वाचकांचे प्रश्न
ईयोबावर आलेले संकट किती काळापर्यंत होते?
काहींना असे वाटते की ईयोबावर आलेल्या परीक्षा कित्येक वर्षांपर्यंत चालल्या पण ईयोबाचे पुस्तक असे सुचवत नाही.
ईयोबाच्या परीक्षांचा पहिला भाग, ज्यात त्याने आपले कौटुंबिक सदस्य आणि मालमत्ता गमावली, फार कमी अवधीचा होता. आपण असे वाचतो: “एके दिवशी असे झाले की, ईयोबाचे पुत्र व कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत असता . . . .” (तिरपे वळण आमचे.) एकापाठोपाठ एक—त्याची गुरेढोरे, गाढवे, मेंढरे, उंट आणि या प्राण्यांची राखण करणारे सेवक मरण पावल्याचे ईयोबाला कळवण्यात आले. यानंतर लगेच आपल्या “ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत” असलेल्या त्याच्या पुत्रांचा व कन्यांचा मृत्यू झाल्याची बातमी ईयोबाला मिळाली. हे सर्व एकाच दिवशी घडले असे दिसते.—ईयोब १:१३-१९.
यानंतर जी परीक्षा ईयोबावर आली ती कदाचित थोडा जास्त काळ चालली असेल. सैतानाने यहोवासमोर जाऊन आव्हान केले की ईयोबाच्या स्वतःच्या शरीराला काही दुखापत झाल्यास तो निश्चितच देवाचा अव्हेर करेल. तेव्हा सैतानाने ईयोबाला “मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत अतिशय पीडिले.” हा रोग पूर्ण शरीरावर पसरण्यास काही अवधी लागला असेल. तसेच त्याचे सांत्वन करण्यास आलेल्या तिघा मित्रांना “त्याजवर आलेल्या अरिष्टांविषयी” कळेपर्यंतही कदाचित काही अवधी गेला असेल.—ईयोब २:३-११.
अलीफज हा अदोम राष्ट्रातील तेमान या ठिकाणचा आणि सोफर अरेबियाच्या वायव्य प्रदेशातील एका ठिकाणचा होता; ईयोब जेथे राहात होता तो ऊस देश उत्तर अरेबियात होता, त्याअर्थी हे दोघे त्या देशापासून फार दूर नव्हते. पण बिल्दद हा शूही होता; शूही लोक फरात नदीलगतच्या प्रदेशांत वसले होते असे म्हटले जाते. जर बिल्दद त्या वेळी आपल्या मूळ गावी असेल तर मग ईयोबाची हकीगत त्याला समजेपर्यंत आणि तो ऊसला येईपर्यंत कित्येक आठवडे किंवा महिने गेले असतील. अर्थात, ईयोबावर संकट आले तेव्हा हे तिघेही तिथेच आसपासच्या परिसरांत असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. हे तिघे ईयोबाकडे आले तेव्हा ते काहीही न बोलता “सात दिवस व सात रात्री त्याजबरोबर जमिनीवर बसले.”—ईयोब २:१२, १३.
यानंतर ईयोबाच्या परीक्षांचा शेवटचा भाग येतो. याविषयी ईयोबाच्या पुस्तकात कित्येक अध्यायांत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. त्याच्या तथाकथित सांत्वनकर्त्यांचे वादविवाद किंवा भाषणे यांत दिली आहेत; यांपैकी काहीवेळा ईयोबानेही त्यांना प्रत्युत्तर दिले. शेवटी वयाने लहान असणाऱ्या अलीहूने केलेली कानउघाडणी आणि यहोवाने स्वर्गातून बोलून ईयोबाला कशाप्रकारे ताळ्यावर आणले याविषयी वर्णन आहे.—ईयोब ३२:१-६; ३८:१; ४०:१-६; ४२:१.
त्याअर्थी, ईयोबावर आलेले संकट कदाचित काही महिन्यांत, कदाचित एका वर्षाच्या आत संपुष्टात आले असावे. अनुभवाने कदाचित तुम्हाला माहीत असेल, की आपल्यावर संकटे येतात तेव्हा ती जणू संपतच नाहीत असे आपल्याला भासते. तरीसुद्धा आपण हे कधीही विसरू नये की ईयोबाची संकटे गेलीत त्याचप्रकारे आज न उद्या संकटे नाहीशी होतील. आणि ती कितीही काळ आपल्याला सोसावी लागली तरीसुद्धा देव आपल्याला साहाय्य करतो हे आपण कधीही विसरू नये कारण त्याच्या प्रेरित वचनात असे सांगितले आहे: “आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करिते.” (२ करिंथकर ४:१७) प्रेषित पेत्राने लिहिले: “आपल्या सार्वकालिक गौरवांत यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांस पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांस पूर्ण, दृढ व सबळ करील.”—१ पेत्र ५:१०.