तुमचं बोलणं टोचणारं कीआरोग्य देणारं?
या कठीण काळात बहुतेक लोक “भग्नहृदयी” झालेले असून त्यांचं ‘मन अनुतप्त’ आहे पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. (स्तोत्र ३४:१८) यामुळेच, प्रेषित पौलाच्या शब्दांत सांगायचं झाल्यास ‘निराश झालेल्यांशी सांत्वनापूर्वक बोलण्याची, अशक्तांना आधार देण्याची’ नेहमी गरज आहे. (१ थेस्सलनीकाकर ५: १४, NW) पण, एखादा मनुष्य आपलं मन दुखवतो किंवा एखादं गंभीर पाप करतो तेव्हा काय करावं? अशाप्रकारच्या परिस्थितीत आपल्याला कदाचित वाटेल की त्या व्यक्तीला कडक शब्दांत सुनावणंच योग्य आहे. तथापि, यावेळी खबरदारी घेण्याची गरज आहे. धाकदपटशानं दिलेला सल्ला योग्य असतानाही हानीकारक ठरू शकतो. नीतिसूत्रे १२:१८ म्हणतं: “कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचारांचे भाषण करितो.”
यास्तव, आपण एखाद्यामध्ये सुधारणा करण्याचे किंवा गैरसमज दूर करण्याचं ठरवतो तेव्हा नीतिसूत्रे १२:१८ या वचनाचा दुसरा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे: “सुज्ञाची जिव्हा आरोग्यदायी आहे.” नेहमी हा प्रश्न स्वतःला विचारा, ‘माझ्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्यास, सुधारकानं कशाप्रकारं सुधारावं असं मला वाटतं?’ आपल्यांपैकी बहुतेक लोक टीका ऐकण्यापेक्षा उत्तेजनास प्रतिसाद देतात. म्हणून तोंड भरून प्रशंसा करा. यामुळे चूक करणाऱ्याला सुधारणा करण्याची प्रेरणा मिळत राहील आणि कदाचित देण्यात येणाऱ्या मदतीकरता कृतज्ञताही व्यक्त करील.
आपले शब्द नेहमी सौम्य असणे किती महत्त्वाचं आहे! आरोग्यदायी शब्दांमुळे ऐकणाऱ्याला स्तोत्रकर्त्याप्रमाणे वाटेल. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही.”—स्तोत्र १४१:५.