे. तेथील एका देशात, ३ पैकी २ लोक गुन्हेगारांच्या भीतीने अस्वस्थ आहेत. लुटमार, अतिरेकीपणा आणि प्रदूषण यांचाही धोका वाढत चालला आहे असे तिथल्या इतर रहिवाशांना वाटते.
समाजात घडणाऱ्या या अत्याचारांमुळेच नव्हे, तर नैसर्गिक विपत्तींमुळेही लोकांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. उदाहरणार्थ, १९९७ आणि १९९८ सालांमध्ये, संयुक्त संस्थानांतील काही प्रदेश तुफानी वर्षाव, चिखली प्रवाह आणि झंझावातींसारख्या नैसर्गिक विपत्तींनी पार उद्ध्वस्त झाले. १९९७ मध्ये, ओडेर आणि नाईसा या नदींना पूर आला तेव्हा मध्य युरोपातील प्रदेशांना त्याचा तडाखा बसला. पोलिटायका या पोलिश साप्ताहिकानुसार, शेतजमिनींचे प्रदेशचे प्रदेश त्याचप्रमाणे ८६ शहरे, गावे आणि सुमारे ९०० खेडी पाण्याखाली बुडाली. सुमारे ५०,००० लोकांचे पीक नष्ट झाले आणि जवळजवळ ५० लोक यात मृत्यूमुखी पडले. एवढेच नव्हे तर, १९९८ सालाच्या अगदी सुरवातीलाच, चिखली प्रवाहांमुळे दक्षिण इटलीतल्या असंख्य लोकांचे प्राण गेले.
व्यक्तिगत सुरक्षितता
पण दहा वर्षांआधी परिस्थिती जशी होती त्यापेक्षा आताचे जीवन अधिक सुरक्षित आहे असे आपल्याला वाटत नाही का? शीत युद्ध संपल्यावर सैन्य बलही कमी झाले नाही का? अर्थात, राष्ट्रीय सुरक्षा कदाचित सुधारली असेल. परंतु, एखाद्या व्यक्तीची सुरक्षा घरात आणि घराबाहेर जे घडते त्यावर अवलंबून असते. आपली नोकरी सुटली किंवा घराच्या आसपास चोर किंवा लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारा कोणी हिंडत आहे असा संशय असल्यावर, आपल्याला हुरहूर आणि असुरक्षितता वाटल्याशिवाय राहत नाही; अशा वेळी कितीही शस्त्रे नष्ट केली असली तरी त्याचा काही फायदा होत नाही.
आपल्या जीवाला धोका आहे असे ज्यांना वाटते ते या परिस्थितीला कसे तोंड देतात? त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, सर्वांना—तुम्हाला देखील—हमेशा हमेशासाठी सुरक्षा देण्याचा एखादा मार्ग आहे का? पुढील दोन लेखांमध्ये या मुद्द्यांवर विचारविनिमय केला जाईल.
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
UN PHOTO 186705/J. Isaac
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
FAO photo/B. Imevbore