पाठ २४
त्यांनी आपलं वचन पाळलं नाही
यहोवाने मोशेला म्हटलं: ‘वर डोंगरावर ये. माझे नियम मी तुला दगडांच्या पाट्यांवर लिहून देईन.’ मग मोशे डोंगरावर गेला आणि तिथे ४० दिवस व ४० रात्री राहिला. तो तिथे असताना यहोवाने दोन दगडी पाट्यांवर दहा महत्त्वपूर्ण नियम लिहिले. या नियमांना दहा आज्ञा म्हटलं जातं. यहोवाने त्या दगडी पाट्या मोशेला दिल्या.
मोशे बरेच दिवस खाली आला नाही म्हणून इस्राएली लोकांना वाटलं, की तो त्यांना सोडून कुठेतरी निघून गेला आहे. म्हणून त्यांनी अहरोनला म्हटलं: ‘आता आमचं मार्गदर्शन कोण करेल? आमच्यासाठी देव बनव, जो आमचं मार्गदर्शन करेल.’ अहरोनने उत्तर दिलं: ‘तुमचं सोनं मला द्या.’ त्याने ते सोनं वितळवलं आणि एका वासराची मूर्ती बनवली. त्यानंतर लोकांनी म्हटलं: ‘हे वासरूच तर आमचा देव आहे. यानेच आम्हाला मिसरमधून सोडवलं!’ ते त्या सोन्याच्या वासराची उपासना करू लागले. त्यांनी उत्सव साजरा केला. पण त्यांनी जे केलं ते बरोबर होतं का? मुळीच नाही. कारण त्या लोकांनी वचन दिलं होतं, की ते फक्त यहोवाचीच उपासना करणार. पण आता असं करून, खरंतर ते दिलेलं वचन मोडत होते.
जे काही घडत होतं ते यहोवाने पाहिलं. त्याने मोशेला म्हटलं: ‘खाली लोकांकडे जा! ते माझी आज्ञा मोडत आहेत. ते एका खोट्या देवाची उपासना करत आहेत.’ मोशेने त्या दोन दगडी पाट्या घेतल्या आणि तो खाली उतरला.
लोक राहत होते त्या ठिकाणाच्या जवळ आल्यावर, मोशेला लोकांच्या गाण्याचा आवाज ऐकू आला. तिथे पोचल्यावर लोक नाचत आहेत आणि वासराला वाकून नमस्कार करत आहेत हे त्याने पाहिलं. मोशेला खूप राग आला. इतका की त्याने त्या दोन दगडी पाट्या जमिनीवर आपटल्या आणि त्यांचे तुकडे-तुकडे झाले. मोशेने लगेच ती मूर्ती नष्ट केली. त्यानंतर त्याने अहरोनला विचारलं: ‘या लोकांनी तुला असं काय सांगितलं, ज्यामुळे तू इतकी वाईट गोष्ट करायला तयार झालास?’ अहरोनने उत्तर दिलं: ‘माझ्यावर रागावू नकोस. तुला तर माहीतच आहे, हे लोक कसे आहेत ते. त्यांना एक देव हवा होता. म्हणून मी त्यांचं सोनं आगीत टाकलं आणि हे वासरू तयार झालं.’ खरं पाहिलं तर, अहरोनने असं करायला नको होतं. मोशे परत डोंगरावर गेला आणि यहोवाने लोकांना माफ करावं यासाठी त्याच्याकडे विनंती करू लागला.
जे यहोवाचं ऐकण्यासाठी तयार होते त्यांना यहोवाने माफ केलं. तुला काय वाटतं? मोशेच्या मार्गदर्शनानुसार चालणं इस्राएली लोकांसाठी खूप महत्त्वाचं नव्हतं का?
“तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नको, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो; जो नवस तू केला असेल त्याची फेड कर.”—उपदेशक ५:४