मुख्य विषय | घरात शांती कशी टिकवाल?
कुटुंबात भांडणं—का होतात?
“आमच्यात सहसा पैशांवरून भांडणं होतात,” असं घाना इथं राहणारी जेकपची पत्नी सेराa म्हणते. त्यांच्या लग्नाला १७ वर्षं झाली आहेत. ती पुढं म्हणते “मला माझ्या कुटुंबाची खरोखर खूप काळजी आहे, पण जेकप कधीच माझ्याबरोबर पैशांच्या व्यवहारांबद्दल बोलत नाही याचा मला राग येतो. अनेक आठवडे आम्ही एकमेकांशी बोलत नाही.”
“हो खरंय, कधीकधी गैरसमज आणि नीट चर्चा होत नसल्यामुळं आम्ही रागाच्या भरात एकमेकांना नको ते बोलतो. काही प्रसंगी क्षुल्लक गोष्टीवरून भांडण जास्तच वाढतं,” हे जेकप मान्य करतो.
भारतात राहणारा नीरज याचं नुकतच लग्न झालं होतं. त्याच्या सासरी घडलेल्या प्रसंगाबद्दल तो सांगतो. त्याचे सासरे एकदा त्याच्या सासूवर ओरडले. यावरून “ती इतकी चिडली की घरातनं निघून गेली. मी जेव्हा सासऱ्यांना याबद्दल विचारलं, तेव्हा त्यांना माझाही राग आला. कारण मी त्यांचा जावई आहे. जावयानं सासऱ्याला काही विचारणं अपमान समजला जातो. त्यानंतर ते आम्हा सर्वांवरतीच बरसले.”
चुकीच्या वेळी चुकीचे शब्द वापरल्यानं घरात भांडणं कशी वाढू शकतात हे तुम्हीदेखील अनुभवलं असेल. अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही, शांतीनं सुरू झालेलं तुमचं बोलणं विकोपाला जाऊ शकतं. आपण सर्वच वेळी योग्य आणि सर्वांना आवडतील अशा गोष्टी बोलू शकत नाही. त्यामुळं अगदी नकळत आणि सहज रीत्या आपण दुसऱ्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू शकतो. असं असलं तरी आपण सर्वजण कुटुंबात काही प्रमाणात शांती टिकवू शकतो.
जेव्हा कुटुंबात भांडणं आणि वाद होतात तेव्हा आपण काय करू शकतो? कुटुंबातील शांती आणि प्रसन्न वातावरण परत आणण्यासाठी आपण कोणती पावलं उचलू शकतो? सर्वच कुटुंबं, घरात शांती कशी टिकवू शकतात? पुढील लेख वाचा. (g15-E 12)
a या लेखातील काही नावं बदलण्यात आली आहेत.