नवे जग अगदी जवळ आले आहे!
सध्याचे जग हे नाशासोबत झगडत आहे! हे खरोखरी सत्य असू शकेल काय? तर, जगाच्या परिस्थितीचे काळजीपर्वूक परिक्षण करा.
पृथ्वीवरील संपूर्ण लोकवस्तीचा अनेक वेळा नाश करील एवढा अणूशस्त्रसाठा आज जमा आहे. अंगोला व मोझांबिक मध्ये चालू असणाऱ्या यादवी युद्धाप्रमाणे अनेक युद्धे वाढतच आहेत. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इतर राष्ट्रांत वंशभेदाचे झगडे चालू आहेत. दहशतवाद तसेच दुष्काळ या गोष्टी देखील मानवी जीवांचा बराच मोठा भाग भयंकरपणे हिरावून घेत आहेत.
तसेच, सर्वत्र फैलावलेल्या एड्स या रोगाबद्दल काय? दक्षिण आफ्रिकेच्या संडे टाईम्स च्या ऑक्टोबर २५, १९८७ अंकात याला “न्यू ब्लॅक डेथ,” अशी संज्ञा देऊन म्हटलेः “आता आफ्रिकेत फैलावलेल्या या एड्स रोगाचे भयानक रुप प्रकट झालेः १९९४ पर्यंत काही देशात हा रोग दर दहामागे सहा माणसांचा बळी घेणार.”
अशा या परिस्थितींमुळे भय सर्वत्र पसरले आहे. नोबेल पारितोषिक विजेते हेरल्ड सी. उरे हे काही वर्षांआधी म्हणाले होतेः “आम्ही भयाचे सेवन करू, भयात झोपू, भयात जगू आणि भयातच मरू.” वस्तुतः, या जगात सर्वश्रेष्ठ भविष्यवादी येशू ख्रिस्त याने या जगाच्या शेवटल्या दिवसांबद्दल भाकित करताना अगदी सार्थपणे म्हटले होते की, “भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्ये मूर्च्छिंत होतील.”—लूक २१:२६.
पण अनेकांना असे भय वाटत नाहीत. ते तर, याउलट आनंदात आहेत. का बरे? कारण ते हे जाणून आहेत की, या जगाच्या (पृथ्वी ग्रहाचा नव्हे) व्यवस्थीकरणाचा अंत जवळ आलेला आहे, आणि नवे जग जवळ आले आहे. त्यांना ही खात्री कशी आहे? कारण अनेक पवित्र शास्त्रीय भविष्यवादांची प्रत्यक्षात पूर्णता होत आहे.
उदाहरणार्थ, जेव्हा येशू ख्रिस्ताला त्याच्या उपस्थितीबद्दल तसेच जगाच्या अंताबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणालाः “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.” १९१४ मध्ये पहिल्या जागतिक महायुद्धाचा स्फोट झाला. त्या काळापर्यंत जेवढी युद्धे झाली होती त्या सर्वांपेक्षा अधिक मोठी प्राणहानी यात झाली. ती किती होती? ९०,००,००० सैन्य तर ठार झालेच पण सोबत लाखो मुलकी लोक सुद्धा ठार झाले! तथापि, दुसरे जागतिक महायुद्ध यापेक्षा अधिक नाशकारक झाले. यामध्ये ५,५०,००,००० लोकांची प्राणहानी झाली! येशूने म्हटले होते की, या सर्वांसोबतच अन्नटंचाई, भूकंप, मरी आणि गुन्हेगारी यांजमध्ये वाढ असेल.—मत्तय २४:७-१३; लूक २१:१०, ११.
ख्रिस्ती प्रेषित पौलाने देखील सध्याच्या जगाच्या परिस्थितीविषयीचे भाकित केले होते. त्याने लिहिलेः “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण मनुष्ये स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, निंदक, आईबापास न माणारी, कृतघ्न, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाड, असंयमी, क्रुर, चांगल्यावर प्रेम न करणारी; विश्वासघातकी, हूड, मदांध, देवावर प्रेम न करता विषयावर प्रेम करणारी, सुभक्तीचे केवळ स्वरुप दाखवून स्वतःवर तिचा संस्कार नाही, अशी ती होतील. त्यांजपासून दूर राहा.” (२ तीमथ्य ३:१-५) पौल सध्याच्या काळाबाबत एवढ्या अचूकपणे भाकित करू शकला ते यामुळेच की, देवाने त्याला ते शब्द लिहिण्यास प्रेरित केले होते.
अंतसमयाबाबत येशूने स्वतःच्या शब्दात म्हटले होतेः “या गोष्टी होताना पहाल, तेव्हा देवाचे राज्य जवळ आले आहे असे समजा.” (लूक २१:३१) लाखो लोक येशूच्या नमुनेदार प्रार्थनेचा दरारोज उल्लेख करतात व देवाचे राज्य यावे अशी विनवणी करतात. (मत्तय ६:९, १०) तथापि, हे राज्य खरेपणाने काय करील हे विचारले असता ते निरुत्तर होतात. उलटपक्षी, जे लाखो लोक आज पवित्र शास्त्राचा मोठ्या परिश्रमाने अभ्यास करीत आहेत त्यांना शिकायला मिळाले की, हे राज्य, जुन्या जगाचा नाश करील व नव्या जगाची कायम स्वरुपात स्थापना करील आणि मानवजातीलवर असंख्य आशीर्वाद आणील. पण हे सर्व कसे घडणार? व कधी?