“घनमेघात अक्कल कोणी घातली?”
“जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लागलेच म्हणता, पावसाची सर येत आहे, आणि तसे घडते. दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल, असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते.” हे येशूचे शब्द शुभवर्तमान लिहिणाऱ्या लूकने लिहिले. प्राचीन काळातील पॅलेस्टाईन लोक हवामानाचा अंदाज कसा काढत, हे येशूच्या वरील शब्दांवरून स्पष्ट होते. (लूक १२:५४, ५५) काही खास परिस्थितींमध्ये या प्राचीन काळातील लोकांना चिन्हे पाहून लवकरच काय होईल याचा अचूक अंदाज बांधता येत होता.
आज मात्र, पृथ्वीभोवती फिरणारे सॅटेलाईट, डॉप्लर रडार आणि शक्तिशाली संगणक यांसारख्या अद्ययावत साधनांच्या उपयोगाने हवामानशास्त्र फार आधीच पुढील हवामानाचा आढावा घेते. पण हा अंदाज बहुतेकवेळा हुलकावणी देतो. का?
अनेक कारणांमुळे हवामानाचा अचूक अंदाज बांधता येत नाही. उदाहरणार्थ, तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याची गती आणि दिशा यांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा अंदाज बांधणे आणखीनच कठीण होऊन बसते. याशिवाय सूर्य, ढग आणि महासमुद्र यांच्या आपआपसांत होणाऱ्या जटील प्रक्रियांमुळेही हवामानाचा अचूक अंदाज बांधता येत नाही. या कारणास्तव हवामानाचा अंदाज हे एक सदोष शास्त्र होऊन बसले आहे.
हवामानाविषयी असणाऱ्या मानवाच्या मर्यादित ज्ञानामुळे आपल्याला ईयोबाला विचारलेले प्रश्न आठवतात: “दहिंवरबिंदूस कोण जन्म देतो? हिम कोणाच्या गर्भाशयातून निघते? . . . तुजवर विपुल जलवर्षाव व्हावा म्हणून मेघास तुला पुकारून सांगता येईल काय? . . . घनमेघात अक्कल कोणी घातली? अभ्रास समज कोणी दिली? कोणास आपल्या बुद्धिसामर्थ्याने मेघांची हजिरी घेता येते? आकाशाचे बुधले कोण ओतितो?”—ईयोब ३८:२८-३७.
या सर्व प्रश्नांची उत्तरे कोणा ‘मनुष्याकडे नसून केवळ यहोवा देवाकडेच आहेत.’ होय, हे खरे आहे, की मानव कितीही बुद्धिमान वाटत असले, तरी आपल्या निर्माणकर्त्याची बुद्धी त्यांच्यापेक्षा कितीतरी अगाध आहे. आपल्या जीवनाचे सार्थक व्हावे म्हणून त्याने त्याची बुद्धी आपल्याकरता बायबलमध्ये प्रकट केली आहे; त्याचे हे कार्य खरोखरच प्रेमळपणाचे आहे.—नीतिसूत्रे ५:१, २.