येशूचे जीवन व उपाध्यपण
एक मनपसंत ईश्वरी अधिपती
येशू चमत्काराने हजारो लोकांना भरवतो तेव्हा लोकांना खरेच आश्चर्य वाटते. “जगात येणारा जो संदेष्टा तो खरोखर हाच आहे,” असे ते म्हणतात. येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ असा संदेष्टा आहे इतकाच त्यांचा निष्कर्ष नाही; पण तो मनास अत्यंत पसंत पडलेला अधिपती आहे असेही त्यांना वाटते. या कारणास्तव ते त्याला पकडून राजा करण्याची योजना करतात.
पण, त्यांच्या योजनेची येशूला माहिती आहे. यामुळे तो त्यांच्या पकडीत येण्याआधीच तेथून लगेच निघतो. तो लोकसमुदायाला जाण्यास सांगतो, आपल्या शिष्यांना तारवात बसण्यास सांगतो; ते मागे कफर्णहूमच्या दिशेकडे जातात व मध्ये तो डोंगरावर प्रार्थना करण्यास निघून जातो. तेथे येशू रात्रभर एकटाच राहतो.
पहाट होण्याच्या लागास आली असता येशू समुद्राकडे बघतो तो त्याला दिसते की, समुद्राच्या लाटा तुफानामुळे उसळत आहेत. वल्हांडण सण जवळ आला असल्यामुळे आकाशात जवळजवळ पूर्ण चंद्र आहे. त्याच्या प्रकाशात येशूला दिसते की, त्याचे शिष्य ज्या तारवात आहेत ते, त्यांना लाटामुळे पुढे रेटता येत नाही. नावाडी आपली सर्व शक्ती एकवटून वल्हे मारीत आहेत.
ते बघून येशू डोंगरावरुन उतरतो व लाटा ओलांडीत तारवाकडे चालत येतो. सुमारे तीन ते चार मैलांचे अंतर तोडल्यावर तो शिष्यांजवळ येतो. परंतु, तो तसाच ओलांडून पुढे जात राहतो. ते त्याला बघतात तेव्हा ते ओरडतातः “ते भूत आहे!”
येशू शांतपणे त्यांना म्हणतोः “मी आहे; भिऊ नका.”
परंतु पेत्र म्हणतोः “प्रभूजी, आपण आहा तर पाण्यावरुन आपणाकडे येण्यास मला सांगा.”
येशू म्हणतोः “ये!”
मग, पेत्र तारवातून बाहेर येतो व येशूच्या दिशेने पाण्यावर चालू लागतो. पण वादळाकडे पाहून पेत्र घाबरतो व बुडू लागतो. तो ओरडतोः “प्रभू, मला वाचवा!”
येशू लगेच आपला हात पुढे करून त्याला धरून म्हणतोः “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
पेत्र व येशू पुन्हा तारवात गेल्यावर वादळ थांबते. शिष्यांना खूप आश्चर्य वाटते. पण त्यांनी आश्चर्यचकित व्हावे का? येशूने काही तासांआधीच हजारोंना ज्या पाच भाकरी व दोन मासळ्याकरवी अद्भुत चमत्काराद्वारे भरविले होते, त्या “भाकरीचा अर्थ” जाणला असता, तर तो पाण्यावरून चालतो आणि वादळ शांत करतो याचे त्यांना आश्चर्य वाटावयास नको होते. पण आता शिष्य येशूच्या पाया पडतात व म्हणतातः “तू खराच देवाचा पुत्र आहेस.”
काही वेळातच ते गनेसरेतास पोहंचतात. ही कफर्णहूमजवळील सुंदर व सुपीक तळवट आहे. तेथे ते तारवाचा नांगर टाकतात. पण किनाऱ्यावर उतरल्यावर, तो येशू आहे हे लोकसमुदाय लगेच ओळखतो व तो जवळपासच्या गावात जाऊन आजारी आहेत त्यांना घेऊन येतो. यांना आपल्या बाजेवर घालून आणले जाते व येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श होताच ते पूर्णपणे बरे होतात.
दुसऱ्या दिवशी, ज्या हजारोंनी येशूच्या अद्भुत चमत्काराकरवी आपली भरवणूक केली होती त्यांना दिसते की येशू तेथे नाही. तेव्हा ते तिबिर्यकडून लहान तारवे आल्यावर त्यामध्ये बसून येशूला कफर्णहूममध्ये शोधण्यासाठी जातात. येशू भेटल्यावर ते त्याला विचारतातः “रब्बी, तुम्ही येथे केव्हा आलात?” येशू जे उत्तर देतो ते खरेच मर्मभेदक आहे. योहान ६:१४-२५; मत्तय १४:२२-३६; मार्क ६:४५-५६.
◆ येशूने हजारोंना चमत्काराने भरविल्यावर लोकांची त्याला काय करण्याची इच्छा होते?
◆ येशू डोंगरावरुन काय बघतो, व मग तो काय करतो?
◆ शिष्यांना या गोष्टींमुळे का अचंबा वाटावयास नको होते?
◆ ते किनाऱ्यावर पोहंचल्यावर काय घडते?