वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g23 क्र. १ पृ. ९-११
  • जंगलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जंगलं
  • सावध राहा!—२०२३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जंगलं धोक्यात
  • पृथ्वीची नुकसान भरून काढायची क्षमता
  • यावर केला जाणार उपाय
  • काही आशा आहे का?​—बायबल काय म्हणतं?
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२३
सावध राहा!—२०२३
g23 क्र. १ पृ. ९-११
एक स्त्री वर्षावनातल्या एका पुलावरून जात आहे.

पृथ्वीचा श्‍वास कोंडतोय!

जंगलं

जंगलांना पृथ्वीची फुप्फुसं म्हणण्यात आलंय आणि ते बरोबरच आहे. आपल्यासाठी धोकादायक असलेला कार्बन डायऑक्साइड वायू झाडं शोषून घेतात. आणि आपल्याला जगण्यासाठी लागणारा ऑक्सिजन ते बाहेर सोडतात. पृथ्वीवरची जवळजवळ ८० टक्के झाडं आणि प्राणी ही जंगलातच पाहायला मिळतात. पण जर जंगलंच नसतील तर आपण जगू शकणार नाही.

जंगलं धोक्यात

दरवर्षी खासकरून शेती करण्यासाठी लाखो झाडं कापली जातात. जवळजवळ ७५ वर्षांआधीपासून जगातली अर्धी वर्षावनं नाहीशी झाली आहेत.

जेव्हा जंगलतोड होते, तेव्हा त्यातली झाडंझुडपं आणि त्यात राहणारे प्राणीसुद्धा नष्ट होतात.

पृथ्वीची नुकसान भरून काढायची क्षमता

जंगलतोड झालेल्या काही ठिकाणी पुन्हा झाडं उगवली आहेत आणि तिथे मोठं जंगल तयार झालंय. पर्यावरणशास्त्रज्ञांना नुकतीच एक आश्‍चर्याची गोष्ट कळली. ती म्हणजे, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त झाडं कापली गेली आहेत, त्या ठिकाणी झाडं पटकन उगवतात आणि त्यांचं घनदाट जंगल तयार होतं. याची काही उदाहरणं पाहू या:

  • शेतीसाठी ज्या जमिनीवर जंगलतोड करण्यात आली होती आणि नंतर ती जमीन तशीच पडीक राहिली, त्या जमिनीचा संशोधकांनी अभ्यास केला. अमेरिका आणि पश्‍चिम आफ्रिकेतल्या अशा २,२०० जमिनींचा अभ्यास केल्यावर संशोधकांना दिसून आलं, की दहा वर्षांतच ती माती पुन्हा पूर्वीच्या स्थितीत येऊ शकते आणि तिथे झाडं उगवू शकतात.

  • सायन्स  मासिकात सांगितलेल्या एका अभ्यासाप्रमाणे संशोधकांचा असा अंदाज आहे, की जवळजवळ १०० वर्षांत जमीन पुन्हा तिच्या पूर्वस्थितीत येऊ शकते आणि त्यावर वन्य जीवन पुन्हा सुरू होऊ शकतं.

  • अलीकडेच ब्राझीलमधल्या वैज्ञानिकांनी कोणत्या जमिनीवर जंगलं लवकर तयार होऊ शकतात, याचा अभ्यास केला. माणसांनी झाडंझुडपं लावलेल्या जमिनीवर जंगल लवकर तयार होतं, की आपोआप झाडंझुडपं उगवलेल्या जमिनीवर लवकर तयार होतं, याचं त्यांनी परीक्षण केलं.

  • नॅशनल जिओग्राफिकच्या एका अहवालात याच संशोधकांनी केलेल्या अभ्यासाचा संदर्भ घेऊन असं सांगण्यात आलं: “आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे संशोधकांना असं दिसून आलं की त्या ठिकाणी खरंतर झाडं लावण्याची गरजच नव्हती.” कारण फक्‍त पाच वर्षांत कोणत्याही प्रकारची झाडं न लावता त्या जमिनीवर “त्या प्रदेशातली झाडं” आपोआप उगवून आली होती.

    तुम्हाला माहीत होतं का?

    पडीक शेतजमीन ते घनदाट जंगल

    या चित्रात दाखवलंय की एका ठिकाणी शेतीसाठी जंगलतोड झाली आहे, मग नंतर ती जमीन तशीच पडीक राहते. दहा वर्षांनंतर तिथली माती पूर्वस्थितीत येते. शंभर किंवा जास्त वर्षांनंतर तिथे घनदाट जंगल उगवू शकतं.

    शेतीसाठी ज्या जमिनींवर जंगलतोड करण्यात आली होती आणि नंतर ती जमीन तशीच पडीक राहिली, त्या जमिनीत पूर्वस्थितीत यायची क्षमता आहे. दुसऱ्‍या कारणांमुळे ज्या जंगलांची नासधूस झाली त्यांच्या बाबतीतही हेच खरंय.

यावर केला जाणार उपाय

जंगलांचं संरक्षण करण्यासाठी आणि ज्या जंगलांचं नुकसान झालंय त्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. युनायटेड नेशनच्या एका रिपोर्टनुसार याचा परिणाम असा झालाय, की गेल्या २५ वर्षांत “जागतिक जंगलतोडीचं प्रमाण जवळजवळ ५० टक्क्यांहून कमी झालंय.”

पण आपल्या जंगलांचं संरक्षण करण्यासाठी इतकेच प्रयत्न करणं पुरेसं नाही. ग्लोबल फॉरेस्ट वॉच नावाच्या एका संघटनेने प्रकाशित केलेल्या एका अहवालात असं म्हटलंय, की “उष्ण प्रदेशांमध्ये जी जंगलतोड सुरू आहे, तिचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये विशेष बदललेलं नाही.”

बेकायदेशीर जंगलतोड हा लाखो-करोडो रुपयांचा व्यवसाय बनलाय. आणि उष्ण प्रदेशात होणाऱ्‍या जंगलतोडीचं हेच सगळ्यात मुख्य कारण आहे.

वन व्यवस्थापन करणारी एक व्यक्‍ती जंगलातल्या झाडांची पाहणी करतोय.

वन व्यवस्थापन करणारे वेगवेगळे गट आधीच तयार असलेल्या जंगलांचं संरक्षण करतात. तसंच नवीन झाडं लावून ते जंगलांचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत

काही आशा आहे का?​—बायबल काय म्हणतं?

“यहोवाa देवाने दिसायला सुंदर आणि चांगली फळं देणारं प्रत्येक झाड जमिनीतून उगवायला लावलं.”​—उत्पत्ती २:९.

जंगलांचा आपण कितीही वापर करत राहिलो तरी निर्माणकर्त्याने त्यांची रचना अशी केली आहे, की ते आपली झीज भरून काढू शकतात. अद्‌भुत प्रकारे रचण्यात आलेल्या या सर्व जंगलांचं रक्षण व्हावं आणि ती शाबूत राहावीत अशी त्याची इच्छा आहे.

बायबल सांगतं की देव स्वार्थी मानवांना या पृथ्वीची आणि जीवसृष्टीची हानी करू देणार नाही. पान १५ वरचा “आपली पृथ्वी टिकून राहील असं देवाने वचन दिलंय,” हा लेख पाहा.

a बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं दिलंय.​—स्तोत्र ८३:१८.

जास्त माहितीसाठी

एक जोडपं नंदनवन पृथ्वीचा आनंद घेत आहेत.

माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी पृथ्वीवरच्या गोष्टींचा गैरवापर करतोय. पण यामुळे पृथ्वीचा नाश होणार नाही याची आपण खातरी का बाळगू शकतो? jw.org वरचा देवाने पृथ्वी का बनवली?  हा व्हिडिओ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा