एस्तेर
३ या घटना घडल्यावर, अहश्वेरोश राजाने हामानला+ बढती दिली आणि त्याच्या सोबतच्या इतर सर्व अधिकाऱ्यांपेक्षा त्याला उच्च पद दिलं.+ हामान हा अगाग+ वंशातल्या हम्मदाथाचा मुलगा होता. २ राजमहालाच्या दरवाजाजवळ बसणारे राजाचे सर्व सेवक हामानला वाकून नमन करायचे आणि त्याला दंडवत घालायचे. कारण राजाने तसा हुकूमच दिला होता. पण मर्दखयने मात्र त्याला वाकून नमन करायला किंवा दंडवत घालायला साफ नकार दिला. ३ म्हणून राजमहालाच्या दरवाजाजवळ बसणाऱ्या राजाच्या सेवकांनी मर्दखयला विचारलं: “तू राजाचा हुकूम का मानत नाहीस?” ४ ते दररोज त्याला हाच प्रश्न विचारायचे. पण तो त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही. मग त्यांनी ही गोष्ट हामानला सांगितली. मर्दखयचं हे वागणं हामान कितपत खपवून घेईल हे त्यांना पाहायचं होतं.+ कारण आपण यहुदी आहोत हे मर्दखयने त्यांना सांगितलं होतं.+
५ मर्दखय आपल्याला वाकून नमन करत नाही आणि आपल्याला दंडवत घालत नाही हे पाहून हामान संतापला.+ ६ पण एकट्या मर्दखयला मारून हामानचं समाधान झालं नसतं. कारण त्याला मर्दखयच्या लोकांबद्दल, म्हणजे यहुद्यांबद्दलही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे हामान, अहश्वेरोशच्या साम्राज्यात असलेल्या मर्दखयच्या सर्व लोकांना मारून टाकण्याची संधी शोधू लागला.
७ त्यासाठी एक विशिष्ट महिना आणि दिवस ठरवण्यासाठी हामानसमोर पूर, म्हणजे चिठ्ठ्या टाकण्यात आल्या.+ त्या चिठ्ठ्या अहश्वेरोश राजाच्या शासनकाळाच्या १२ व्या वर्षातल्या पहिल्या महिन्यात, म्हणजे निसान* महिन्यात टाकण्यात आल्या.+ तेव्हा १२ व्या महिन्याची, म्हणजे अदार*+ महिन्याची चिठ्ठी निघाली. ८ मग हामान अहश्वेरोश राजाला म्हणाला: “तुमच्या साम्राज्याच्या सर्व प्रांतांतल्या+ लोकांमध्ये असे काही लोक विखुरलेले आहेत+ ज्यांचे कायदे-कानून बाकीच्या लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत. ते राजाचे कायदे मानत नाहीत. आणि अशा लोकांना राहू देणं राजासाठी चांगलं नाही. ९ आता जर राजाला योग्य वाटत असेल, तर या लोकांचा नाश करावा असं एक लिखित फर्मान आपण काढावं. त्यासाठी मी अधिकाऱ्यांना शाही खजिन्यात जमा करायला १०,००० तालान्त* चांदी देईन.”*
१० तेव्हा राजाने आपल्या बोटातली मुद्रेची अंगठी+ काढून अगागी+ हम्मदाथाच्या मुलाला आणि यहुद्यांच्या शत्रूला, म्हणजे हामानला+ दिली. ११ राजा हामानला म्हणाला: “ते लोक आणि त्यांची चांदी मी तुझ्या हवाली करतो. त्यांच्या बाबतीत तुला जे योग्य वाटतं ते कर.” १२ मग पहिल्या महिन्याच्या १३ व्या दिवशी राजाच्या सचिवांना+ बोलावण्यात आलं. आणि त्यांनी हामानच्या सर्व आज्ञा राजाच्या सुभेदारांसाठी, प्रांतांच्या राज्यपालांसाठी आणि सगळ्या लोकांच्या अधिकाऱ्यांसाठी लिहून काढल्या.+ प्रत्येक प्रांतात राहणाऱ्या लोकांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत त्या लिहिण्यात आल्या. त्या अहश्वेरोश राजाच्या नावाने लिहून त्यांवर राजमुद्रेच्या अंगठीची मोहर लावण्यात आली.+
१३ मग ही पत्रं दूतांच्या हातून राजाच्या सर्व प्रांतांत पाठवण्यात आली. पत्रांमध्ये असा हुकूम देण्यात आला होता की सर्व यहुदी लोकांना, म्हणजे तरुण-वृद्ध आणि बायका-मुलं अशा सर्वांना एकाच दिवशी मारून टाकावं. अदार+ या १२ व्या महिन्याच्या १३ व्या दिवशी त्या सगळ्यांचा समूळ नाश करून त्यांची मालमत्ता लुटावी.+ १४ सगळ्या लोकांनी त्या दिवसासाठी तयार राहावं, म्हणून पत्रातल्या माहितीला सर्व प्रांतांत कायद्याचं स्वरूप द्यायचं होतं. आणि सगळ्या लोकांमध्ये त्याची जाहीर घोषणा करायची होती. १५ राजाच्या हुकमाप्रमाणे सगळे दूत लगेच निघाले;+ हा कायदा शूशन*+ राजवाड्यातून देण्यात आला. मग राजा आणि हामान प्यायला बसले. पण शूशन* शहरात मात्र खळबळ माजली होती.