वाचकांचे प्रश्न
‘मी शांती आणायला आलोय असं समजू नका’ असं येशूने का म्हटलं?
येशूने लोकांना एकमेकांसोबत शांतीने राहायला शिकवलं. पण एकदा तो आपल्या प्रेषितांना म्हणाला: “मी पृथ्वीवर शांती आणायला आलोय असं समजू नका. मी शांती आणायला नाही, तर तलवार चालवायला आलोय. कारण मुलाविरुद्ध बाप, आईविरुद्ध मुलगी आणि सासूविरुद्ध सून अशी फूट पाडण्यासाठी मी आलोय.” (मत्त. १०:३४, ३५) येशूला नेमकं काय म्हणायचं होतं?
येशूला घरच्या लोकांना एकमेकांपासून तोडायचं नव्हतं. पण त्याला माहीत होतं की त्याने शिकवलेल्या गोष्टींमुळे काही कुटुंबांमध्ये मतभेद निर्माण होतील. म्हणून, ज्यांना ख्रिस्ताचे शिष्य बनून बाप्तिस्मा घ्यायची इच्छा आहे त्यांनी आपल्या या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा विश्वासात नसलेला जोडीदार किंवा कुटुंबातले इतर सदस्य विरोध करतात तेव्हा ख्रिस्ताच्या शिकवणींप्रमाणे चालणं जड जाऊ शकतं. बनणे
बायबल ख्रिश्चनांना ‘सगळ्यांसोबत शांतीने राहा’ असा सल्ला देतं. (रोम. १२:१८) पण काही कुटुंबांमध्ये येशूच्या शिकवणी जणू “तलवार” चालवल्यासारखं काम करू शकतात. कुटुंबातला एक जण जेव्हा येशूच्या शिकवणी स्वीकारतो, पण इतरांना त्या पटत नाहीत किंवा ते त्याचा विरोध करू लागतात तेव्हा असं होतं. अशा वेळी, घरचे लोकच सत्य शिकणाऱ्या व्यक्तीचे “शत्रू” बनतात.—मत्त. १०:३६.
ज्यांच्या घरचे लोक दुसऱ्या धर्माच्या शिकवणी पाळत असतात त्यांना कधीकधी कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. त्या वेळी आपल्या घरच्या लोकांच्या इच्छेप्रमाणे वागायचं की यहोवा आणि येशूच्या शिकवणींप्रमाणे चालायचं, हा निर्णय त्यांना घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, सणावारांच्या वेळी विश्वासात नसलेले नातेवाईक धार्मिक विधींमध्ये भाग घ्यायचा दबाव त्यांच्यावर टाकू शकतात. अशा वेळी ते कोणाच्या इच्छेप्रमाणे वागतील? येशूने म्हटलं होतं, “ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या वडिलांवर किंवा आईवर जास्त प्रेम आहे, तो माझा शिष्य व्हायला योग्य नाही.” (मत्त. १०:३७) येशूचा शिष्य होण्यासाठी एखाद्याने आपल्या आईवडिलांवर कमी प्रेम केलं पाहिजे असं येशूला म्हणायचं नव्हतं. उलट, कोणत्या गोष्टींना किती महत्त्व दिलं पाहिजे याबद्दल तो बोलत होता. यहोवाची उपासना करताना घरच्या लोकांनी जरी आपला विरोध केला तरी आपण त्यांच्यावर प्रेम करायचं सोडत नाही. पण, देवावर आपण सगळ्यात जास्त प्रेम केलं पाहिजे ही गोष्टही आपण नेहमी लक्षात ठेवतो.
हे खरंय, की घरचे लोक विरोध करतात तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं. पण येशूचे शिष्य त्याचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवतात: “जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे चालत नाही, तोही माझा शिष्य व्हायला योग्य नाही.” (मत्त. १०:३८) म्हणजे दुसऱ्या शब्दांत, ख्रिश्चनांना हे माहीत असतं की ख्रिस्ताचे शिष्य बनल्यामुळे त्यांना दुःखं सोसावी लागतील. घरच्यांकडून होणारा विरोधसुद्धा त्यात सामील आहे. आणि ही दुःखं सोसायला ते तयार असतात. पण त्याच वेळी, आपल्या चांगल्या वागणुकीमुळे घरचे लोक विरोध करायचं बंद करतील आणि कदाचित सत्य शिकून घ्यायलाही तयार होतील अशी आशा ते कधीच सोडत नाहीत.—१ पेत्र ३:१, २.