वाचक विचारतात . . .
२०१२ मध्ये पृथ्वीचा विनाश होईल का?
▪ “जगाचा विनाश होईल असा विश्वास करणाऱ्या लोकांचे थवेच्या थवे फ्रांसच्या एका गावात येत आहेत. . . . प्राचीन माया संस्कृतीच्या ५,१२५ वर्षांच्या कॅलेंडरमधील शेवटला दिवस असलेल्या २१ डिसेंबर २०१२ रोजी जगाचा विनाश होईल असे हे लोक मानतात.”—बीबीसी न्यूज.
जगाचा विनाश होईल असे सांगणारे धार्मिक पुढारी, स्वतःला शास्त्रज्ञ म्हणणारे लोक आणि २१ व्या शतकातील भविष्य सांगणाऱ्या इतर कोणीही, पृथ्वीच्या विनाशाविषयी कितीही अंदाज बांधले तरीही या पृथ्वीचा विनाश होणार नाही, ती तशीच टिकून राहील. होय, पृथ्वीचा विनाश २०१२ मध्ये होणार नाही. खरे पाहता पृथ्वीचा विनाश कधीच होणार नाही, ती वर्षानुवर्षे तशीच टिकून राहील!
बायबल म्हणते: “एक पिढी जाते व दुसरी पिढी येते, परंतु पृथ्वी सर्वकाल टिकते.” (उपदेशक १:४, पं.र.भा.) तसेच यशया ४५:१८ मधील शब्दांचादेखील अर्थ पाहा: “आकाशाचा उत्पन्नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडली; हा परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर आहे; अन्य कोणी नव्हे.”
समजा एक प्रेमळ पिता बरेच तास खर्च करून व मेहनत घेऊन त्याच्या मुलासाठी एक खेळणे बनवतो व ते पाहून मुलगा खूप खूष होतो. पण ते खेळणे मुलाच्या हातात दिल्याच्या दुसऱ्याच क्षणी पिता ते मोडून टाकेल का? हे तर निर्दयी ठरेल! तसेच देवाने ही पृथ्वी मानवांनी आनंदी राहावे म्हणून त्यांच्या वस्तीसाठी बनवली आहे. आदाम आणि हव्वा या पहिल्या मानवी जोडप्याला देवाने असे म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” त्यानंतर “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्पत्ती १:२७, २८, ३१) पृथ्वीसाठी आपला उद्देश देवाने बदललेला नाही, तो पृथ्वीचा विनाश कधीच होऊ देणार नाही. यहोवाने दिलेल्या सर्व आश्वासनांविषयी त्याने ठामपणे असे म्हटले: “ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठवले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.
पण “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची” यहोवाची इच्छा आहे. (प्रकटीकरण ११:१८) बायबलमध्ये तो आपल्याला असे आश्वासन देतो: “सरळ जनच देशात वस्ती करतील; सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यातून निर्मूलन होईल.”—नीतिसूत्रे २:२१, २२.
हे कधी होईल? कोणत्याच मानवाला हे माहीत नाही. येशूने असे म्हटले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतासही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.” (मार्क १३:३२) देव दुष्ट लोकांचा नाश कधी करेल याचा अंदाज यहोवाचे साक्षीदार बांधत नाहीत. ते अंताच्या ‘चिन्हाकडे’ जवळून लक्ष ठेवत असले आणि मानवजात आज बायबलमध्ये सांगितलेल्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहे असा विश्वास करत असले तरी, अंत येण्याचा अचूक दिवस ते सांगू शकत नाहीत. (मार्क १३:४-८, ३३; २ तीमथ्य ३:१) ते असे मानतात की त्यांचा स्वर्गीय पिता व त्याचा पुत्र या दोघांना अंत कधी होईल हे माहीत आहे.
पण त्यादरम्यान यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यात स्वतःला व्यस्त ठेवतात. देवाचे हे राज्य एक स्वर्गीय शासन आहे जे पृथ्वीवर राज्य करेल आणि पृथ्वीचे एका नंदनवनात रुपांतर करेल, जेथे “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्र ३७:२९. (w११-E १२/०१)
[१० पानांवरील चित्राचे श्रेय]
Image Science and Analysis Laboratory, NASA-Johnson Space Center