येशूचे जीवन व उपाध्यपण
येशू अद्भुतरित्या हजारोंना जेवू घालतो
बारा प्रेषितांनी संपूर्ण गालीलभर एका विलक्षण प्रचार यात्रेचा आनंद लुटला. आता, योहानाच्या शिरच्छेदानंतर लगेचच ते येशूकडे परततात व आपले आश्चर्यकारक अनुभव त्याला सांगतात. ते आता थकलेले आहेत हे पाहून तसेच बरेच लोक सारखे येतजात असल्यामुळे त्यांना जेवण्यास देखील सवड मिळत नाही हे बघून येशू त्यांना म्हणतो: ‘चला आपण रानात एकांती जाऊ व तेथे तुम्ही थोडा विसावा घ्या.’
कदाचित, ते कफर्णहूमाजवळ आपल्या मचव्यात बसून एकांती, यार्देनेच्या पूर्वेकडे बेथसैदा येथे जाण्यास निघतात. पण त्यांना निघताना बरेच लोक पाहतात व काहींना ते कोठे जाणार हे देखील कळते. हे लोक किनाऱ्याने पळत जाऊन जेथे मचवा थांबणार तेथे जातात व यांना भेटतात.
मचव्यातून बाहेर आल्यावर येशूला मोठा लोकसमुदाय त्याची वाट पाहात असलेला दिसतो. त्याला त्यांचा कळवळा येतो, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे झालेले दिसतात. तेव्हा तो आजाऱ्यांना बरे करतो व पुष्कळ गोष्टींविषयीचे शिक्षण देऊ लागतो.
वेळ लवकर निघून जाते. येशूने शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणतात: “ही अरण्यातील जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे, तेव्हा लोकांना भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतःकरिता खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”
परंतु, येशू त्यांना म्हणतो: “तुम्हीच त्यांना खावयास द्या.” खरे म्हणजे, येशूला, आपण स्वतः काय करणार आहोत हे माहीत असते; पण फिलिप्पाची परिक्षा घ्यावी म्हणून तो त्याला विचारतो: “ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या?”
फिलिप्पला वाटले की, हे अशक्य आहे. कारण पुरुष केवळ ५,००० होते आणि मुले व स्त्रिया धरून ती संख्या १०,००० वर जाऊ शकणार होती! यामुळे फिलिप्प म्हणतो: “ह्यांच्यातील एकेकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.”
एवढ्यांना जेवू घालणे शक्य नाही हे दाखविण्यासाठी आंद्रिया पुढे म्हणतो: “येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत. परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?”
तो इ.स. ३२ मधील वल्हांडण सणाआधीचा वसंत ऋतु असल्यामुळे सर्वत्र हिरवे गवत पसरले आहे. यासाठी येशू त्याच्या शिष्यांना लोकांचे ५० व १०० असे गट करून गवतावर बसावावयाला सांगतो. तो त्या पाच भाकरी व दोन मासळ्या घेऊन स्वर्गाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागतो. मग तो भाकरीचे तुकडे करतो व मासळ्यांचीही वाटणी करतो. नंतर लोकांना वाढण्यासाठी हे सर्व तो आपल्या शिष्यांना देतो. आश्चर्य हे की, सर्व लोक जेवून तृप्त होतात!
नंतर येशू शिष्यांना सांगतो: “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” जेव्हा ते गोळा करतात तेव्हा त्याच्या बारा टोपल्या भरून उरतात! मत्तय १४:१३-२१; मार्क ६:३०-४४; लूक ९:१०-१७; योहान ६:१-१३.
◆ येशू आपल्या शिष्यांसाठी एकांताची जागा का पाहतो?
◆ येशू शिष्यांना कोठे घेऊन जातो, व विश्रांतीची निकड असतानाही ती त्यांना का मिळत नाही?
◆ जेव्हा उशीर होतो तेव्हा शिष्य येशूला कशाची विनंती करतात, पण येशू कशाप्रकारे लोकांची गरज भागवितो?