पाठ ८३
येशू हजारो लोकांना जेवू घालतो
इसवी सन ३२ सालच्या वल्हांडण सणाच्या काही दिवसांआधी प्रेषित प्रचार करून परत आले. गावोगावी फिरून प्रचार केल्यामुळे ते खूप थकले होते. म्हणून आराम करण्यासाठी येशूने त्यांना बोटीत बसवून बेथसैदा इथे नेलं. पण जेव्हा ते किनाऱ्यावर पोचले, तेव्हा येशूने पाहिलं की हजारोंच्या संख्येने लोक त्यांच्या मागोमाग आले होते. त्या वेळी येशूला फक्त त्याच्या प्रेषितांसोबत राहण्याची इच्छा होती. पण असं असलं, तरी त्याने लोकांना पाठवून दिलं नाही. तो त्यांच्याशी प्रेमळपणे वागला. त्याने आजारी लोकांना बरं केलं आणि तो त्यांना शिकवू लागला. येशूने त्यांना दिवसभर देवाच्या राज्याबद्दल शिकवलं. संध्याकाळ झाल्यावर प्रेषितांनी त्याला म्हटलं: ‘लोकांना आता भूक लागली असेल. त्यांना पाठवून दे. म्हणजे ते स्वतःसाठी खाण्याची सोय करू शकतील.’
येशू त्यांना म्हणाला: ‘त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.’ प्रेषितांनी त्याला विचारलं: ‘आम्ही त्यांच्यासाठी काही अन्न विकत घेऊन यावं, अशी तुझी इच्छा आहे का?’ त्यांच्यातला फिलिप्प म्हणाला: ‘आपल्याजवळ खूपसारे पैसे असते, तरी या सर्वांना पुरेल इतकं अन्न विकत घेणं आपल्याला शक्य नाही.’
येशूने त्यांना विचारलं: ‘आपल्याकडे खाण्यासाठी किती अन्न आहे?’ अंद्रिया म्हणाला: ‘पाच भाकऱ्या आणि दोन लहान मासे आहेत. पण, ते तर कोणालाच पुरणार नाही.’ येशूने म्हटलं: ‘भाकऱ्या आणि मासे माझ्याकडे घेऊन या.’ मग, त्याने शंभर-शंभर आणि पन्नास-पन्नास लोकांचे गट करून, त्यांना गवतावर बसायला सांगितलं. त्यानंतर, येशूने भाकऱ्या आणि मासे हातात घेतले आणि वर आकाशाकडे पाहून प्रार्थना केली. त्याने प्रेषितांकडे अन्न दिलं आणि त्यांनी ते सर्वांना वाटलं. तिथे असलेल्या ५,००० पुरुषांना, तसंच स्त्रियांना आणि मुलांना पुरेल इतकं अन्न होतं. ते सर्व पोटभर जेवले. नंतर, उरलेलं अन्न वाया जाऊ नये म्हणून प्रेषितांनी ते टोपल्यांमध्ये जमा केलं. एकूण १२ टोपल्या भरल्या! हा चमत्कार खरंच खूप जबरदस्त होता, नाही का?
या चमत्काराचा लोकांवर खूप मोठा प्रभाव पडला. येशूने त्यांचा राजा बनावं अशी त्यांची इच्छा होती. पण त्या वेळी येशूने राजा बनावं अशी यहोवाची इच्छा नव्हती आणि ही गोष्ट येशूला माहीत होती. त्यामुळे त्याने लोकांना पाठवून दिलं आणि प्रेषितांना गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूला जायला सांगितलं. प्रेषित बोटीत बसून गेले आणि येशू एकटाच एका डोंगरावर गेला. पण येशू डोंगरावर का गेला? कारण त्याला त्याच्या पित्याला प्रार्थना करायची होती. येशू कितीही व्यस्त असला, तरी तो प्रार्थना करण्यासाठी नेहमी वेळ काढायचा.
“नाश होणाऱ्या अन्नासाठी खटपट करू नका, तर जे सर्वकाळाच्या जीवनात टिकून राहतं, अशा अन्नासाठी खटपट करा. हे अन्न मनुष्याचा पुत्र तुम्हाला देईल.” —योहान ६:२७