आपल्याला खरोखरच इतरांची गरज आहे का?
“आपल्या जीवनाकडे आणि आपण करत असलेल्या प्रयत्नांकडे जवळून पाहिल्यास आपल्याला लगेच दिसून येईल, की आपली जवळजवळ सर्व कार्ये आणि इच्छा इतर मानवांच्या अस्तित्वाशी जुळलेल्या असतात,” असे सर्वज्ञात शास्त्रज्ञ अल्बर्ट आयंस्टाईनने म्हटले. ते पुढे म्हणाले: “इतरांनी काढलेले पीक आपण खातो, इतरांनी बनवलेले कपडे आपण घालतो, इतरांनी बांधलेल्या घरात आपण राहतो. . . . माणूस जो काही असतो व त्याला जे काही महत्त्व प्राप्त होते ते त्याच्या वैयक्तिक गुणविशेषांवर फारसे अवलंबून नसते, तर तो एका प्रचंड मानवी समाजाचा एक घटक असल्यामुळे त्याला महत्त्व मिळालेले असते; हाच मानवी समाज त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या भौतिक व आध्यात्मिक अस्तित्वाला मार्गदर्शन देतो.”
प्राणी जगात आपल्याला, उपजत साहचर्य सर्रासपणे पाहायला मिळते. हत्ती कळपानेच हिंडतात आणि पिल्लांचे संरक्षण करतात. सिंहिणी एकत्र मिळून शिकार करतात आणि आपले अन्न नरांबरोबर वाटून खातात. डॉल्फिन एकत्र खेळतात; एवढेच नव्हे तर संकटात सापडलेल्या इतर प्राण्यांना किंवा पोहणाऱ्या लोकांना देखील त्यांनी वाचवले आहे.
परंतु, समाजशास्त्रज्ञांना, मानवांमध्ये एक प्रवृत्ती दिसून आली आहे जिच्याविषयी काळजी वाढत चालली आहे. मेक्सिकोत प्रकाशित होत असलेल्या एका बातमीपत्राने म्हटले, की काही विद्वानांचे असे मत आहे की “अनेक दशकांपासून स्वतःला एकाकी ठेवल्यामुळे आणि सामाजिक जीवन नष्ट झाल्यामुळे अमेरिकेतील समाजावर अत्यंत घातक परिणाम झाला आहे.” बातमीपत्रकाने पुढे म्हटले, की “राष्ट्राचे हित, व्यापक सामाजिक बदलावर आणि सामाजिक जीवनाकडे परतण्यावर अवलंबून आहे.”
विकसनशील देशांत राहणाऱ्यांमध्ये ही समस्या खासकरून वाढत चालली आहे. पुष्कळ लोकांमध्ये एकाकीपणाची प्रवृत्ती वाढत चालली आहे. लोकांना ‘स्वतंत्र’ राहावेसे वाटते आणि इतरांनी ‘त्यांच्या जीवनात’ ढवळाढवळ केलेली त्यांना मुळीच खपत नाही. या प्रवृत्तीमुळे मानवी समाज, भावनिक समस्या, नैराश्य आणि आत्महत्या यांकडे जास्त झुकला आहे, असे म्हटले जाते.
याबाबतीत, डॉ. डॅन्यल गोलमन म्हणतात: “एकाकी राहण्याच्या प्रवृत्तीमुळे अर्थात आपल्या अंतरंग भावना ऐकण्यासाठी किंवा निकटचा संपर्क ठेवण्यासाठी कोणीही नाही या कल्पनेमुळे आजारपण किंवा मृत्यूचे प्रमाण दुप्पट होते.” विज्ञान (इंग्रजी) नावाच्या एका मासिकात प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टने असा निष्कर्ष काढला की एकाकी राहिल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर, ‘धुम्रपान, उच्च रक्तदाब, कोलोस्ट्रॉलमध्ये वाढ, लठ्ठपणा आणि शारीरिक व्यायामाचा अभाव यांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या दराइतकाच आहे.’
यास्तव, वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला इतरांची गरज लागतेच. आपण एकटे जगू शकत नाही. मग एकाकीपणाची समस्या कशी सोडवता येऊ शकेल? कोणत्या गोष्टीने अनेकांच्या जीवनाला खरा अर्थ दिला आहे? पुढील लेख अशा प्रश्नांची उत्तरे देईल.
[३ पानांवरील संक्षिप्त आशय]
“आपली जवळजवळ सर्व कार्ये आणि आपल्या इच्छा इतर मानवांच्या अस्तित्वाशी जुळलेल्या असतात.” —अल्बर्ट आयंस्टाईन