जागतिक शांती केव्हा?
जागतिक शांती अगदी उंबरठ्यावर आहे असे तुम्हाला वाटते का? काही वर्षांपूर्वी अनेकांना असे वाटत होते. पण, आता मात्र त्यांना हे निव्वळ स्वप्न वाटते. भविष्यात ज्या मोठ-मोठ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागणार त्याविषयी दक्षिण आफ्रिकेतील डेली मेल ॲण्ड गार्डियन या वृत्तपत्रातील एक अहवाल म्हणतो: “एक नवीन शांतीप्रिय युगाबद्दल दहा वर्षांपूर्वी काढण्यात आलेले अनुमान आता पोकळ कल्पना वाटतात.”
सदर अहवालाच्या लेखकांनी दाखवून दिले की कशाप्रकारे केवळ दहा वर्षांपूर्वी लोक एका सुखमय भविष्याची आशा बाळगून होते. अलीकडेच, दोन महाशक्तींमधील शीत युद्ध संपले तेव्हा एका नव्या युगाची सुरवात होईल आणि गरिबी, आजार आणि पर्यावरण समस्या कायम सुटतील असे लोकांना वाटू लागले. पण, वर उल्लेखित अहवालानुसार, “या सर्व गोष्टी आता पुराणातल्या वाटतात. जगातल्या ज्या भागांची नावेसुद्धा आपल्याला माहीत नसतील अशा ठिकाणी आज लढाया सुरू झाल्या आहेत, गरिबी दिवसेंदिवस वाढत आहे आणि मुख्य म्हणजे दोन न्यूक्लियर शक्तींचा उदय झाला आहे. संयुक्त राष्ट्राचे नाव कमालीचे बदनाम झाले आहे. कारण जगात लढाया होतात किंवा विपत्तीचा घाला पडतो तेव्हा लोकांची मदत करण्यात ते अपयशी ठरत आहे. त्यामुळे एका सुखमय भविष्याऐवजी एक निराश्यजनक व अंधकारमय भविष्यच लोकांच्या नजरेसमोर येते.”
पण, बायबलचा अभ्यास करणाऱ्यांना माहीत आहे, की शांतीसाठी मनुष्याने कितीही चांगल्या उद्देशाने प्रयत्न केला तरी सबंध जगात शांती आणण्यात तो कधीच यशस्वी होणार नाही. का नाही? कारण बायबल म्हणते त्याप्रमाणे: “सगळे जग त्या दुष्टाला [सैतानाला] वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) आणि जोपर्यंत हे जग सैतानाच्या मुठीत आहे तोपर्यंत देवाने सुरवातीला बनवले होते तशा सुखदायी, नयनरम्य बागेत पृथ्वीचे रुपांतर होऊ शकणार नाही.
पण, तरी आपण एका सुखावह आणि शांतीमय जगाची आशा बाळगू शकतो. कारण यहोवा देवाने स्वतः असे वचन दिले आहे, की तो सबंध जगात शांती आणेल. पण, ती आणण्याकरता तो या जुन्या जगात केवळ किरकोळ बदल किंवा सुधारणा करणार नाही; तर तो एक संपूर्ण “नवी पृथ्वी” आणणार आहे ज्यात शांती आणि “नीतिमत्त्व” वास करेल. (२ पेत्र ३:१३) होय, देवाचे राज्य पृथ्वीचा कायापालट करून त्यात सुख-शांती आणेल. त्या पृथ्वीवर राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनंत सुख-शांती मिळेल. या शिवाय, देवाने आणखीन एक वचन दिले आहे, की “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” देवाची ही अभिवचने सतत बदलणाऱ्या मनुष्यांच्या अनुमानांवर आधारित नाही; तर सत्य बोलणाऱ्या सृष्टिकर्त्याच्या अढळ वचनांवर ती आधारित आहेत.—प्रकटीकरण २१:४; तीत १:२.