वाचकांचे प्रश्न
प्रचाराचं काम कधीपर्यंत चालू राहील?
येशूने म्हटलं होतं: “सगळ्या राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल आणि त्यानंतर अंत येईल.” (मत्त. २४:१४) या वचनात, तसंच ६ व्या आणि १३ व्या वचनांतही “अंत” किंवा ‘शेवट’ या शब्दांसाठी वापरण्यात आलेला ग्रीक शब्द म्हणजे टेलॉस. हा शब्द कशाला सूचित करतो? हर्मगिदोनच्या युद्धात होणाऱ्या सैतानाच्या जगाच्या अंताला. (प्रकटी. १६:१४, १६) तर मग स्पष्टच आहे, की हा अंत येण्याआधीपर्यंत आपण आनंदाच्या संदेशाचा प्रचार करत राहू. यामुळे आपली आधीची समज सुधारते.
आधी आपण असं मानायचो की मोठ्या बाबेलचा नाश झाल्यानंतर जेव्हा मोठ्या संकटाची सुरुवात होईल, तेव्हा आनंदाच्या संदेशाचं प्रचार काम थांबेल. (प्रकटी. १७:३, ५, १५, १६) या घटनेने एका अर्थाने ‘यहोवाच्या कृपेच्या वर्षाचा’ शेवट होईल, असं आपण मानायचो. (यश. ६१:२) आपण असंसुद्धा मानायचो, की मोठ्या संकटातून जे वाचतील ते या घटनेपूर्वीच यहोवाला एकनिष्ठ असल्याचं सिद्ध करतील. आपण त्यांची तुलना इ.स.पू. ६०७ मध्ये यरुशलेमच्या नाशातून वाचलेल्या यहुद्यांशी करायचो, कारण हे यहुदी यहोवाची उपासना करत असल्यामुळे आणि वाईट गोष्टींचा द्वेष करत असल्यामुळे त्यांचा बचाव व्हावा म्हणून त्यांच्या कपाळावर आधीच खूण करण्यात आली होती. (यहे. ५:११; ९:४) पण ही तुलना मत्तय २४:१४ मध्ये येशूने जे म्हटलं त्याच्याशी जुळत नाही. कारण त्यातल्या येशूच्या शब्दांवरून असं सूचित होतं, की हर्मगदोनच्या युद्धामुळे येणाऱ्या अंतापर्यंत लोकांकडे आनंदाच्या संदेशाला प्रतिसाद द्यायची संधी असेल.
मत्तय २४:१४ मधली आपली समज स्पष्ट झाल्यामुळे प्रकटीकरण १६:२१ मध्ये सांगितलेल्या मोठमोठ्या गारांसारख्या असलेल्या संदेशाबद्दलची आपली समजसुद्धा सुधारते. या वचनांचा आणखी अभ्यास केल्यामुळे ही दोन्ही वचनं एकमेकांशी जुळत असल्याचं समजतं. ते कसं? लोक आनंदाच्या संदेशाला कसा प्रतिसाद देतात त्यावरून हे समजतं. लक्ष द्या प्रेषित पौलने याबद्दल म्हटलं, की ‘तारण होणाऱ्यांसाठी’ हा संदेश “जीवनाचा सुगंध” आहे, तर देवाच्या शत्रूंसाठी हा संदेश “मरणाचा गंध” आहे. (२ करिंथ. २:१५, १६) देवाचे शत्रू राज्याच्या संदेशाचा द्वेष करतात. कारण आपण त्यांना त्यांचं जग दुष्ट आहे, त्यावर सैतानाचं नियंत्रण आहे आणि लवकरच त्याचा नाश होणार आहे, हे सांगतो आणि त्यामुळे त्यांच्या जगाचं पितळ उघडं पडतं.—योहा. ७:७; १ योहा. २:१७; ५:१९.
हेही लक्षात घ्या की प्रकटीकरण १६:२१ मध्ये सांगितलेला गारांसारखा संदेश “महाभयंकर” असेल. म्हणजेच हा संदेश खूप जबरदस्त आणि थेट असेल. तसंच आजपर्यंत पोहोचला नाही इतक्या लोकांपर्यंत तो पोहोचेल. यामुळे जास्तीत जास्त लोकांना यहोवाचं नाव कळेल. (यहे. ३९:७) मग मोठ्या बाबेलचा नाश झाल्यावर आणि हर्मगिदोन सुरू होण्याआधी काही लोकांना हा संदेश जीवनाच्या सुगंधासारखा वाटेल का? कदाचित वाटेल. खोट्या धर्माचा नाश आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर कदाचित त्यांना आठवेल, की यहोवाचे साक्षीदार बऱ्याच वर्षांपासून याबद्दलच सांगत होते.
पूर्वी इजिप्तवर यहोवाने दहा पीडा आणल्यानंतर असंच काहीसं घडलं. यहोवाने “इजिप्तच्या सर्व देवांवर न्यायदंड” आणल्यानंतर यहोवाच्या लोकांसोबत “विदेश्यांचा एक मोठा समूहसुद्धा” तिथून बाहेर निघाला. (निर्ग. १२:१२, ३७, ३८) कदाचित मोशेने दहा पीडांबद्दल जे सांगितलं होतं ते खरं झाल्याचं पाहून हे विदेशी यहोवाकडे वळले असावेत.
मोठ्या बाबेलचा नाश झाल्यावरसुद्धा ख्रिस्ताचे भाऊ या पृथ्वीवरच असतील. म्हणून जे त्या वेळी यहोवाकडे वळतील, त्यांच्याकडे ख्रिस्ताच्या भावांना पाठिंबा द्यायची आणि मेंढरं म्हणून गणलं जाण्याची संधी असेल. (मत्त. २५:३४-३६, ४०) पण त्यांच्याकडे ही संधी जास्त वेळासाठी नसेल. कारण हर्मगिदोनच्या आधी पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्तजनांना स्वर्गात घेतलं जाईल.
आपली ही समज स्पष्ट झाल्यामुळे यहोवा किती प्रेमळ आहे आणि किती दयाळू आहे या गोष्टीवरचा आपला भरवसा आणखी वाढतो. खरंच, “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्चात्ताप करावा असं त्याला वाटतं.”—२ पेत्र ३:९.