“मिठाचा खारटपणाच गेला तर”
याच्यासाठी युद्धे झाली आहेत. व्यापारासाठी त्याचा उपयोग करण्यात आला आहे. प्राचीन चीनमध्ये तर सोन्याखालोखाल याचे मूल्य होते. होय, मिठाला अत्यंत उपयोगी वस्तू असे मानण्यात आले आहे. ते औषधी आहे असे आजही मानले जाते शिवाय, विश्वभरात अन्नाची चव वाढवण्यासाठी व ते टिकवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
मिठाचे अनेक इष्ट व उपयोगी गुण असल्यामुळे बायबलमध्ये त्याचा लाक्षणिकरीत्या उपयोग करण्यात आला आहे, यात काही आश्चर्य नाही. उदाहरणार्थ, मोशेच्या नियमानुसार, यहोवासमोर कशाचेही अर्पण करण्याआधी त्या अर्पणाला मीठ लावावे लागत असे. (लेवीय २:१३) अर्पणांची चव वाढवण्याकरता नव्हे तर मीठ, एखाद्या वस्तूला नासू किंवा कुजू देत नाही.
येशू ख्रिस्ताने डोंगरावरील आपल्या प्रसिद्ध प्रवचनात त्याच्या शिष्यांना म्हटले: “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा.” (मत्तय ५:१३) यावरून येशूला असे म्हणायचे होते, की त्याचे शिष्य देव राज्याच्या प्रचाराचे जे कार्य करत होते त्या कार्याचा ऐकणाऱ्या लोकांवर होणारा परिणाम कायमस्वरुपी ठरू शकतो किंवा जीवन-रक्षक ठरू शकतो. अर्थात, येशूच्या बोलण्यावर अंमल करणारे लोक त्यांच्या समाजातील नैतिक आणि आध्यात्मिक प्रकारच्या कुजण्यापासून सुरक्षित राहू शकत होते.—१ पेत्र ४:१-३.
परंतु, येशूने पुढे अशी ताकीद दिली: “जर मिठाचा खारटपणाच गेला तर . . . पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.” यावर भाष्य करताना, बायबल विद्वान अल्बर्ट बार्न्स म्हणाले, की येशू आणि त्याचे प्रेषित अशा मिठाविषयी बोलत होते जे “अशुद्ध होते, त्यात पालापाचोळा व माती मिसळलेली होती.” तेव्हा, मिठाचा जर खारटपणाच गेला तर “ते मातकट” होऊन जाते. “अशाप्रकारचे मीठ काही कामाचे नव्हते, . . . आपण रेतीचा उपयोग करतो तसे ते रस्त्यावर किंवा वाटेत टाकण्यापुरतेच होते,” असे बार्न्स म्हणाले.
या चेतावणीकडे लक्ष देऊन ख्रिश्चनांनी, आपले जाहीर साक्षकार्य न थांबवण्याची किंवा अभक्त आचरणाकडे पुन्हा न वळण्याची खबरदारी घेतली पाहिजे. नाहीतर, आध्यात्मिकरीत्या ते निकामी होऊन ‘खारटपणा गेलेल्या मिठाप्रमाणे’ कशाच्याही लायक राहणार नाहीत.