४१ जखऱ्या आणि अलीशिबा
“ते दोघं यहोवाच्या नजरेत नीतिमान होते”
जखऱ्यासाठी एक मोठा दिवस होता. आज तो एक खूप खास काम करणार होता. फार कमी लोकांना हा बहुमान मिळायचा. आणि जखऱ्याच्या आयुष्यात कदाचित एकदाच त्याला हे काम करायची संधी मिळणार होती. तो अहरोनच्या घराण्यातल्या याजकांपैकी एक होता. आणि आज देवाच्या मंदिरात सोन्याच्या वेदीवर धूप जाळायची त्याची पाळी होती. त्यामुळे साहजिकच, त्याच्यासाठी आणि त्याची प्रिय पत्नी अलीशिबा हिच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा होता.
जखऱ्या आणि अलीशिबा यांचं लग्न होऊन बरीच वर्षं झाली होती. ते दोघंही “यहोवाच्या नजरेत नीतिमान होते.” त्यामुळे यहोवाने त्यांना बरेच आशीर्वाद दिले होते. पण एका गोष्टीसाठी ते खूप आसुसलेले होते आणि ती गोष्ट त्यांच्या आवाक्याबाहेर होती. त्यांना मूल हवं होतं, पण त्यांचं “वय झालं होतं.” त्या काळातल्या लोकांसाठी मुलं असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. ही गोष्ट त्यांच्या हाताबाहेर असली तरी ते यासाठी यहोवाला प्रार्थना करत होते. त्यांना खातरी होती, की एक ना एक दिवस यहोवा त्यांची प्रार्थना नक्की ऐकेल.
मंदिरात बाहेर लोकांची गर्दी जमली होती. ते प्रार्थना करत होते तेव्हा जखऱ्या मंदिराच्या पवित्र स्थानात गेला. तिथे खूप शांतता होती. अचानक त्याच्यासमोर एक आकृती प्रकट झाली. ती धूपवेदीच्या जवळ उभी होती. तो यहोवाचा एक स्वर्गदूत होता! त्याने जखऱ्याला सांगितलं, की देवाने त्याची प्रार्थना ऐकली आहे आणि अलीशिबाला लवकरच एक मुलगा होईल. त्याचं नाव त्यांना योहान ठेवायचं होतं. तो मुलगा मोठा होऊन “एलीयाप्रमाणे पवित्र शक्तीने आणि सामर्थ्याने” देवापुढे चालणार होता. तो एक मोठं काम करणार होता. तो लोकांना यहोवाकडे परत आणण्यासाठी त्यांची मनं तयार करणार होता.
जखऱ्याच्या मनात शंका आल्यामुळे स्वर्गदूत जे बोलतोय ते खरंच होईल का याची खातरी करून घेण्यासाठी त्याने त्याच्याकडे चिन्ह मागितलं. पण त्याचं असं विचारणं चुकीचं आहे, हे स्पष्ट करण्यासाठी स्वर्गदूत त्याला म्हणाला: “मी देवाजवळ उभा राहणारा गब्रीएल आहे.” त्यामुळे यहोवाच्या या सामर्थ्यशाली सेवकावर खरंतर संशय घ्यायचं काहीच कारण नव्हतं. गब्रीएल पुढे त्याला म्हणाला, की जोपर्यंत देवाचं वचन पूर्ण होतं नाही तोपर्यंत तो बोलू शकणार नाही. त्यामुळे जखऱ्या जेव्हा पवित्र स्थानातून बाहेर आला तेव्हा आत जे घडलं होतं ते सांगण्यासाठी त्याला काहीच बोलता येत नव्हतं. तो फक्त खाणाखुणा करून सांगायचा प्रयत्न करत होता.
मूलबाळ नसलेल्या आणि वय झालेल्या एका जोडप्याला स्वर्गदूताकडून एक संदेश मिळाला तेव्हा त्यांचं जीवनच बदलून गेलं
जे काही घडलं होतं ते जखऱ्याने अलीशिबाला कसंबसं खाणाखुणा करून सांगितलं. “मग काही दिवसांनी” अलीशिबा गरोदर राहिली. ती पाच महिने घराबाहेर पडली नाही. पण सहाव्या महिन्यात तिची एक नातेवाईक, म्हणजे नासरेथमधल्या एलीची मुलगी मरीया तिला भेटायला आली. मरीयेने घरात पाऊल टाकताच, अलीशिबाच्या पोटातल्या बाळाने आनंदाने उडी मारली. मग पवित्र शक्तीने प्रेरित होऊन अलीशिबाने मरीयाला “माझ्या प्रभूची आई” असं म्हटलं. देवाने तिला याची जाणीव करून दिली होती, की मरीया गरोदर आहे आणि तिला होणारं मूल पुढे मसीहा बनेल. पण या गोष्टीचा तिला हेवा वाटला नाही. उलट, मरीयासमोर असलेल्या या मोठ्या जबाबदारीसाठी तिने तिला धीर आणि प्रोत्साहन दिलं.
जेव्हा अलीशिबाने बाळाला जन्म दिला, तेव्हा नातेवाईक आणि शेजारचे लोक तिला भेटायला आले. आणि तिने जखऱ्याच्या नावावरून बाळाचं नाव ठेवावं असा आग्रह तिला करू लागले. पण आपल्या पतीला गब्रीएल स्वर्गदूताने काय सांगितलं होतं हे तिला माहीत होतं. स्वर्गदूताने सांगितलं होतं: “तू त्याचं नाव योहान ठेव.” त्यामुळे तिने त्या लोकांचं ऐकलं नाही आणि ती त्यांना म्हणाली: “नाही! त्याचं नाव योहान असेल.” पण लोकांना हे पटलं नाही म्हणून ते जखऱ्याकडे बघू लागले. जखऱ्याला अजूनही बोलता येत नव्हतं. म्हणून त्याने एका पाटीवर लिहिलं: “याचं नाव योहान आहे.” असं लिहिताच त्याची बोलण्याची शक्ती त्याला परत मिळाली.
मग जखऱ्यावर देवाची पवित्र शक्ती आली आणि तो भविष्यवाणी करू लागला. त्याने लोकांना आशेचा, सुटकेचा आणि देवाच्या दयेचा संदेश घोषित केला. त्याने अशी भविष्यवाणी केली, की त्याचा मुलगा योहान ‘यहोवाच्या पुढे चालून त्याचे मार्ग तयार करेल.’ आणि तसंच झालं. येशूने देवाच्या राज्याचा संदेश सांगायला सुरुवात करण्याआधी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने तो संदेश ऐकण्यासाठी लोकांची मनं तयार केली.
मसीहाच्या येण्यामुळे एक मोठा बदल घडणार होता. देवाचे लोक अविश्वासू लोकांसोबत आणि विरोधकांसोबत ज्या प्रकारे वागायचे त्यात बदल घडून येणार होता. पूर्वीच्या काळात देवाच्या अनेक सेवकांनी पृथ्वीवर देवाच्या शत्रूंविरुद्ध शस्त्रं वापरून धैर्य दाखवलं होतं. पण आता एका नव्या युगाची सुरुवात होणार होती. यहोवा आता आपल्या मानवी सेवकांना अशा प्रकारचं युद्ध करायला सांगणार नव्हता. पण तरीसुद्धा त्यांना धैर्याची गरज पडणार होती. कारण यहोवाबद्दल बोलण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी त्यांनाही जखऱ्या आणि अलीशिबासारखंच आपल्या बोलण्याच्या देणगीचा वापर करावा लागणार होता.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
जखऱ्या आणि अलीशिबाने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. जखऱ्या आणि अलीशिबा अपरिपूर्ण असूनसुद्धा बायबल त्यांना “यहोवाच्या नजरेत नीतिमान” असल्याचं का म्हणतं? (लूक १:६; टेहळणी बुरूज०२ ६/१ १६ ¶१४)
२. बायबल गब्रीएलबद्दल काय सांगतं? (इन्साइट “गब्रीएल” ¶२-३-wcgr) १
चित्र १
चित्र १
३. गब्रीएलने जखऱ्याला त्याच्या मुलाचं नाव योहान ठेवायला सांगितलं. या नावाचा काय अर्थ होतो? (इन्साइट “योहान” ¶१-wcgr)
४. जखऱ्या मुका आणि बहिराही झाला होता का? (टेहळणी बुरूज०८ ३/१५ ३० ¶६)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
जखऱ्याच्या काळात एखाद्या स्त्रिला मूलबाळ होत नसेल तर तिचा पती यहुदी धर्मगुरूंच्या परवानगीने तिला घटस्फोट देऊ शकत होता. आपल्या जोडीदाराशी जडून राहण्याच्या बाबतीत जखऱ्याच्या उदाहरणातून पती काय शिकू शकतात? २
चित्र २
नातेवाइकांचा आणि शेजारच्या लोकांचा दबाव असतानाही अलीशिबाने आपल्या पतीला साथ दिली. (लूक १:५८-६१) यावरून पत्नी काय शिकू शकतात?
तुम्ही आणखी कोणत्या मार्गांनी जखऱ्या आणि अलीशिबाच्या धैर्याचं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
जखऱ्या आणि अलीशिबाचं जर पृथ्वीवर पुनरुत्थान झालं तर मी त्यांना काय विचारेन?a
आणखी शिका
जखऱ्याला त्याची बोलायची शक्ती पुन्हा मिळाल्यावर त्याने आपल्या या क्षमतेचा वापर करून देवाची स्तुती कशी केली ते पाहा.
अलीशिबाला भेटायला गेल्यावर मरीयाला धीर मिळाला. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
“‘तो तुम्हाला बळ देईल’—कसं?” (टेहळणी बुरूज२३.१० १४-१५ ¶१०-१४)
a जखऱ्याचा आणि अलीशिबाचा जर इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टच्या आधी मृत्यू झाला असेल तर त्यांचं पृथ्वीवर पुनरुत्थान होईल.